- प्रा. विनय ल. बापट, ताळगाव.
सध्या गोव्यासह उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे, तर मणिपूर, उत्तराखंड, पंजाबमधील निवडणूक धुरळा अजूनही खाली बसलेला नाही. या राजकीय धामधुमीत राजकारणाची हिडीस, ओंगळवाणी, किळस आणणारी अशी अनेक रूपे आपल्यासमोर येत आहेत. कालपर्यंत एका पक्षात असलेला आज दुसर्या पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित होत आहे. धनशक्ती आणि गुंडशक्ती असणे ही उमेदवारी मिळविण्याची आज प्राथमिक पात्रता असल्याचे दिसत आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती ही आजच्या राजकारणात भूषणावह गोष्ट ठरत आहे. सर्वच राजकीय पक्ष धनदांडगे, बाहुबली, गुन्हेगार अशा लोकांनाच आपले उमेदवार म्हणून जनतेसमोर आणत आहेत. असे करण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे, सर्वच राजकीय पक्ष ‘निवडून येणे’ हा उमेदवारी देण्याचा एकमेव निकष वापरीत आहेत. अशा लोकांची संख्याही प्रत्येक पक्षात वाढत असल्यामुळे व सर्वांनाच ‘निवडून येण्याची खात्री’ वाटत असल्यामुळे एकाला तिकीट दिल्यास बाकीचे बंडखोरी करताना दिसतात, किंवा उपर्यांना तिकिटे मिळत असल्यामुळे त्या - त्या मतदारसंघातील काही निष्ठावान कार्यकर्तेही बंड करताना दिसतात. पण या सर्व किळसवाण्या प्रकारांमुळे आपल्या लोकशाहीचे मात्र दुर्दैवाने चांगलेच ‘वस्त्रहरण’ होत आहे.