(उत्तरार्ध)
प्रा. भानुदास खैरकर, ताळगाव
देशाला नवी राज्यघटना अर्पण करताना त्यांनी केलेले भाषण आणि दिलेले इशारे त्यांच्या दूरदृष्टीचे आणि देशाच्या आकलनाचे द्योतक होते हे नाकारून कसे चालेल? देशाला केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळवून उपयोगाचे नाही, तर याबरोबरच सामाजिक समता, बंधुभाव आणि आर्थिक स्वातंत्र्याचाही विचार व्हावा हे त्यांनी अभ्यासपूर्ण व कळकळीने प्रातिपादन केले आहे. आता मिळालेले हे राजकीय स्वातंत्र्य आपण पुन्हा घालवणार तर नाही ना, अशी भीती त्यांनी इतिहासातील ठळक उदाहरणे देऊन विशद केली, कारण फंदफितुरी, आपसातील हेवेदावे, व्यापक देशहितापेक्षा आपल्या स्वतःुपुरतेच पाहण्याची भारतीयांची मानसिकता त्यांनी दृष्टीआड केली नाही. विभूतीपूजा व व्यक्तीपूजा हाही भारतीयांचा एक मूलभूत दोष आहे. भक्ती ही आध्यात्मिक जीवनात मुक्ती मिळवून देत असते. पण सार्वजनिक जीवनात ती लोकशाहीला मारक ठरत असते, हे ऐतिहासिक सत्य त्यांनी तेव्हाच वर्तविले होते. सुयोग्य राजकारणासाठी सत्तारुढ पक्षाइतकेच सबळ विरोधी पक्षालाही लोकशाहीत तितकेच महत्त्व असते, हे कठोर सत्य ते सांगायला विसरले नाहीत. देशात कोणत्याही एकाच पक्षाची सत्ता असता कामा नये. त्यामुळे भ्रष्टाचार आणि निरंकुश हुकूमशाहीची वाटचाल होण्याचा धोका असतो. म्हणून सत्ता आलटून पालटून बदलत राहिली पाहिजे, असे त्यांचे राजकीय निरीक्षण होते. सार्वजनिक मालमत्तेचे समान विवरण व्हावे, सार्वजनिक क्षेत्राचे राष्ट्रीयीकरण होण्यावर त्यांनी सतत भर दिला होता. गरीब व श्रीमंत वर्गातील वाढते अंतर हे देशाला धोक्याचे ठरू शकते, असेही त्यांनी प्रतिपादन केले आहे.