- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
राजा असूनही लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकशाही पद्धतीने निवडून येऊन राजासारखे वागणारे आजचे राजकारणी यांच्यामधील तुलना करणे हा फार मोठा चिंतनाचा अन् चिंतेचा विषय आहे. शुद्ध, पवित्र हेतूने प्रेरित होऊन केलेले, ईश्वरी अधिष्ठान असलेले, धर्माचे अधिष्ठान असलेले कोणतेही कार्य हे चिरंजीवी स्वरूपाचे असते, आणि अशी कार्ये करणारेही चिरंजीवी ठरतात. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे छत्रपती महाराज होय! अलेक्झांडर, सीझर, नेपोलियन असे अनेक पराक्रमी, शूरवीर जगात होऊन गेले. परंतु, पवित्र तथा शुद्ध हेतूने कार्य करणारा राजा म्हणून संपूर्ण जगाला परिचित आहेत ते फक्त एकटे शिवाजी महाराजच! अलेक्झांडरने आपल्या सोबत्यांना मारले. सीझरने आपल्या बायकोला सोडले, तर नेपोलियनने डफ डांगियांचा वध केल्याचे इतिहास सांगतो. परंतु आप्तेष्टांचा घात शिवाजी महाराजांनी कधीच केला नाही. राज्याची शिस्त म्हणून काही कठोर निर्णय शिवाजी महाराजांनी अवश्य घेतले, परंतु आपल्या स्वार्थासाठी त्यांनी राजेपदाचा उपयोग केल्याचे उदाहरण इतिहासात सापडत नाही. आजच्या राजकारणात सगळं स्वार्थासाठी चालू असल्याचे आपणास ठायी ठायी दृष्टीस पडते.