कुटुंब

18-02-12

- गजानन हरिश्‍चंद्र मांद्रेकर

राजा असूनही लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकशाही पद्धतीने निवडून येऊन राजासारखे वागणारे आजचे राजकारणी यांच्यामधील तुलना करणे हा फार मोठा चिंतनाचा अन् चिंतेचा विषय आहे. शुद्ध, पवित्र हेतूने प्रेरित होऊन केलेले, ईश्‍वरी अधिष्ठान असलेले, धर्माचे अधिष्ठान असलेले कोणतेही कार्य हे चिरंजीवी स्वरूपाचे असते, आणि अशी कार्ये करणारेही चिरंजीवी ठरतात. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे छत्रपती महाराज होय! अलेक्झांडर, सीझर, नेपोलियन असे अनेक पराक्रमी, शूरवीर जगात होऊन गेले. परंतु, पवित्र तथा शुद्ध हेतूने कार्य करणारा राजा म्हणून संपूर्ण जगाला परिचित आहेत ते फक्त एकटे शिवाजी महाराजच! अलेक्झांडरने आपल्या सोबत्यांना मारले. सीझरने आपल्या बायकोला सोडले, तर नेपोलियनने डफ डांगियांचा वध केल्याचे इतिहास सांगतो. परंतु आप्तेष्टांचा घात शिवाजी महाराजांनी कधीच केला नाही. राज्याची शिस्त म्हणून काही कठोर निर्णय शिवाजी महाराजांनी अवश्य घेतले, परंतु आपल्या स्वार्थासाठी त्यांनी राजेपदाचा उपयोग केल्याचे उदाहरण इतिहासात सापडत नाही. आजच्या राजकारणात सगळं स्वार्थासाठी चालू असल्याचे आपणास ठायी ठायी दृष्टीस पडते.

18-02-12

- लाडोजी परब

कणकेश्‍वर म्हणजे प्रती काशिच! शिवाचे जागृत स्थान असलेल्या कुणकेश्‍वराच्या पायावर अरबी समुद्रही नतमस्तक झाला आहे. महाशिवरात्रीचा येथील उत्सव म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा! प्रत्येक दिवशी ११० हून अधिक असलेल्या शिवलिंगावर अभिषेक सुरू असतो. भाविकांचा अपार उत्साह आणि श्रद्धेचा हा दिव्य उत्सव कोकणची एक वेगळी ओळख सांगून जातो. कुणकेश्‍वराचे मंदिर हे भव्यता, शिल्पकला यांचा अनोखा संगम आहे. आपल्या देशात शिल्पकला, स्थापत्यशास्त्र व विज्ञान कसे बहराला आले त्याचे साक्ष देणारे हे मंदिर!

11-02-12

- अजय बुवा

गोव्यात नाट्यचळवळ म्हणावी तशी अजूनही सशक्त झालेली नाही. हौशी रंगभूमी हळूहळू लोप पावत चालली आहे. कला अकादमीच्या नाट्य स्पर्धांना फक्त चार-चार नाटके सादर होताहेत. उत्सवी रंगभूमीवर तीच नाटके व तोच पचकट विनोद चालू आहे. वार्षिक परंपरा म्हणून देवळासमोर नाटक व्हायला हवे, या भावनेने निव्वळ ‘भागवून नेणे’ हा प्रकार चालू आहे. कोकणी अकादमी व सम्राट क्लबचा मास्टर दत्ताराम नाट्य महोत्सव वगळता नाट्यक्षेत्रात गोव्यात तशी उदासीनताच आढळून येत आहे. आणि अशा या वातावरणात ‘सादीर थिएटर फेस्टीवल’ सारखं नाव गोव्यात आढळतं हे नाट्यचळवळीला पोषक आहे. पृथ्वी थिएटर फेस्टीवल, भारत रंग महोत्सव - दिल्ली सारखे महोत्सव आम्हांला ऐकून माहीत होते. परंतु त्याच तोला-मोलाचे एक नाट्यमहोत्सव गोव्यात यशस्वी होऊ शकतो हे या फेस्टीवलने दाखवून दिले आहे.

11-02-12

- लाडोजी परब

कोकणचे निसर्गसौंदर्य जसे विलोभनीय तसेच तेथील लाल मातीतून घडणारे कलाकार म्हणजे कलेची खाणच! कोकणची कला आणि संस्कृती या कलाकारांनी स्वत:च्या कुंचल्यातून जिवंत ठेवली आहे. सावंतवाडी तालुक्यातील निरवडे (कोनापाल) गावातील एक तरुण कलाकार दिलीप राणे. या कलावंताच्या हातातून तयार होणारी प्रत्येक मूर्ती बोलू लागते. कोकणच्या संस्कृतीचे दर्शन घडविते. सावंतवाडी (माजगाव) येथील आणखी एक कलाकार विलास मांजरेकर यांच्या कलाकृतीही सर्वदूर पोहोचल्या आहेत. कोकणातील ही रत्ने आपल्या कलेद्वारे कोकणची संस्कृती जतन करताहेत.

04-02-12

- प्रदीप आनंद नाईक

आपल्या जीवनाच्या वाटचालीत आपल्याला अनेक माणसे भेटतात, पण त्यातील अवघीच कायम स्मरणात राहतात. जीवनातील बर्‍यावाईट प्रसंगांपैकी थोडेच प्रसंग आपल्या मनात कायमचे घर करून राहतात. तद्वत अनेक कार्यक्रम वा उत्सवांतील अगदी मोजकेच कार्यक्रम आपल्या स्मृतीपटलावर कायमचे कोरले जातात, हेदेखील तितकेच खरे! असाच समस्त गोमंतकियांना भावलेला, आपल्या बुद्धीला चालनाच नव्हे तर वैचारिक खाद्य पुरविणारा गोवा राज्य कला आणि संस्कृती संचालनालय आयोजित दामोदर धर्मानंद कोसंबी वैचारिक महोत्सव. हा महोत्सव समस्त गोमंतकीयांत आता ‘डी. डी. कोसंबी वैचारिक महोत्सव’ वा ‘फेस्टीव्हल ऑफ आयडीयाज’ म्हणून रूढ झाला आहे.

04-02-12

- लाडोजी परब

ठाकर आदिवासी जमातीच्या विविध लोककला ऐतिहासिक आणि कोकणच्या संस्कृतीचे दर्शन घडवितात. पिंगुळी (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील ठाकर आदिवासी जमातीच्या विविध लोककलांतील ‘चित्रकथी’ ही परंपरेनुसार पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली लोककला! रामायण, महाभारतातील पौराणिक कथांवर आधारलेली चित्रे जेव्हा दिव्यासमोर येतात, तेव्हा ती चक्क बोलू लागतात. चित्रकथीतील चित्रे रंगपटावर नाचू लागतात. सुमारे ३०० वर्षांपूर्वीच्या चित्रांच्या काही पोथ्या ठाकर आदिवासी समाजाने आजही जतन करून ठेवल्या आहेत. या लोककलेने कोकणच्या लोकसंस्कृतीत भर घातली आहे. सोमेश्‍वराच्या ‘मानसोल्लासा’मध्ये उल्लेख असलेली ‘चित्रकथी’ म्हणजे चित्रांद्वारेच कथन केली जाणारी कथा होय. हे एक कुतूहल, आकर्षण आदिवासी जमातीने जतन केले आहे.

28-01-12

- रामकृष्ण कामत

भारतीय शिक्षण मूल्यांनी युक्त आदर्श संस्कार व स्वाभिमानी नागरिक घडविणे हे भारतीय शिक्षण प्रणालीचा मूल मंत्र होय. भारतीय संस्कृती जपणारे पारंपरिक संस्कार मुलांवर बिंबविण्यासाठी शिक्षकांबरोबर पालकांचीही भूमिका महत्त्वाची आहे, हे प्रयोगसिद्ध आहे. अगदी हेच महत्त्वाचे तंत्र विकसित व्हावे यासाठी पणजी येथील डॉ. केशव बळीराम हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था क्रियाशील आहे. १९९० हे वर्ष या संस्थेचे प्रारंभी वर्ष. पूर्व प्राथमिक शाळा इथपासून १० वी पर्यंत विद्यालय असे आज या संस्थेचे स्वरूप आहे. गेल्या ६ वर्षांपासून १० वीचा निकाल १०० % लागत आहे. शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा मुलांचा सर्वांगीण विकास साधणार्‍या क्षेत्रात या संस्थेने नेहमीच राज्यस्तरावर उल्लेखनीय यश मिळवले आहे.

28-01-12

- लाडोजी परब

मालवण (जि. सिंधुदुर्ग) पासून अवघ्या आठ कि. मी. अंतरावर असलेले कांदळगाव! गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. कांदळगावचे रामेश्‍वर हे ग्रामदैवत. दर तीन वर्षांनी हा रामेश्‍वर आपल्या पंचायतनासह सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भेटीला जातो. हा सोहळा अविस्मरणीय असतो. या सोहळ्याचा इतिहास जाणून घेताना अनेक गोष्टींचा उलगडा होतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्चस्व आणि त्यांचे सामर्थ्य वाढत असतानाच सागरी मार्ग मजबूत केल्यावर आपले राष्ट्र अधिक सुरक्षित होईल, या विचाराने छत्रपतींनी जंजिरा किल्ला काबीज करण्याचा दोन वेळा प्रयत्न केला. मात्र शिवाजीराजांना अपेक्षित यश मिळाले नाही. १६व्या शतकात मालवण समुद्रातून प्रवास करताना चारही बाजूने पाणी असलेले कुरटे बेट महाराजांच्या दृष्टीस पडले.

21-01-12

- राजेंद्र पां. केरकर

गोव्याला पक्ष्यांची वैविध्यपूर्ण आणि समृद्ध संपदा लाभलेली आहे. रुबी थ्रोटेड येलो बुलबूल या सुंदर पक्ष्याला राज्य पक्षी होण्याचा सन्मान लाभलेला आहे. उष्णकटिबंध प्रदेशातला स्वर्ग म्हणून ओळख असलेला गोवा पर्यटकांसाठी शेकडो वर्षांपासून जसा आकर्षण ठरलेला आहे, तसाच तो देशविदेशांतील पक्ष्यांसाठीही! शरद - हेमंत ऋतूचे आगमन झाले की विदेशातल्या पक्ष्यांचे गोव्यात आगमन होते. कोकण रेल्वेमार्ग अस्तित्वात येण्यापूर्वी तिसवाडीतील करमळी गावचे तळे बारामाही नानाविविध पक्ष्यांनी गजबजलेले असायचे. आजही देशाच्या वेगवेगळ्या प्रांतांबरोबर विदेशातल्या पाहुण्यांचे इथे आगमन होते.

21-01-12

- लाडोजी परब

धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरांचा अमूल्य ठेवा गावांनी जपलाय. बर्‍याचदा रूढी आणि परंपरांमुळे गावांचे महत्त्व कमी झाल्याची टीका होते, पण या रूढी आणि परंपरांच्या पाठीमागे असलेल्या चांगल्या कल्पना, वागणूक, संस्कृती या महत्त्वाच्या बाबी विसरता येत नाहीत. गावाला शांतता लाभावी, सुख - समाधान लाभावे ही गावकर्‍यांची इच्छा त्यांच्या कृतीतून जेव्हा स्पष्ट होते तेव्हाच त्यांच्या परंपरांना एक वेगळा साज चढतो. अशीच एक धार्मिक परंपरा म्हणजे ‘गावपळण!’ कोकणात या धार्मिक परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामागे असलेल्या काही गोष्टी अचंबित आणि संशोधन करण्यास भाग पाडणार्‍या आहेत.