कालवी - हळदोणे येथे काल घडलेली बस दुर्घटना ही निव्वळ दुर्घटना नाही, तर ती मानवी निष्काळजीपणाची, बेफिकिरीची आणि गोव्यातील अत्यंत भ्रष्ट वाहतूक व्यवस्थेची परिणती आहे. प्रवाशांनी भरलेली एखादी बस सरळ फेरीधक्क्यावरून नदीत जाऊन कोसळते यामध्ये जशी चालकाची हलगर्जी दिसते, तसेच बसच्या सुस्थितीबाबतही प्रश्नचिन्ह उभे राहते. बसचे ब्रेक लागले नाहीत हे कारण पुढे करून या दुर्घटनेवर आता पडदा टाकण्याचा प्रयत्न होईल. दुर्घटनेस जबाबदार असलेला चालक न्यायालयात पुराव्यांअभावी सुटेल, मालक भरपाईपासूनही स्वतःची सुटका करून घेईल, पण बळी गेलेली कोवळी मुले काही परत येणार नाहीत. कित्येक कुटुंबांचा आशेचा दिवा कायमचा विझून गेला आहे. त्या मुलांचे पालक या जिवघेण्या दुःखातून कधीही सावरणे शक्य नाही. बुडालेल्या मुलांची शोधाशोध करताना सापडलेल्या त्यांच्या भिजल्या वह्या पाहून अवघ्या गोव्याचे डोळे काल पाणावले असतील. कोणताही दोष नसताना निष्पाप कोवळ्या शाळकरी मुलांना जिवंत जलसमाधी मिळाली, पुरेशा साधनसामुग्रीविना कोणीही त्यांना वाचवू शकले नाही, हे वास्तव ह्रदय पिळवटून टाकणारे आहे. भ्रष्ट वाहतूक अधिकार्यांच्या कृपेने मोडकळीस आलेल्या बसगाड्या राजरोस रस्त्यावर चालविल्या जातात, खुलेआम लाच घेऊन चालक - वाहकांना रान मोकळे सोडले जाते, त्याचीच अशा प्रकारच्या दुर्घटना ही परिणती असते.