अग्रलेख

22-02-12

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि कॉंग्रेसने आपापले जाहीरनामे घोषित केले आहेत. या दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांचे जाहीरनामे हे सर्वसामान्य नागरिकांच्या मनाला साद घालणारे आणि गृहिणींपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व समाजघटकांना काही ना काही देण्याची ग्वाही देणारे आहेत यात शंका नाही. अर्थात, कागदावरील आश्वासने प्रत्यक्षात उतरवण्याची धमक सगळ्यांत असतेच असे नाही हे मतदारांना अनुभवाने पुरते ठाऊक झालेले आहेच. सरकार कोणाचे येणार व त्यात पुन्हा केवळ द्विपक्षीय युतीचे सरकार येणार की त्रिशंकू स्थितीत अपक्ष व इतर पक्षांच्या सदस्यांचा टेकू घेऊन नवे सरकार बनणार हाही प्रश्नच आहे. त्यामुळे या पक्षांच्या जाहीरनाम्याच्या अंमलबजावणीत ‘किमान समान कार्यक्रमा’चा अडसर तर येणार नाही ना ही शंकाही मतदारांच्या मनात आहेच. पुढे काय होईल ते होईल, परंतु दोही जाहीरनाम्यांतील आश्वासने कागदावर तरी आकर्षक नक्कीच आहेत.

21-02-12

जगभरामध्ये आज जागतिक मातृभाषा दिन साजरा होत आहे. एकीकडे नवनव्या तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार होऊन इंग्रजी भाषा जगातील सर्व भाषांवर कमी अधिक प्रमाणात हल्ला चढवीत सुसाट निघाली असताना आपापल्या मातृभाषांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा संदेश देण्यासाठी हा दिवस युनेस्कोच्या प्रेरणेने गेले एक तप साजरा केला जातो आहे. मातृभाषांपुढील आव्हाने अनेकपदरी आहेत. अगदी शिक्षणापासून प्रशासनापर्यंत आणि न्यायपालिकेपासून नव्या तंत्रज्ञानांपर्यंत सर्वत्र देशी भाषांना जेवढे महत्त्व दिले गेले पाहिजे तेवढे दिले जात नाही आणि भारतासारख्या वसाहतवादी परंपरा अजूनही मिरवण्यात धन्यता मानणार्‍या देशामध्ये तर परिस्थिती अधिक वाईट आहे. स्वभाषाभिमानाच्या पोकळ गर्जना आणि भाषा संवर्धनाच्या पोकळ वल्गना करणे वेगळे आणि प्रत्यक्ष जीवनव्यवहारामध्ये या भाषांना सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष समरांगणावर लढणे वेगळे. दुर्दैवाने आपल्याकडील नेतेबाजीच्या परंपरेने यातील पहिल्या गोष्टीतच आपला वेळ खर्ची घातला आहे. देशी भाषांना जीवनव्यवहारामध्ये महत्त्वाचे स्थान देण्याची मोहीम ज्या नेटाने आणि ताकदीने उभारली गेली पाहिजे होती, ते कधी घडलेच नाही. हिंदी भाषा सप्ताह साजरे करण्यापुरते आपले राष्ट्रभाषाप्रेम सीमित असते आणि मातृभाषेचे म्हणाल तर त्यांच्याकडे लक्ष द्यायलाही कोणाला वेळ नाही.

20-02-12

दहशतवादाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्र स्थापन करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तीव्र विरोध दर्शवून खीळ घातली आहे. केंद्र सरकारने या यंत्रणेची उभारणी करण्याचा घाट घालताना राज्य सरकारांना विश्वासात घेतलेले नाही आणि या प्रस्तावित केंद्राला दिलेले दिलेले थेट छापा टाकण्यापासून अटक करण्यापर्यंतचे अधिकार हा राज्यांच्या अधिकारांवरील घाला आहे असे दोन प्रमुख आक्षेप या मुख्यमंत्र्यांनी घेतले आहेत. विरोध करणारे मुख्यमंत्री केवळ विरोधी पक्षांचेच नाहीत, तर संयुक्त पुरोगामी आघाडीचा घटक पक्ष असलेल्या तृणमूल कॉंग्रेसनेही विरोधकांच्या सुरांत सूर मिळवलेला आहे, किंबहुना विरोध करण्यात ममता बॅनर्जीच सर्वांत आघाडीवर आहेत. पश्‍चिम बंगालमधील केंद्राच्या उद्घाटनालाही त्या काल अनुपस्थित राहिल्या. या सार्‍या विवादाचे मूळ केंद्र सरकार दाखवीत असलेल्या हुकूमशाही वृत्तीत आहे.

20-02-12

कालवी - हळदोणे येथे काल घडलेली बस दुर्घटना ही निव्वळ दुर्घटना नाही, तर ती मानवी निष्काळजीपणाची, बेफिकिरीची आणि गोव्यातील अत्यंत भ्रष्ट वाहतूक व्यवस्थेची परिणती आहे. प्रवाशांनी भरलेली एखादी बस सरळ फेरीधक्क्यावरून नदीत जाऊन कोसळते यामध्ये जशी चालकाची हलगर्जी दिसते, तसेच बसच्या सुस्थितीबाबतही प्रश्नचिन्ह उभे राहते. बसचे ब्रेक लागले नाहीत हे कारण पुढे करून या दुर्घटनेवर आता पडदा टाकण्याचा प्रयत्न होईल. दुर्घटनेस जबाबदार असलेला चालक न्यायालयात पुराव्यांअभावी सुटेल, मालक भरपाईपासूनही स्वतःची सुटका करून घेईल, पण बळी गेलेली कोवळी मुले काही परत येणार नाहीत. कित्येक कुटुंबांचा आशेचा दिवा कायमचा विझून गेला आहे. त्या मुलांचे पालक या जिवघेण्या दुःखातून कधीही सावरणे शक्य नाही. बुडालेल्या मुलांची शोधाशोध करताना सापडलेल्या त्यांच्या भिजल्या वह्या पाहून अवघ्या गोव्याचे डोळे काल पाणावले असतील. कोणताही दोष नसताना निष्पाप कोवळ्या शाळकरी मुलांना जिवंत जलसमाधी मिळाली, पुरेशा साधनसामुग्रीविना कोणीही त्यांना वाचवू शकले नाही, हे वास्तव ह्रदय पिळवटून टाकणारे आहे. भ्रष्ट वाहतूक अधिकार्‍यांच्या कृपेने मोडकळीस आलेल्या बसगाड्या राजरोस रस्त्यावर चालविल्या जातात, खुलेआम लाच घेऊन चालक - वाहकांना रान मोकळे सोडले जाते, त्याचीच अशा प्रकारच्या दुर्घटना ही परिणती असते.

18-02-12

महाराष्ट्रातील महापालिका निवडणूक निकालांमध्ये काल शिवसेना - भाजप - रिपाई महायुतीने मुंबई, ठाणे, नागपूरसारख्या प्रमुख महानगरपालिकांमध्ये आपली ताकद अधोरेखित केली. मुंबईमध्ये काय होणार, राज ठाकरे यांच्या मनसेचा वारू महायुतीमध्ये किती खिंडार पाडणार आणि त्याच्या आधारे कॉंग्रेस - राष्ट्रवादी युती सत्तेचा गड सर करणार का, असा जो प्रश्न विचारला जात होता, त्याचे उत्तर नकारार्थी देत शिवसेनेने आपल्या मुंबईवर पुन्हा भगवा फडकवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. ‘अँटी इन्कम्बन्सी’ ची लाट येईल आणि त्यात शिवसेना वाहून जाईल अशी स्वप्ने पाहणार्‍यांची निवडणूक निकालाने बोलती बंद केली आहे. ठाण्यात खासदार आनंद परांजपे यांची निवडणुकीच्या तोंडावरची बंडखोरी सोसूनही शिवसेनेने तेथील महापलिका काबीज केली. बाळासाहेबांच्या ठाणेकरांप्रतीच्या विश्वासाला मतदारांनी सार्थ ठरवले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची लाज नागपूरने राखली आहे. पुण्यात परिस्थिती वेगळी असली तरी इतरत्र मिळालेले यश सेना - भाजप - रिपाई महायुतीचा आत्मविश्वास वाढवणारे ठरेल यात शंका नाही.

17-02-12

गोवा विधानसभेच्या चाळीस जागांवर नजर ठेवून रणमैदानात उतरलेल्यांपैकी कितीजण प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात राहिले आहेत हे काल स्पष्ट झाले. जर - तर ची भाषा संपून आता प्रत्यक्ष कोण कोणाचा सामना करणार आहे ते सुस्पष्ट झाले आहे. त्यामुळे मतदारांना आपापल्या मतदारसंघातील उमेदवारांच्या भल्या - बुर्‍या बाजू चाचपण्यासाठी पुरेसा अवधी मिळायला हरकत नसावी. गोव्याचे राजकारण नैतिकता आणि प्रामाणिकपणा या बाबतीत किती ढासळत चालले आहे हे प्रत्येक मतदाराला पुरते ठाऊक आहे आणि तरीही दरवेळी निवडणूक आली की जाती-पातीच्या निकषांवर, आमिषा - प्रलोभनांना भुलून मतदार मतदान करीत असतात आणि मग मात्र अमूक भ्रष्टाचारी आहे, तमूक अकार्यक्षम आहे म्हणून खडे फोडत बसण्यावाचून त्यांच्या हाती काही राहात नाही. गोव्याची गेल्या काही वर्षांमध्ये कशी दुर्गती चालली आहे याचे प्रत्यक्ष साक्षीदार असूनही मतदार आपला मताधिकार बजावताना प्रत्यक्ष मतदानावेळी सारे काही विसरून क्षुल्लक वैयक्तिक लाभापोटी मतदान करू लागले तर ज्यांची पात्रता नाही अशी माणसे सत्तेच्या शिड्या चढत जाणारच. कोणी आपल्याला वापरून घेते आहे का, आपल्याला प्रलोभने दाखवीत स्वतःचा स्वार्थ साधते आहे का, याचा थोडा अंतर्मुख होऊन विचार मतदार करू लागला, तरच नंतर जो काही तमाशा घडतो तो टळू शकेल.

16-02-12

महाराष्ट्रातील मुंबई महानगरपालिकेसह १० महापालिकांची निवडणूक आज होत आहे. गेले काही महिने पंचायत समित्या व नगर परिषदा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमुळे जी रणधुमाळी उसळली आहे ती पाहाता या निवडणुकीसाठीही विलक्षण रस्सीखेच चालली आहे हे स्पष्टपणे दिसून येते. राजकीय पक्षांमध्ये तर राज्यातील विविध महापालिका आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी चढाओढ आहेच, परंतु काही नेत्यांच्या राजकीय भवितव्याचा फैसलाही या निवडणुका करणार असल्यामुळे विलक्षण चुरशीने आणि चढाओढीने जो तो रिंगणात उतरलेला आहे. सर्वांची नजर अर्थातच आहे ती मुंबईवर. शिवसेनेने आपला हा गड १९९४ सालापासून आजवर अभेद्य ठेवला असला तरी यावेळी त्या पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यात यावेळी उद्धव यांनी १३५ पैकी ९६ नव्या चेहर्‍यांना या निवडणुकीत उतरवलेले आहे. ‘अँटी इन्कम्बन्सी’ घटकाचा फटका बसू नये यासाठी ही खेळी असली तरीही त्याचा विपरीत परिणामही होऊ शकतो. ही निवडणूक सेेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या राजकीय नेतृत्वाची कसोटी ठरणार आहे.

16-02-12

दहशतवादाच्या काळ्या सावळ्या पुन्हा एकवार जगावर घोटाळू लागल्या आहेत. दिल्लीमध्ये परवा इस्रायलच्या दूतावासाच्या वाहनामध्ये घडवला गेलेला स्फोट, जॉर्जियामध्ये आढळून आलेली स्फोटके आणि काल बँकॉकमध्ये झालेली स्फोटमालिका या सार्‍या घटना पाहिल्या, तर हिज्बुल्लासारखी दहशतवादी संघटना पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसते. दहशतवादाविरुद्ध ठामपणे पाय रोवून असलेल्या इस्रायलला यावेळी लक्ष्य केले गेले आहे आणि त्याकामी हिज्बुल्लाला इस्रायलचा हाडवैरी असलेल्या इराणची फूस आहे असा तर्क व्यक्त होतो आहे. खुद्द इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिल्लीतील हल्ल्यानंतर त्वरित इराणकडे बोटे दाखवली. आजवर जगाला भेडसावणार्‍या दहशतवादी कारवायांचे केंद्र म्हणून पाकिस्तानकडे आणि अफगाणिस्तानचा उल्लेख केला जायचा, परंतु अमेरिकेने त्या दोन्ही देशांमध्ये आपला वावर वाढवल्याने आता इराणमध्ये इस्लामी दहशतवादी शक्ती एकवटू लागलेल्या दिसतात. आधीच आपल्या अण्वस्त्रसज्जतेच्या प्रयत्नांमुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या इराणकडून हिज्बुल्लाची पाठराखण चालते हे उघड गुपीत आहे.

14-02-12

पक्षाच्या उमेदवारीसाठी आधीच गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भल्या भल्यांचा पत्ता कॉंग्रेसने अंतिम क्षणी काटला. फातोर्डा आणि काणकोणच्या उमेदवारीकडे डोळा लावून बसलेल्या दोघा ‘विजयां’चे जवळजवळ निश्‍चित मानले जाणारे तिकीट ऐनवेळी काढून घेण्यात आले. विजय सरदेसाई यांनी तर आपल्या प्रचाराला सुरूवात केली होती. प्रचाराची गाणीही तयार केली होती. प्रचार कार्यालयाचे उद्घाटन त्यांनी खुद्द मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना बोलावून केले होते, त्यामुळे त्यांचे तिकीट निश्‍चित आहे असेच मानले जात होते, परंतु कॉंग्रेस संस्कृतीमध्ये कोण कोणाचा कधी कसा गळा कापेल हे कधीच सांगता येत नाही. त्यामुळे सरदेसाई यांना शेवटच्या क्षणी डावलले गेले आणि पक्षाचे निष्ठावंत एम. के. शेख यांना उमेदवारीची लॉटरी फुटली. शेख यांची पक्षनिष्ठा वादातीत आहे, परंतु या निष्ठेपेक्षा त्यांच्या अल्पसंख्यक असण्याचा त्यांना ही उमेदवारी मिळण्यात अधिक वाटा आहे असे दिसते. काही मतदारसंघांतून तरी कॉंग्रेस उमेदवारी मुस्लीम उमेदवारालाच मिळायला हवी असा आग्रह त्यांच्या विविध संघटनांनी गेला बराच काळ धरला होता आणि त्यामुळे काही मतदारसंघांमध्ये अशी उमेदवारी देण्यासाठी कॉंग्रेसवर यावेळी मोठा दबाव होता.

13-02-12

वेळ्ळीच्या धर्मगुरूंवरील छाप्याप्रकरणी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी व निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांनी माफी मागावी असा हट्टाग्रह काही राजकारण्यांनी आणि धर्मगुरूंनी धरला आहे. माफी मागली जाणार नसेल तर वेळ्ळीतील साडेपाच हजार नागरिक मतदान करणार नाहीत अशी धमकीही यासंदर्भात दिली गेली. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन राजकारणीही तापल्या तव्यावर पोळी भाजून घेण्यासाठी त्यात उतरले आणि शांताराम नाईकांपासून सुभाष शिरोडकरांपर्यंत सर्वांनी तत्परतेने हे छापे कसे गैर होते हे सांगण्यात आपली शक्ती खर्ची घातली. निवडणूक काळात एखाद्या उमेदवाराच्या वतीने मतदारांना पैसे वाटले जात असतील तर छापा टाकून अशी रक्कम तात्काळ जप्त करावी असे निवडणूक आचारसंहिता सांगते. वेळ्ळीचे धर्मगुरू अशा प्रकारे मतदारांना पैसे वाटत असल्याची एक निनावी तक्रार निवडणूक आयोगाकडे आली आणि त्यांच्या भरारी पथकाने आयकर अधिकार्‍यांसह तेथे छापा मारला. प्रत्यक्षात तेथे पैसेवाटप चालल्याचे त्यांना काही आढळून आले नाही.