भाजपने दिल्लीतील तीन नगरपालिका निवडणुकांत १६० जागा मिळवीत राज्यात सत्तेवर असलेल्या आम आदमी पार्टी व विरोधी कॉंग्रेसचा साफ धुव्वा उडवला. या पालिकांमध्ये भाजपच्या नगरसेवकांची एकूण संख्या १३८ एवढी होती. तिन्ही पालिकांवर यामुळे भाजपचा झेंडा फडकला आहे. दरम्यान आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.
आम आदमी पार्टीने राज्याची सत्ता हाती घेतल्यानंतर झालेल्या या निवडणुकीला एक वेगळे महत्व प्राप्त झाले होते. या निवडणुकीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगलेल्या कॉंग्रेसच्या वाट्याला निराशा झाली. अपयशाची जबाबदारी स्वीकारून प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी पदाचा राजीनामा दिला.
दरम्यान, भाजपने आपली विजयी कामगिरी सुकमातील सीआरपीएफच्या हुतात्म्यांना समर्पित केल्याचे जाहीर केले आहे. जवानांच्या हौतात्म्याच्या वेदनात आपल्या मनात अजूनही ताज्या आहेत अशी प्रपिक्रिया भाजपचे दिल्ली प्रमुख मनोज तिवारी यांनी व्यक्त केली. भाजपचा हा विजय म्हणजे दिल्लीच्या लोकांनी नकारात्मक राजकारणाला मान्यता नसल्याविषयी दिलेला संकेत आहे असे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे.
तीन पालिकांत भाजपचे संख्या बळ
उत्तर – १०४ पैकी ६४
दक्षिण – १०४ पैकी ७०
पूर्व – ६४ पैकी ४८