राम मंदिर प्रश्‍न चर्चेद्वारे सोडवा

0
93

>> सर्वोच्च न्यायालयाची सूचना

अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्‍न धर्म व आस्थेशी जोडलेला असल्याचे नमून करीत दोन्ही पक्षांनी सामंजस्याने या वादावर तोडगा काढावा अशी महत्त्वपूर्ण सूचना सर्वोच्च न्यायालयाने काल केली. गरज भासल्यास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मध्यस्थ म्हणून काम पाहतील असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
अयोध्येतील राम मंदिराचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने यावर तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशी याचिका सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. सदर याचिकेवर सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणीस झाली असता न्यायालयाने वरील सूचना केली. याचिकाकर्ते सुब्रमण्यम स्वामी यांना न्यायालयाने सांगितले की, राम मंदिराचा प्रश्‍न संवेदनशील असल्याने या प्रश्‍नावर चर्चेतून तोडगा काढणे उचित ठरेल. त्यामुळे सर्व पक्षकारांनी एकत्र येऊन चर्चेद्वारे तोडगा काढायला हवा, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले. राम मंदिर व बाबरी मशीद वादावर यापूर्वीही चर्चेद्वारे तोडगा काढण्याचे प्रयत्न झाले होते. त्यामुळे या वादावर न्यायालयाने हस्तक्षेप आवश्यक असल्याचा युक्तिवाद सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. यावर नव्याने चर्चेला सुरुवात करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय मध्यस्थी करायला तयार असल्याचे न्यायालयाने सांगितले. अयोध्या प्रकरणात अलाहाबाद सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०१० रोजी निर्णय देताना हिंदू व मुस्लीम समाजाची वादग्रस्त जागेवर संयुक्त मालकी असल्याचे म्हटले होते.