कारगिल विजय दिन

0
181

कृष्णा महादेव शेटकर (माजी नौसैनिक)

सहा सहा महिने बर्फाळ प्रदेशात बंकरमध्ये राहून शत्रूच्या हालचालीवर डोळ्यात तेल घालून तू ‘पहारा देत असतोस. शत्रूपासून देशाचे रक्षण करणे हाच तुझा निर्धार असतो. हे तुझे देशाकरता योगदान लक्ष्यात घेऊन सरकारने तुझ्या निवृत्तीनंतर तुला योग्य तो सन्मान द्यावा. तुझे भविष्यातील जीवन सफल व्हावे, अशी सदिच्छा व्यक्त करतो. जय जवान!

समुद्रसपाटीपासून नऊ हजार मीटरवर असलेले लडाखमधील बर्फाच्छादित पर्वतात वसलेले कारगिल हे शहर जिथे ऑक्सीजनचा तुटवडा नेहमीच जाणवतो. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदा बर्फ पडायला सुरुवात झाली की सात-आठ महिने कोणालाही घरातून बाहेर पडणे दुरापास्त होते.
श्रीनगर ते लेह रस्ता बर्फामुळे बंद होत असल्यामुळे उर्वरित भागाशी असलेला संपर्कच तुटतो व हीच वेळ साधून पाकिस्तानची घुसखोरी १९४८ सालापासून सुरू आहे.
कारगिल पर्वतमय प्रदेशाची उंची समुद्रसपाटीपासून जवळजवळ आठ ते नऊ हजार मीटर असल्यामुळे थंडीच्या दिवसात तेथील तापमान उणे चाळीस अंश सेल्सियस असते. कडाक्याच्या थंडीबरोबर श्‍वासोच्छ्वासाला त्रास होतो.
सप्टेंबर – ऑक्टोबरमध्ये बर्फ पडण्यास प्रारंभ झाला की सरहद्दीवरील भारतीय जवान आपली ठाणी सोडून खाली येतात. मे मध्ये बर्फ वितळू लागल्यावर पुन्हा ठाण्यामध्ये मुक्काम हलविण्यात येतो. १९९९ साली उन्हाळा लवकर सुरू झाल्यामुळे पाकिस्तानी घुसखोर भारतीय हद्दीत आपले जवान ठाण्यात पोहचण्याअगोदरच घुसले व जे बंकर भारतीय जवानांनी खोदलेले होते ते बंकर बळकावले होते.
घुसखोरांना पूर्णपणे पिटाळून लावण्याकरता ऑपरेशन विजय २६ जुलै १९९९ रोजी पूर्णपणे सफल झालेले होते. कारगिलच्या दर्‍याखोर्‍यातून शत्रूला पूर्णपणे घालवून दिलेले होते.
ऑपरेशन विजय संघर्षात ४०७ भारतीय सैनिकांना वीरमरण तर ६ जण बेपत्ता व ५८४ सैनिक जखमी झाले होते.
कारगिलमध्ये ऑपरेशन विजयमध्ये शौर्यशाली कामगिरी बजावल्याबद्दल भारतीय लष्करातील चार अधिकारी कॅप्टन विक्रम बात्रा, कॅप्टन मनोजकुमार पांडे, ग्रेनिडियर योगेंद्रसिंग यादव (सर्व मरणोत्तर) यांना तसेच रायफलमान संजय कुमार यांना सर्वोच्च परमवीर चक्र किताबाने सन्मानित करण्यात आले. याखेरीज ऑपरेशन विजयमधील स्पृहणीय कामगिरीबद्दल ९ जणांना सेना पदके व एकाला सेवा पदकाने भूषविण्यात आले. तसेच मेजर सोनम बांगचूक, मेजर विवेक गुप्ता, मेजर राजेंश सिंग (मरणोत्तर), कॅप्टन अनुज नायर (मरणोत्तर), कॅप्टन नाईकेशारा केंघुशे (मरणोत्तर), लेफ्टनंट बलदेवसिंग (मरणोत्तर), नायक मोहिंदर पुरी, ब्रिगेडियर प्रकाशचंद्र कटोल, ब्रिगेडियर अमरनाथ राऊळ या सर्वांना महावीर चक्राने भूषविण्यात आले.
याशिवाय १८२ जणांना शौर्य पुरस्कार घोषित करण्यात आले. त्यात सहा जणांना कीर्ती, दोघांना वीर, २६ जणांना वीरचक्र, १४३ जणांना सेवापदके, तिघांना नौसेना व दोघांना युवा सेवा पदकांनी सन्मानित करण्यात आले.
ज्या बहादुरांनी ही परमवीर चक्रे मिळविली त्यातील एक होते ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव, जे ग्रेनेडियर्समध्ये नियुक्त होते.
योगेंद्रसिंह यांचा जन्म १० मे १९८० ला बुलन्द शहर उत्तर प्रदेशच्या औरंगाबाद गावात झाला. त्याचे वडील करनसिंह यादवही एक भूतपूर्व सैनिक होते. ते कुमायूँ रेजीमेंटशी जोडलेले होते आणि १९६५ तसेच १९७९ च्या लढाईत त्यांनी भाग घेतला होता.
पित्याच्या या पराक्रमामुळे योगेंद्र सिंह यादव तसंच त्याचे मोठे बंधू जितेंद्र दोघांनाही फौजेत जाण्याची जबरदस्त इच्छा होती. दोघांच्याही इच्छा पूर्ण झाल्या. योगेंद्रसिंह यादव जेव्हा सैन्यात नियुक्त झाले तेव्हा ते फक्त साडेसोळा वर्षांचे होते. एकोणीसाव्या वर्षी ते परमवीर चक्रविजेता बनले.
पाकिस्तानबरोबर भारतानं जी चार युद्धे केली, त्यात कारगिलचं युद्ध बर्‍याच कारणानं विशेष म्हटलं जातं. एक तर हे युद्ध फार कठीण आणि उंच शिखरावर लढलं गेलं जी बर्फानं झाकलेली आणि दुर्गम होती. त्याचबरोबर हे युद्ध पाकिस्तानच्या मोठ्या तयारीचा परिणाम होता.
कारगिलच्या युद्धात भारताच्या चार पराक्रमी योद्ध्यांना परमवीर चक्र देण्यात आले. ज्यात एक कॅप्टन मनोजकुमार पांडे होते. त्यांनी खालूबारमध्ये आपलं शौर्य दाखवलं.
मनोजकुमार पांडे यांचा जन्म २५ जून १९७५ मध्ये सीतापूर जिल्ह्यातील रूधा गावात झाला. त्यांचे वडील गोपीचंद पांडे व आईचे नाव मोहिनी होते. मनोजचं शिक्षण सैनिकस्कूल लखनौमध्ये झालं. तिथूनच त्यांच्यात शिस्त आणि देशप्रेमाची भावना उत्पन्न झाली, जी त्यांना सन्मान व उत्कर्षापर्यंत घेऊन गेली.
मनोज सैन्यात एक कमीशन्ड ऑफिसर झाल्याबद्दल आईवडलांना अभिमान वाटत असे.
सैनिकाचे घडण मुख्यत्वे त्याच्या प्रशिक्षणातून होते. संपूर्ण लष्करी जीवनात तो फक्त प्रशिक्षणच घेत असतो. सामान्य जनतेची हीच तर शंका असते. अनेक जण म्हणतात, ‘‘तुम्ही लष्करातले लोक करता काय?’’ उत्तर एकच. ‘’शांततेच्या काळात प्रशिक्षणात गाळलेला घाम युद्धात रक्ताचा थेंब वाचवतो’’. हा एक अत्यंत अर्थपूर्ण वाक्‌प्रचार. ज्या लष्कराने कसून प्रशिक्षण घेतलेले आहे ते लढाईत केव्हाही शत्रूवर सरशी करतील.
रे सैनिका! आपल्या नातेवाईकापासून हजारो योजने दूर शत्रूचा संहार करण्यासाठी तू जेव्हा शत्रुपुढे हत्यार घेऊन उभा असतोस, तेव्हा तो समोरचा शत्रू त्याचा तुला शिरच्छेद करायचा असतो. सहा सहा महिने बर्फाळ प्रदेशात बंकरमध्ये राहून शत्रूच्या हालचालीवर डोळ्यात तेल घालून तू ‘पहारा देत असतोस. शत्रूपासून देशाचे रक्षण करणे हाच तुझा निर्धार असतो. हे तुझे देशाकरता योगदान लक्ष्यात घेऊन सरकारने तुझ्या निवृत्तीनंतर तुला योग्य तो सन्मान द्यावा. तुझे भविष्यातील जीवन सफल व्हावे, अशी सदिच्छा व्यक्त करतो. जय जवान!