३७१ व्या कलमाला हात लावणार नाही : अमित शहा

0
142

ईशान्य भारतातील राज्यांना विशेष राज्य दर्जा देणार्‍या घटनेतील ३७१ व्या कलमाला हात लावला जाणार नाही अशी ग्वाही काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. आसामात अलीकडेच एनआरसीची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर अमित शहा यांनी प्रथमच काल आसामचा दौरा केला. तेथील नॉर्थ ईस्ट कौन्सिलच्या बैठकीस ते उपस्थित राहिले. ३७१व्या कलमाला भारतीय घटनेत विशेष स्थान आहे. व भाजप सरकार त्याचा आदर करते असे शहा यावेळी म्हणाले.

भारतीय राज्य घटनेत ईशान्येकडील राज्यांना देण्यात आलेल्या विशेषाधिकारांच्या ३७१व्या कलमाला विशेष स्थान देण्यात आले असून भाजप त्याचा आदर करते. भाजप सरकार त्यात कोणताही बदल करणार नाही. जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देण्यात आलेले कलम ३७० आणि ईशान्येकडील राज्यांसाठीचे ३७१ वे कलम या दोन्हीत मोठा फरक आहे. ३७० मधील तरतुदी तात्पुरत्या स्वरुपाच्या होत्या असे शहा म्हणाले.

३७० वे कलम रद्द झाल्यानंतर ३७१ कलमाबाबतही तर्कवितर्क सुरू झाले होते. ३७१ कलमांतर्गत अन्य भारतीयांना त्या राज्यांत मालमत्ता खरेदी करता येत नाही.