१ ते १४ सप्टेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा केंद्राचा विचार

0
198

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा आणि शैक्षणिक संस्था टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. दि. ३१ ऑगस्ट रोजी लॉकडाऊन संपल्यानंतर दि. १ ते १४ सप्टेंबर दरम्यान शालेय संस्था सुरू करण्याचा केंद्राचा विचार आहे. त्यासाठी केंद्र सरकार दि. ३१ ऑगस्ट रोजी निर्बंध शिथिल करत नव्या गाइडलाइन्स प्रसिद्ध करणार आहे. त्यावेळी ही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या बैठकीत शाळा सुरू करण्याच्या योजनेवर चर्चा झाली.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची घोषणा कऱण्यात आली आणि शाळा बंद झाल्या. दि. २३ मार्चपासून संपूर्ण देशभरातील शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद आहेत. तेव्हापासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. ३१ ऑगस्ट रोजी जाहीर होणार्‍या अनलॉकच्या नव्या गाइडलाइन्समध्ये याचा समावेश असण्याची शक्यता आहे. यावेळी राज्यांना शाळा सुरू करण्यासंबंधी सांगितले जाऊ शकते मात्र विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत कसे आणि केव्हा आणायचे याचा निर्णय राज्य सरकारकडे असेल. शाळा आणि शैक्षणिक संस्थांसाठी विस्तृत मानक कार्यप्रणाली प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये जुलै महिन्यात शाळा शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणाचाही सहभाग असेल.

केंद्र सरकारची योजना
केंद्र सरकारची जी योजना आहे त्यानुसार पहिल्या १५ दिवसांमध्ये १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यास सांगितले जाणार आहे. यानंतर वेळमर्यादेत सहावी ते नववीचे वर्ग सुरू केले जाऊ शकतात. एका इयत्तेतील सर्व तुकड्यांना एकाच दिवशी शाळेत बोलावले जाणार नाही.

शाळांना ८ ते ११ व १२ ते ३ अशा दोन पाळ्यांमध्ये काम करण्यास सांगितले जाऊ शकते. सॅनिटाइज करण्यासाठी एक तास दिला गेला आहे. मात्र प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्याबद्दल कोणतीही योजना नाही.