हितकारक नारळपाणी

0
135

नारळपाणी म्हणजे नैसर्गिक उत्तम पेय, असे आपण म्हणतो. केरळ आणि महाराष्ट्रातील कोकण भागात सहज उपलब्ध होणारे हे फळ अतिशय आरोग्यदायी आहे. आपल्याकडे आजारी किंवा अशक्त व्यक्तीला नारळपाणी आवर्जून दिले जाते. मात्र दैनंदिन व्यवहारात प्रत्येकाने नारळपाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय हितकारक असते. नारळपाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. तसेच रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. मात्र नारळपाणी पिण्याची योग्य वेळ कोणती याबाबत बरेचदा संभ्रम असल्याचे दिसते. काही जण म्हणतात नारळपाणी सकाळी प्यावे तर काही म्हणतात ते संध्याकाळी प्यायलेले अधिक चांगले. मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सकाळच्या वेळेस नारळपाणी पिणे शरीरासाठी लाभदायक असते. सकाळी नारळपाणी प्यायल्यास दिवसभर शरीराला स्फूर्ती मिळते.
फायदे
१. एक कप नारळपाण्यात २९५ मिलिग्रॅम पोटॅशियम असते. हृदयाच्या ठोक्यांच्या नियमिततेसाठी पोटॅशियम हे खनिज गरजेचे असते. मेंदू आणि स्नायूंसाठीही नारळपाणी चांगले असते.
२. थायरॉईडच्या हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी नारळपाणी अतिशय उपयुक्त असते. त्यामुळे ज्यांना थायरॉईड होण्याचा धोका आहे किंवा झालेला आहे त्यांनी आहारात नारळ पाण्याचा आवर्जून समावेश करावा.
३. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी नारळपणी अतिशय उत्तम काम करते. त्यामुळे नियमित नारळपाणी प्यायल्यास विविध आजारांपासून आपला बचाव होण्यास मदत होते.
४. अनेकांना लठ्ठपणाची समस्या असते. अशांनी नियमित नारळपाणी प्यायल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. नारळपाण्याने दिर्घकाळ भूक लागत नाही त्यामुळे कमी खाल्ले जाते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
५. किडनीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नारळपाण्याचे सेवन करणे चांगले असते. यामुळे मुतखड्याचा त्रास उद्भवण्याची शक्यता कमी होते.
६. यात मॅग्नेशियम, सोडियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियमसारखी खनिजे असतात. त्यामुळे इतर कोणतेही सॉफ्टड्रिंक घेण्यापेक्षा नारळपाणी घेणे कधीही उत्तम.
नारळपाणी प्यायल्याने त्वचेलाही फायदा होतो. त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो. कोणत्याही ऋतूमध्ये नारळपाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. नारळपाणी प्यायल्याने अँटीएजिंगची समस्या दूर होते. सलग १४ दिवस नारळपाणी प्यायल्यास पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर होतात.