स्तन्यपानाबद्दल गैरसमज दूर व्हावेत

0
683
  •  डॉ. मनाली म. पवार
    (गणेशपुरी, म्हापसा)

ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा ‘जागतिक स्तन्यपान सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. स्तन्यपान हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे. यासाठी स्तन्यपानाबद्दलच्या सर्व गैरसमजुती दूर करुन बाळंतिणीने स्वतःच्या आहार -आचरणाकडे लक्ष द्यावे.

स्तन्यपान करत असताना बाळंतिणीच्या शरीरात ‘ऑक्सिटोसिन’ या संप्रेरकाचे स्रवण होते. बाळंतपणात गर्भाशयाचा वाढलेला आकार कमी होण्यास या संप्रेरकामुळे मदत मिळते. बाळंतपणात स्रीचे वाढलेले वजन घटण्यासाठी त्याचा फायदा होतो.

ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा ‘जागतिक स्तन्यपान सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. स्तन्यपान हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे. स्तन्यपान म्हणजे ‘अमृतपान’ असे आयुर्वेद शास्रात सांगितले आहे आणि आता तर स्तन्यपानाचे महत्व संपूर्ण जगाने मान्य केले आहे. पण तरीही आपल्या भारतासारख्या संस्कारमय देशात अजूनही स्तन्यपानाबद्दल काही गैरसमज आहेत. हा लेख समस्त गर्भिणी (होणार्‍या मातांसाठी), प्रस्ाूत झालेल्या मातांसाठी व मातांना आधार देणार्‍या आप्तांसाठी त्यांच्या शंकांच्या निरसनासाठी होय.

स्तन्यपानाबाबत काही भ्रामक शंका

* सौंदर्याच्या भ्रामक कल्पनेला बळी पडून वा अन्य कोणत्याही कारणाने स्तन्यपान न करण्याचा निर्णय घेणे हे आई व बाल या दोघांच्याही शारिरीक, मानसिक व हॉर्मोन्सच्या संतुलनात बिघाड आणणारे असते.

* बालकाला स्तन्यपान केल्यास स्तन ढिले होतात, खाली उतरतात, सुरकुत्या येतात व स्रीच्या सौंदर्याला बाधा येते असे काहीसे गैरसमज अनेक स्त्रियांचे असतात. आयुर्वेद शास्राप्रमाणे योग्यप्रकारे गर्भिणी परिचर्या व प्रसूतिपरिचर्येचा अवलंब केल्यास स्रीचे आरोग्य नीट राहते व बांधाही सुडौल बनतो. त्यासाठी गर्भिणी अवस्थेत व प्रसूतिपश्‍चातसुद्धा तिळ तेल, बला तेल किंवा खोबरेल तेलाने स्तनांना गोलाकार स्नेहन करावे.

* प्रसूतीपश्‍चात् स्रीमध्ये स्त्रवणारे घट्ट दूध बर्‍याच वेळा बाळाला पाजले जात नाही. काहींची अशी समजूत असते की हे दूध पचायला जड असते. पण खरे पाहता नवजात बाळासाठी मातेच्या दुधाइतके चांगले अन्न दुसरे नाही. हे दूध पचायला हलके असते. आईच्या दुधाला गाईच्या दूधाचा किंवा अन्य कसलाही पर्याय नाही. मातेला येणारे पहिले घट्ट दूध म्हणजे ‘कोलोस्ट्रम’ हे पिवळसर रंगाचे असते. ते बाळासाठी अमृतच असते. या दूधात बाळाला आवश्यक असणारी सर्व पोषणमूल्ये मिळतातजसे- पाणी, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, जीवनसत्वे, खनिजे आणि इतर अनेक पोषक घटक मिळतात. आयुर्वेद शास्रामध्ये म्हणूनच स्तन्याला ‘पूर्णान्न’ म्हटलेले आहे. महत्त्वाचे म्हणजे व्याधिप्रतिकारशक्ती या दूधामुळे वाढते. बाहेरच्या संसर्गाच्या विरोधातील रोगप्रतिकारशक्ती तयार करण्याची ‘प्रतिपिंडे’ या दूधातून मिळतात. त्यामुळे बाळाचे संसर्गजन्य आजारांपासून सरंक्षण होते. केवळ लहानपणीच नाही, तर मोठेपणीही मधुमेह, हृदयरोग, अस्थमा, ऍलर्जी अशा विविध आजारांपासून बाळाचा बचाव करण्यासाठी ‘कोलोस्ट्रम’ पाजणे आवश्यक आहे.

* सध्या सिझेरिअनद्वारे प्रसूति करण्याचे प्रमाण भरपूर वाढले आहे, त्यामुळे सिझेरिअननंतर तिला विश्रांतीची गरज आहे; तिला सलाइन चालू आहे; तिने काही खाल्ले नाही; तिला औषधे चालू आहेत; तिला बसता येत नाही; तिला अजून दूध आले नाही… अशा अनेक गैरसमजांमुळे पहिले तीन दिवस बाळाला स्तन्यपान दिले जात नाही किंवा स्तन्यपानाला मदत करण्याची कुणी उत्सुकता दाखवत नाही. प्रसूतीपश्‍चात लगेचच बाळाला बाळ भुकेमुळे रडते म्हणून ग्लूकोज पाणी किंवा डबाबंद पावडरचे दूध चालू करण्यात येते. जेव्हा चौथ्या दिवशी बाळाला माता स्तन्यपानासाठी धरते तेव्हा स्तनामध्ये दूध येऊन स्तन घट्ट झालेले असतात व बाळ दूध ओढू शकत नाही. बाळाला स्तन नीट पकडता येत नाही.

* स्तन्यपान हे फक्त आईचे काम नाही. त्यासाठी तिला पोषक वातावरण व योग्य आहार याची गरज असते. तिला कुटुंबाचा, समाजाचा त्याचप्रमाणे आरोग्यसेवेचा आधार जरुरीचा आहे. प्रसूतिगृहांचे महत्त्व यामध्ये अनन्यसाधारण आहे. सुरुवातीच्या तीन दिवसात तज्ज्ञ डॉक्टरांची तिला मदत मिळायला हवी व त्यानंतरही मातेने डॉक्टरांच्या संपर्कात रहायला हवे. सुरवातीचा काळ हा बहुतांशी कठीणच असतो. खूप जणींनी नवजात बाळ हातातसुद्धा धरलेले नसते. अशावेळी प्रसूतिगृहातील मावशींनीसुद्धा- ‘तुझे स्तनाग्रे चपटे आहेत. त्यामुळे तुला स्तन्यपान करता येणार नाही’ किंवा नातेवाईकांनी- ‘बाळ रडते म्हणजे तुझे दूध बाळाला पूरत नाही’.. असे शेरे मारु नयेत. त्यात मातेचा आत्मविश्‍वास डळमळायला लागतो आणि वरचे दूध बाळाला चालू केले जाते. बाटलीचे दूध हे बाळाला सहज ओढता येेते, त्यामुळेे स्तन्यपानाला लागतात तसे कष्ट करावे लागत नाहीत. तसेच मातेचे स्तनाग्र व बाटलीचे निप्पल यात बाळाचा गोंधळ होऊन ते स्तन नाकारते.

* वरचे दूध बाळाला पाजायला लागल्यापासून बाळ शांत झोपले म्हणजे आईचे दूध बाळाला पूरत नव्हते असा सर्वांचा समज होतो. वरचे दूध हे बाळाला पचायला जड असते, त्यामुळे ते तीन- चार तास झोपते. आईचे दूध पचायला हलके असल्यामुळे एक-दीड तासात बाळ परत दूध मागते. याचा अर्थ- ‘आईच्या दुधाने बाळाचे पोट भरत नाही’ असा चुकीचा काढला जातो. खरे तर, आईने बाळाला भूक लागली की लगेच पाजावे. मग ते अर्ध्या तासाने असो वा दोन-तीन तासाने असो. तसेच दोन स्तन्यपानामधील वेळेचे अंतर वाढवू नये. स्तन्यपानादरम्यान आई व बाळाच्या त्वचेला होणारा परस्पर स्पर्श व आई- बाळाची एकमेकांना भिडणारी नजर आई व बाळात एक रेशमी बंध निर्माण होण्यास मदत करतो. म्हणूनच नैसर्गिक प्रसूनिपश्‍चात् १५ मि.नी बाळाला स्तन्यपान द्यावे व सिझेरिअन्‌नंतर ३०-४० मिनिटांनी स्तन्यपानासाठी आईला मदत करावी.

* बाळाला आईच्या दुधाची ऍलर्जी आहे… असे म्हणून काही वेळा बाळाला वरचे दूध पाजण्याचा सल्ला दिला जातो. दुधाची ऍलर्जी, तीही मातेच्या दुधाची ऍलर्जी ही खरे पाहता चमत्कारी व आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणावी. आयुर्वेद शास्रामध्ये काही स्तन्यदुष्टी सांगितली आहेत त्याचे मुख्य कारण बाळंतिणीचा आहार-विहार असतो. योग्य वैद्यांच्या सल्ल्याने तिच्या आहारात- विहारात बदल करुन स्तन्यांमधील दुष्टी घालवता येते. त्यासाठी आईच्या दुधाची बाळाला ऍलर्जी आहे म्हणून स्तन्यपान बंद करायची गरज नाही.
तान्ह्या बाळासाठी आईचे दूध हा सर्वांग परिपूर्ण आहार असतो. आईच्या दुधाला तोड नाही. आईचे दूध बाळाला पचत नाही असे सहसा होत नाही. मुले मोठी झाल्यावर दुधामध्ये कॉम्प्लान, बूस्ट, हॉर्लिक्स घालून स्मरणशक्ती, बुद्धी वाढते म्हणून दूध प्यायला देण्यापेक्षा स्तन्यपानच महत्त्वाचे.

* बहुतेक पालक बाळाची उंची व बाळाचे वजन यावरुनच बाळाचा विकास ठरवतात. लठ्ठपणा व गुटगुटीतपणा यात गफलत करतात. बाळ शरीर नीट धरत नाही म्हणजे दूध अपुरे पडते या भ्रमात आई दूध द्यायचे कमी करते किंवा तिला वाटते आपले दूध कमी झाले आहे व म्हणून बाहेरचे, डबाबंद किंवा गाईचे दूध द्यायला सुरवात करते. अशाने बाळाचे वजन तर वाढते पण बाळ लठ्ठ होतो सुदृढ नव्हे; कारण वजन हे वाढीचे परिमाण नाहीच मुळी! बाळाची दृष्टी तेज आहे का, बाळाचे कान सूक्ष्म ऐकू येईल असे बनत आहेत का, सूक्ष्म वास त्याला येतो की नाही, त्याला चव कळते की नाही, त्याची जागरुकता किती आहे, त्याचे मल-मूत्र विसर्जन कसे आहे… याही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. म्हणून फक्त वजन वाढण्यासाठी म्हणून वरचे दूध पाजू नये.

* स्तनाग्रांना भेगा पडल्यास काही माता दूध पाजत नाही. काहींच्या मते बाळाला इन्फेक्शन होते. पण स्तनाग्रांना भेगा पडल्यास व्रणरापण तेल किंवा शतधौत घृत लावल्याने व्रण भरुन येतात. तेल किंवा तूप लावल्यावर दूध पाजताना स्वच्छ पुसून स्तन्यपानाला धरावे. स्तन्यपान बंद करण्याची गरज नसते.
बाळाला आईचे दूध चालू असताना आईचा आहार सकस व षड्‌सपूर्ण असावा. चटकदार अन्न नसावे. आईने घेतलेल्या आहाराचा परिणाम स्तन्यावर होतो व बालकाचे पोट फुगणे, लाळ गळणे, उलटी होणे, शौचाला पांढरे होणे, शौचाला न होणे असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे अशा परिस्थितीत आईने आपला स्वतःचा आहार बदलावा. स्तन्यपान बंद करु नये.

स्तन्यपानाची महती

अयुर्वेदात स्तन्याला ‘पयोऽमृत’ म्हटले आहे, म्हणजे अमृताची उपमा स्तन्याला दिलेली आहे. कारण बाळासाठी आईचे स्तन्य हे पूर्णान्नाप्रमाणे असते. बाळाच्या जन्मानंतर लगेचच पहिले स्तन्यपान करणे प्रशस्त समजले जाते. कारण या वेळेत प्यायला घेतल्यास बाळ दूध ओढण्याची क्रिया अगदी सहजपणे करु शकते आणि एकदा ही क्रिया नीट जमली की नंतर स्तन्योत्पत्ती सहज व व्यवस्थित होण्यासही मदत मिळते. पहिले सहा महिने बाळाला फक्त स्तन्यपान देणे हे बाळाच्या पोषणासाठी, तसेच त्याच्या भावी आरोग्यासाठी उत्तम असते.
– स्तन्य बाळाच्या सवयीचे, त्याच्या शरीरात विनासायास स्वीकारले जाणारे असते. त्यामुळेच आरोग्यदायक असते.
– बाळासाठी आवश्यक असणारी सर्व तत्वे स्तन्यात असल्याने स्तन्यपानाने बाळाची पुष्टी होते.
– आई जो काही पौष्टिक आहार, रसायने किंवा औषधे सेवन करते त्याचा साररुपी अंश स्तन्यामार्फत बाळाला मिळतो. त्यामुळे बाळाची प्रतिकारशक्ती तसेच त्याचा बौद्धिक, मानसिक व शारिरिक विकास सहज व उत्तम प्रकारे होतो.
– आईच्या दुधाबरोबरच तिचे प्रेम बाळाला मिळाल्याने बाळाला सुरक्षितता अनुभूत होते, ज्याचा त्याला पुढे आयुष्यभर उपयोग होतो.
– बाळ स्तनातून दूध पीत असल्याने दूध खराब होणे, शिळे होणे, जंतुससर्ग होणे, फार गरम वा फार थंड या प्रकारच्या बाहेरच्या दुधामध्ये उद्धवू शकणार्‍या समस्या स्तन्यपानाच्या बाबतीत उद्भवण्याचा प्रश्‍नच येत नाही.
– आधुनिक संशोधनानेही आज सिद्ध झाले आहे की सुरुवातीपासून आईचे दूध पिणार्‍या मुलांची रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहते व शरीर पोषणही व्यवस्थित होते.
– स्तन्यपानाने भावी पिढ्यांचे कुपोषण होण्याचे टळते.
– स्तन्यपानामुळे जसे संसर्गजन्य रोगांपासून सरंक्षण मिळते तसेच पुढे जाऊन मधुमेह, कर्करोग, रक्तदाब इत्यादी रोग होण्याचे प्रमाण कमी होते.
– स्तन्यपानाचे प्रमाण अख्ख्या जगातच वाढले, तर प्रत्येक वर्षी बालमृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते.

आईलाही फायदा

स्तन्यपानाचा आईलाही फायदा होतो. स्तन्यपान करत असताना बाळंतिणीच्या शरीरात ‘ऑक्सिटोसिन’ या संप्रेरकाचे स्रवण होते. बाळंतपणात गर्भाशयाचा वाढलेला आकार कमी होण्यास या संप्रेरकामुळे मदत मिळते. बाळंतपणात स्रीचे वाढलेले वजन घटण्यासाठी त्याचा फायदा होतो. याखेरीज आणखी एक मोठा फायदा म्हणजे स्तन्यपान करणार्‍या स्रियांना भविष्यात स्तनाचा कर्करोग तसेच गर्भाशयाशी संबंधित कर्करोग होण्याचा धोका बर्‍याच अंशी कमी होतो.
थोडक्यात स्तन्य हा बाळाचा परिपूर्ण आहार आहे. शुद्ध आणि योग्य प्रमाणात स्तन्य मिळणे हा जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाचा अधिकार आहे. यासाठी स्तन्यपानाबद्दलच्या सर्व गैरसमजुती दूर करुन बाळंतिणीने स्वतःच्या आहार -आचरणाकडे लक्ष द्यावे. घरांतील इतरांनी तिला पुरेशी विश्रांती मिळेल, ती आनंदी राहील यासाठी प्रयत्न करावे.