सौंदर्यवर्धक डोळे ः काळजी व उपाय

0
897

सभोवतालचे सुंदर जग पाहण्यासाठी निसर्गाने आपल्याला डोळ्यांची देणगी दिली आहे. सौंदर्याचे लक्षण म्हणूनही जगात डोळ्यांना अतिशय महत्त्व दिले जाते. डोळ्यांमुळे माणसाच्या एकूण व्यक्तिमत्त्वात भर पडत असते. मानवी संस्कृतीत विविध कला आणि वाङ्‌मयातही डोळ्यांना मानाचे स्थान दिलेले आढळते. मानवी भावभावनांचे दर्शन घडते ते डोळ्यांमधूनच. आईच्या पदराखालचे मूल, भावाला राखी बांधणारी बहीण, लग्नात वराला वरमाला घालणारी वधू, देवासमोर प्रार्थना करणारी आजी ही सगळी मानवी नाती त्या त्या प्रसंगी बोलतात ती डोळ्यांमधूनच. सगळा जीव डोळ्यात आणून आई मुलाकडे पाहत असते, तर वरमाला घालताना वधू वराकडे जेव्हा हलकेच पाहते तेव्हा ती खूपसे बोलून जात असते. ही भाषा असते डोळ्यांची. माणसाला जगात जे ज्ञान, अनुभव मिळत असतात ते मुख्यत्वे करून डोळ्यांच्या द्वारेच. आपल्या समाजात स्त्रियांचे सौंदर्य त्यांच्या डोळ्यांच्या आकारावरून, डोळ्यांच्या रंगावरून ठरविले जात असते. मुलींची नावे ठेवतानासुद्धा त्यांच्या डोळ्यांच्या सौंदर्यावरून ठेवली जातात. सुनयना, मीनाक्षी, सुलोचना ही नावे त्या मुलींच्या डोळ्यांचे वर्णन करणारी असतात.

निरोगी, स्वच्छ, सतेज डोळे हे त्या व्यक्तीच्या निरोगीपणाचे लक्षण समजले जाते. डोळ्यांची ठेवणच अशी असते की त्यांचे निसर्गतःच रक्षण होत असते. डोळे खोबणीत अगदी सुरक्षित असतात. भुवया, पापण्या डोळ्यांचे धूळ, कण, उन्हापासून रक्षण करण्यास सज्ज असतात. डोळ्यांचे रोगांपासून, दृष्टिदोषांपासून रक्षण करणे मात्र माणसालाच करावे लागते. आपल्या डोळ्यांना त्यापासून लांब ठेवणे हे त्याच्या भल्यासाठीच असते. स्वतःच्या डोळ्यांची निगा राखणे हे स्त्रीच्या दृष्टीने जेवढे महत्त्वाचे, तेवढेच आपल्या मुलाबाळांच्या डोळ्यांचीही काळजी घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. डोळ्यांची निरोगी वाढ व्हावी आणि ते शेवटपर्यंत चांगले, कार्यक्षम राहावेत यासाठी बालपणापासून पोषक आहार मिळणे आवश्यक असते. पूरक आणि पोषक आहारच इतर अवयवांप्रमणेच डोळ्यांनाही कार्यक्षम आणि निरोगी राखू शकतो. हा आहार समतोल असावा. डोळ्यांना ‘अ’ जीवनसत्त्व आणि प्रोटिन्सची आवश्यकता असते. हिरव्या पालेभाज्या विशेषतः पालक, कढीलिंब, तसेच चवळी, मूग यांसारखी कडधान्ये, पपई, आंबा यांसारखी फळे यांमध्ये ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. दूध, अंडी, मांस, मासे यांच्या आहारामुळेही ‘अ’ जीवनसत्त्व मिळते. आवश्यक असलेल्या आहाराच्या अभावामुळे डोळ्यांचा टवटवीतपणा, सतेजपणा कमी होत जातो. बालपणापासून असा आहार मिळाला नाही तर पुढे डोळ्यांच्या गंभीर तक्रारी सुरू होतात आणि त्यातून अंधत्वही येऊ शकते. निःसत्त्व आहाराचा परिणाम जन्मभर भोगावा लागतो.

गरोदर असलेल्या स्त्रियांमध्ये अंधुक मंद प्रकाशात कमी दिसण्याचे प्रमाण बरेच असते. याचे कारणही हेच असते. तिच्यासाठी आणि तिच्या पोटात वाढणार्‍या गर्भाच्या पोषणासाठी तिला जीवनसत्त्वयुक्त आहाराची जास्त प्रमाणात गरज भासत असते आणि अशा आहाराच्या अभावामुळे तिच्या दृष्टीवर परिणाम होत जातो. अंगावर पाजणार्‍या मातेच्या बाबतीतही असेच होते. तेव्हा, गरोदर असणार्‍या आणि अंगावर पाजणार्‍या स्त्रीला ‘अ’ जीवनसत्त्व आणि प्रोटिन्स यांची जास्त प्रमाणात आवश्यकता असते, ती तिला मिळाली पाहिजेत, नाहीतर त्यांच्याअभावी आई आणि बाळ या दोघांच्याही दृष्टीवर परिणाम होतो. अंगावरच्या दुधासारखे कोणतेही दूध बालकांना पूर्णान्न होऊ शकत नाही. आईचे दूध बालकाची दृष्टी निरोगी बनविते हे प्रत्येक आईने आवर्जून लक्षात ठेवायला हवे. बाळंतपणाच्या पहिल्या दिवशी जे दूध येते ते काहीसे पिवळे आणि चिकट असते. हे दूध ‘अ’ जीवनसत्त्वांनी संपन्न असते, नवजात अर्भकला हे दूध अवश्य पाजावे. पहिल्या दिवशीचे दूध बाळाला अपायकारक असते ही समजूत अत्यंत चुकीची आहे.
आपल्या देशात डोळे येणे, डोळे चिकटणे यांसारखे संसर्गजन्य रोग मोठ्या प्रमाणावर आढळतात. याचे प्रमाण खेड्यात राहणार्‍या लोकांत आणखीनच जास्त असते.

रोगाची बाधा झालेल्या व्यक्तीच्या सान्निध्यात येणार्‍या अनेकांना या संसर्गजन्य रोगाच्या जंतूंपासून रोग होऊ शकतो. रोग्याने वापरलेले काजळ, सुरमा आणि सुरमा लावायची सळई, टॉवेल इत्यादी वस्तू दुसर्‍या कोणी वापरल्या तरीसुद्धा त्यांना रोग होऊ शकतो. खेड्यातील स्त्रिया आपल्या मुलांचे तोंड, डोळे पुसताना नेहमीच आपल्या पदराचा वापर करतात हे चुकीचे आहे. त्यामुळे पदराची घाण, जंतू मुलाच्या डोळ्यांत सहजपणे जातात. या स्त्रियांना नेहमीच धूळ, धूर इत्यादी गोष्टींना तोंड द्यावे लागत असल्याने त्यांचे डोळे निरोगी राहू शकत नाहीत आणि त्रास होत असूनही त्या डोळ्यांकडे दुर्लक्षच करतात. त्यामुळे पुढे त्यांच्यात दृष्टिदोष निर्माण होऊ शकतो. कधी अंधत्वही येते.

डोळ्यांची प्रसाधने वापरू नका. आपल्या देशातील जवळजवळ प्रत्येक स्त्री डोळ्यामध्ये काजळ अगर सुरमा घालीत असते. डोळ्याचे सौंदर्य खुलावे हा त्यामागचा उद्देश असतो. पण त्याचे परिणाम मात्र काही वर्षांनंतर दिसू लागता. सुरम्यामध्ये डोळ्याची बुबुळे मोठी करण्याचे गुणधर्म असतात. पण काही काळानंतर ते दृष्टीला पूरक ठरण्याऐवजी मारकच ठरतात. काजळात तर काजळी असते, कण असतात. त्यामुळे डोळ्यांना इजा होते. काजळ डोळ्यात घालणाच्या अनारोग्यक पद्धतीमुळे रोग फैलावतो ते वेगळेच. काजळ किंवा सुरमा यांच्यामुळे आपल्या डोळ्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा होत नसतो. त्यांच्यामुळे डोळ्यांचे सौंदर्य वाढते हीसुद्धा स्त्रियांची भ्रामक कल्पना असते. त्यामुळे काजळ किंवा सुरमा न वापरणे हेच चांगले. तुमच्या भुवया नैसर्गिक राहू द्या. सध्या आपल्या उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय स्त्रिया आपल्या भुवया कोरून घेत असतात. भुवया कोरून घेण्यापाठीमागे आपल्या चेहर्‍याचे सौंदर्य वाढावे असा त्यामागचा त्यांचा उद्देश असतो. भुवया आणि पापण्यांना आकार देण्यासाठी त्या ज्या पेन्सिलीचा वापर करतात त्या पेन्सिलीतील द्रव्यामुळे त्वचेला बाधा होण्याची शक्यता असते. डोळ्यांभोवतालची त्वचा ही अत्यंत नाजूक असल्याने अशा सौंदर्यप्रसाधनांचा तिच्यावर गंभीर परिणाम होत असतो. अर्थातच डोळ्यांवरही त्याचा परिणाम होण्यास वेळ लागत नाही. हे टाळण्यासाठी अशा तर्‍हेच्या सौंदर्यप्रसाधनांचा, भुवया कोरण्याचा मोह स्त्रियांनी टाळणे त्यांच्याच आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते.

आपल्या एकत्र कुटुंबपद्धतीत वाढलेल्या आणि वावरणार्‍या स्त्रियांच्या डोळ्यांच्या आरोग्याकडे हमखास दुर्लक्ष होत असल्यामुळे त्यांच्यात मोतीबिंदू, काळामोती या रोगाची लागण झालेली आढळून येते. केवळ दुर्लक्ष केल्यामुळे काळा मोती रोगाचे रूपांतर अंधत्वात होत असते. स्त्रियांच्यात हे प्रमाण जास्त आढळते. संध्याकाळच्या वेळी डोकेदुखी, डोळ्यावर ताण पडणे आणि दुखणे, प्रकाशाकडे पाहताना रंगीत वर्तुळे दिसणे ही लक्षणे दृष्टिदोषांची होत. ज्यांच्या कुटुंबात मोतीबिंदूचा इतिहास आहे, अशा सर्व चाळीशी ओलांडलेल्या स्त्रियांनी डोकेदुखी, डोळे खुपणे अशा लक्षणांपासून वेळीच सावध राहून ताबडतोब उपचार करणे आवश्यक आहे.

स्त्रीच्या डोळ्यांच्या विकारासंबंधी आणि त्यांच्या निगेसंबंधी इथे चर्चा केलेली असली, तरी ही समस्या मुले, पुरुष यांनाही भेडसावत असते. आई म्हणून, पत्नी म्हणून किंवा मुलगी म्हणून स्त्रीवर तिच्या आरोग्याबरोबरच तिच्या कुटुंबीयांच्या आरोग्याचीही जबाबदारी पडत असते. त्यामुळे तिने सगळ्यांचीच दृष्टी निरोगी ठेवण्यासाठी सतत दक्ष असले पाहिजे. आपल्या आहारात जीवनसत्त्वयुक्त पदार्थ असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. विशेषतः डोळ्याच्या आरोग्यासाठी अ, ब, क, आणि ड जीवनसत्त्वांचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यांच्या अभावानं डोळ्यांचे अनेक विकार उद्भवतात.
अ : मांस, अंडी, दूध, गाजर, मासे, केळी, खजूर या पदार्थातून ‘अ’ जीवसत्त्व मिळतं. ‘अ’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा येतो. दृष्टी मंदावते. वरचेवर रांजणवाडी, पापण्यांना सुज, खाज सुटते.
ब : तृणधान्य, मोड आलेली कडधान्यं, अंडी, दूध, पालेभाज्या. ‘ब’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळं डोळ्यांची आग होते, लाल होतात, दृष्टी कमी होते, उजेड सहन होत नाही.
क : मोसंबी, लिंबू, टोमॅटो, दूध, आवळे यात ‘क’ जीवनसत्त्व सापडते. ‘क’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे डोळ्यांच्या निरनिराळ्या भागात रक्तस्त्राव होतो. म्हातारपणी मोतीबिंदू होतो.
ड : दूध, लोणी, कॉडलिव्हर ऑईल, अंडी यापासून ‘ड’ जीवनसत्त्व मिळते. ‘ड’ जीवनसत्त्वांच्या अभावामुळं मोतीबिंदू होण्याची शक्यता असते.
गृहिणींनी घरातल्या आहारात या पदार्थांचा सातत्यानं वापर केला तर डोळ्यांपासून विकार दूरच राहतील!