सणांमागचे तत्त्वज्ञान महत्त्वाचे! योगसाधना – ४७० अंतरंग योग – ५५

0
369
  •  डॉ. सीताकांत घाणेकर

‘टिळा’ ही मस्तकाची पूजा नाही तर भावाचे विचार व बुद्धी यांच्यावरील विश्‍वासाचे दर्शन आहे. या सामान्य भासणार्‍या क्रियेत दृष्टिपरिवर्तनाची महान प्रक्रिया सामावलेली आहे. विराट जगाला पाहण्यासाठी जणू तिसरा एक पवित्र डोळा देऊन बहिणीने स्वतःच्या भावाला त्रिलोचन बनवलेला आहे.

काळ कुणासाठीही थांबत नाही… दिवस, महिने, वर्षे उलटतच राहतात. ऋतू बदलतच राहतात. तसाच आता श्रावण मास उजाडला. हे चातुर्मासाचे दिवस. भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे देव आता चार महिने झोपलेला असतो. मुख्य प्रश्‍न हा आहे की या चार महिन्यात पाऊस पडतो तेव्हा सृष्टीत अनेक उलाढाली होतात- पाण्याचा पुरवठा धरणीला होतो, विविध प्रकारची पिकं घेतली जातात… मग यावेळी देव झोपलेला कसा असेल!
एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की भारतात प्रत्येक विचारामागे, सणामागे, प्रथेमागे… एक विशिष्ट व सूक्ष्म तत्त्वज्ञान आहे. त्याबद्दल विविध मते असतील.

पू. पांडुरंगशास्त्री आठवले या संदर्भात सांगतात की अशावेळी देव झोपत नाही. ती फक्त गोंडस कल्पना आहे. याच चार महिन्यात मानवतेच्या कल्याणाची विविध कामं असतात- सृष्टीला समृद्ध करण्याची. शास्त्र सांगते की देव उठतो तेव्हा भरघोस पिकं येतात. ते पहिले पीक घेऊन शेतकरी मंदिरात जातो आणि देवाला अर्पण करतो. तो म्हणतो की, ‘‘देवा तुझ्या कृपेमुळे हे पीक आले, ते तुला प्रथम अर्पण’’. ही खरी कृतज्ञता- मानवतेचे द्योतक. पण देव म्हणतो की ‘अरे बाबा, मी चार महिने झोपलो होतो, हे सर्व तुझ्या कष्टाचे फळ!’
तेव्हा शेतकरी उत्तर देतो, ‘‘देवा एकदा दाणे पेरल्यावर मी जास्त काम काहीच केले नाही. फक्त पर्जन्याच्या रूपात तुझी वाट पाहिली’’.
पिता-पुत्राचे असे संभाषण चालूच असते. कुणीही स्वतःला यशाचा धनी मानायला तयार नाही. भारतीय तत्त्वज्ञानाची सूक्ष्मता व भव्यता तर इथेच दिसते. देव खरा कर्मयोगी. निःस्वार्थी कर्म करायचे आणि स्वतः नामानिराळे व्हायचे. तसेच मुलाला मोठे ठरवण्याची भावना इथे आहे. हे भगवंताचे गुण आपण शिकायला हवेत.

दुर्भाग्याने या तत्त्वज्ञानाचा अभ्यास नसल्यामुळे आज अनेक व्यक्ती दुसर्‍याने केलेल्या कामाचे श्रेय स्वतः घेतात. म्हणूनच भारतीय संस्कृतीचा सखोल शास्त्रशुद्ध अभ्यास आवश्यक आहे.
श्रावण महिन्यात नियमित सण येतच राहतात. पाऊसही कमी-जास्त पडतच असतो. पण यावर्षी विश्‍वाला कोरोनाच्या ग्रहणाने ग्रासले आहे. त्याचे संक्रमण कमी-जास्त चालूच आहे. रुग्णांची संख्या, मृतांचे आकडे वाढतातच आहेत.

एक आशेचा किरण म्हणजे – जास्त संख्येने रोगी बरे होताहेत. त्याचबरोबर शास्त्रज्ञ ‘व्हॅक्सीन’ शोधून काढण्यासाठी दिवसरात्र प्रयत्नशील आहेत आणि हे संशोधन अनेक देशात चालू आहे. यश मिळेल यात काहीच संशय नाही. आपण फक्त धीर धरायला हवा. त्याचबरोबर काही गोष्टी आवश्यक आहेत….
* बंधने आणि त्यांचे प्रत्येक व्यक्तीने काटेकोरपणे पालन करणे
* रोगप्रतिकारशक्ती वाढवून स्वतःचे रक्षण करणे
* आत्मशक्ती वाढवून रोगाची व मृत्यूची भीती दूर करणे
* कोरोनाची लागण झाली तर योग्य वैद्यकीय उपाय करणे.
प्रत्येक संस्कृती शेंकडो-हजारो तत्त्ववेत्त्यांच्या परिश्रमामुळे उदयाला येते व वाढीस लागते. भारतात यासाठी अनेक ऋषी-महर्षी, संत-तपस्वी व त्यांच्याबरोबर काही राजे-महाराजे… यांनी यासाठी पुष्कळ कष्ट घेतले. भारतातील प्रत्येक सणामागे एक विशिष्ट तत्त्वज्ञान आहे. त्याचे पालन व्हायला हवे. सण एक कर्मकांडं म्हणून साजरा केला तर मानवतेला काहीच फायदा होत नसतो. फक्त मौज-मस्ती होत असते.

या संदर्भात विचार केला तर बंधनाचा एक सण मागच्या आठवड्यात झाला तो म्हणजे रक्षाबंधन. नारळी पौर्णिमा, श्रावणी पौर्णिमा.
या शब्दातच अत्युच्च अर्थाचे दोन शब्द आहेत- ‘रक्षा’ आणि ‘बंधन’. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताला राखी (धागा) बांधते. त्याआधी त्याच्या कपाळाला कुंकू लावते, ओवाळते, मिठाई त्याच्या मुखात घालते. मग भाऊ तिला काहीतरी प्रेमाची भेट देतो.
असे करून हे कर्मकांडं त्या दिवसापुरते संपते. मग भाऊ-बहीण आपल्या कामाला निघून जातात. आता लहान असली तर खेळायला जातात. तशीही त्या वयात ती एकाच घरात असतात. बहिणीचे लग्न झाल्यानंतर त्या दुरून दुरूनसुद्धा भावाला भेटायला जातात. खरेच, हा अगदी भावपूर्ण सोहळा. त्याबद्दल आपल्या पूर्वजांचे तत्त्वज्ञान समजते. भाव जाणून घेतला तर छोट्याशा सोहळ्याला आणखी सुगंध येईल. ‘रक्षाबंधन’ सर्व विश्‍वात साजरे केले जाते. पण इतिहास सांगतो की हा सोहळा उत्तर हिंदुस्थानात सुरू झाला, बहुत करून रजपूतांकडे. कारण तेव्हा लढाया, परकीय आक्रमणे होत असत. महिलांवर अत्याचार होत असत. म्हणून बहिणीला भाऊरायाकडून रक्षण अपेक्षित होते.

पूर्वी रक्षाबंधनाचे स्वरूप वेगळे होते. त्यावेळी पुजारी (पुरोहित) प्रत्येकाच्या घरी जात असे. तिथे पूजा होत असे- शिवपूजन. त्यानंतर पुजारी घरातील प्रत्येक सदस्याच्या मनगटाला धागा बांधत असे. मंतरलेला पवित्र धागा. त्यामागे रक्षणाचाच भाव होता तो म्हणजे भगवंत आपले रक्षण करील. पण त्याबरोबर काही बंधनेदेखील अपेक्षित होती- मुख्य म्हणजे सद्विचार, सद्वृत्ती, सज्जनता… आणि तेव्हा रक्षण स्वतः शिव करणार हा भाव होता.
भगवान शिवाला महादेव म्हणतात. देवाचा देव महादेव आणि प्रत्येकाला माहीत आहे की भगवंत त्यांच्या आवडत्या भक्ताचे रक्षण करतो. असे भक्त म्हणजे सत्कर्म करणारे. त्यामुळे सत्कर्माचे बंधन अपेक्षित असते.

या संदर्भात उदाहरणे अनेक आहेत.
* भगवान विष्णुंनी बालभक्त ध्रुव, भक्त प्रल्हाद यांचे रक्षण केले.
* श्रीकृष्णाने संत मीराबाईचे रक्षण केले.
* विठ्ठलदेवाने गोरा कुंभाराच्या छोट्या मुलाचे रक्षण केले.
गोष्टी अनेक असतील पण मुख्य समजण्याची गोष्ट म्हणजे त्यामागील तत्त्वज्ञान.
कालांतराने रक्षाबंधनाचे स्वरूप बदलत गेले. आता अभिप्रेत आहे ते म्हणजे – बहीण भावाच्या हाताला राखी बांधते कारण तिचे रक्षण अपेक्षित असते. चौफेर नजर फिरवली तर लक्षात येईल की अनेकवेळा भाऊ अगदी लहान असतो. मग तो बहिणीचे रक्षण काय करणार? हे रक्षण जसे शारीरिकदृष्ट्या आहे तसेच मानसिक, भावनिक आणि मुख्य म्हणजे आध्यात्मिक पैलूंनीदेखील आहे.
भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे इथे मुख्य भाव आहे तो पवित्रता. बहीण-भावाच्या नात्यामध्ये पहिला मुद्दा येतो तो पवित्रतेचा. कारण ते नातेच तसे आहे, पूर्णतः वेगळे.

अनादी कालापासून स्त्री-पुरुषातील पवित्र नाते फार जरुरीचे होते. आता तर त्याची अधिक गरज आहे. अनेक कारणांसाठी- शिक्षण, नोकरी, सोहळे, यांकरिता कधी कधी स्त्रियांना एकटेच जावे लागते, तेही वेळी-अवेळी. आणि हे स्वातंत्र्य तिला मिळणेही रास्तच आहे.
दुर्भाग्याने अशावेळी तिच्यावर महाभयंकर अत्याचार होतात. सर्वांनाच माहीत आहे. मुद्दाम उजळणी करण्याची जरुरी नाही. म्हणून एक गोष्ट नक्की केली पाहिजे की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही.
भारतीय तत्त्वज्ञानात स्त्रीबद्दल विचार उच्चकोटीचे आहेत. मनू म्हणतात- ‘‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः’’ हा भाव रक्षाबंधन सोहळ्यामध्ये भरलेला आहे.
पू. पांडुरंगशास्त्री या संदर्भात सांगतात –
* रक्षाबंधन म्हणजे प्रेमबंधन. हे मीलन म्हणजे पराक्रम व प्रेम तसेच साहस व संयम यांचा सहयोग.
* हा उत्सव म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण. राखी बांधणार्‍या बहिणीकडे भाऊ विकृत नजरेने पाहत नाही.
* टिळा ही मस्तकाची पूजा नाही तर भावाचे विचार व बुद्धी यांच्यावरील विश्‍वासाचे दर्शन आहे. या सामान्य भासणार्‍या क्रियेत दृष्टिपरिवर्तनाची महान प्रक्रिया सामावलेली आहे. सामान्य दृष्टीने जगाला पाहत असलेल्या दोन डोळ्यांशिवाय विराट जगाला पाहण्यासाठी जणू तिसरा एक पवित्र डोळा देऊन बहिणीने स्वतःच्या भावाला त्रिलोचन बनवलेला आहे. असा संकेत इथे आहे. भगवान शंकराने तिसरा नेत्र उघडून कामदेवाला भस्म करून टाकले होते. बहीणही भावाचा तिसरा नेत्र – बुद्धीचा डोळा – उघडून त्याला- विकार-वासना इत्यादींना भस्म करायला सुचवीत असते. हे उच्च ‘ध्येय’ धरून त्याचे रक्षण करायला सुचवते.

इतिहासकार सांगतात –
* देवासुर संग्रामात देवांच्या विजयानिमित्त इंद्राणीने हिम्मत हरलेल्या इंद्राच्या हाताला राखी बांधली होती.
* रजपूत राणी – कर्मवतीने मोगल राजा हुमायूंला स्वरक्षेसाठी राखी पाठवली होती.
असा हा सुंदर असा सोहळा – बंधनाची व रक्षणाची आठवण करून देणारा. आज कोरोनाच्या राज्यात दोन्हींची अत्यंत गरज आहे… कोरोनाची करुणा संपादन करण्यासाठी.
(संदर्भ ः पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रवचनांवर आधारित)