श्रीमद् विद्याधिराजतीर्थ स्वामीजींचा सुवर्ण महोत्सवी चातुर्मास व्रताचरण सोहळा…

0
133

– श्री. अनिल पै (मडगाव)

विद्यमान स्वामीजींचा जन्म दक्षिण कर्नाटकातील पंचगंगा नदी संगमावरील गंगोळी गावांतील आचार्य कुटुंबात १९४५ साली झाला. त्यांच्या वयोमानाचे ७१ वे वर्ष आहे. तसेच शके १८८८ मधील माघ महिन्यात २६ फेब्रुवारी १९६७ मध्ये त्यांना संन्यास दीक्षा देवून श्रीविद्याधीराजतीर्थ असे नांव देण्यात आले. यंदा त्यांच्या चातुर्मास व्रताचरणाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. गुरुवर्य श्रीपाद् द्वारकानाथ तीर्थांच्या निर्वाणानंतर १९७३ मध्ये विद्यमान स्वामीजींचा पट्टाभिषेक झाला. मंगळूर मठांत वयोमानाच्या ७१ व्या वर्षांत व सन्यासदीक्षेनंतर सुवर्णमहोत्सवी वर्ष चातुर्मास व्रताचरण म्हणजे दुग्धशर्करा योग आहे.

श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ हे पश्‍चिम भारतातील गौड सारस्वत ब्राह्मण ज्ञाती समूहाचे एक पुरातन धार्मिक पीठ असून या पीठाला २३ यतिवर्यांची अखंड परंपरा लाभलेली आहे. विद्यमान मठाधीश श्रीमद् विद्याधिराज तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजींनी भारताची समाजधारणोन्मुख सन्यस्त वृत्तीची परंपरा चालू ठेवण्याचे व्रत घेऊन पीठस्थ होताच गेल्या ४३ वर्षांत अधिकाधिक गतिमान व जीवनाच्या बदलत्या मूल्यांना पोषक बनविण्यासाठी योजनाबद्ध कार्यक्रम आखून नियोजित वेळेत ते पूर्ण करून शिस्तीचा पाया घातला. सन्यस्थ व्रताचे पालन करताना सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक व शैक्षणिक क्षेत्रात धर्माचरणाला स्नेह व सहकार्याची जोड देवून समाजामध्ये अभूतपूर्व चैतन्य निर्माण केले. सन्याशाला धर्माचरणानुसार दर वर्षी आषाढ महिन्यात चातुर्मास व्रताचरण करावे लागते. यंदा दक्षिण कर्नाटकातील मंगळूर येथील श्री गोकर्ण मठ या संस्थानच्या अनंत श्रीपादाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा चातुर्मास व्रतोत्सव होत आहे. श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या ३५६ वर्षांआधी बांधलेल्या पुरातन मठांत सुवर्णमहोत्सवी चातुर्मास व्रताला ऐतिहासिक महत्त्व आहे.

या मठपरंपरेतील सहावे यतिवर्य श्री रामचंद्रतीर्थ यांनी मंगळूर येथील मध्यवर्ती ठिकाणी मठ बांधला. श्री व्यंकटरमण देवस्थान नजिक श्री शके १५८२ (इ.स. १६६० मध्ये) मठवास्तु उभारली. त्याअगोदर याच स्वामीजींनी गोव्यातील पर्तगाळी येथे इ.स. १६५६ साली मठाची स्थापना करून श्रीराम-सीता-लक्ष्मण यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली व लगेच रिवण येथील मठ उभारून श्री मारुतीची मूर्ती प्रतिष्ठित केली. या मठात यंदाचा चातुर्मास स्वीकार होत आहे.
गोव्यात पोर्तुगीजांनी सत्ता बळजबरीने स्थापन करून बाटाबाटीचे सत्र सुरू केले, देवमंदिरांची मोडतोड केली. त्या सोळाव्या शतकात कित्येक सारस्वत कुटुंबांनी धर्म व संस्कृतीच्या रक्षणासाठी हातांत देवप्रतिमा घेऊन, घरादाराचा त्याग करून, अंगावरील कपड्यानिशी केरळ, कर्नाटक, महाराष्ट्रात स्थलांतर केले. परकीय राज्यांत त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. अपमान सोसावे लागले. निर्वासितांचे जीवन त्यांच्या वाट्याला आले. पण संकटाला सामोरे जावून हालअपेष्टा सहन केल्या. अशा वेळी श्रीरामचंद्र तीर्थ स्वामीजी रामेश्वरच्या यात्रेला गेले असता ते मंगळूर येथे थांबले होते. तेथील या लोकांनी श्री स्वामीजींची भेट घेऊन त्यांच्या दुर्दैवाच्या फेर्‍याची कल्पना स्वामीजींना करून दिली. त्यांची दयनीय स्थिती पाहून मंगळूर येथे स्वामीजींनी मठवास्तू उभारली व त्यांना आश्रय दिला; दिलासा दिला. धर्म व संस्कृतीच्या रक्षणासाठी परराज्यांत गेलेल्या लोकांना आश्रय दिला. या मठाला सारस्वत समाजाच्या इतिहासात फार मोठे महत्त्व आहे.
मंगळूर शहरांतील कार स्ट्रीट या मध्यवर्ती व्यापारी केंद्रात हा मठ आहे. हे शहर पुरातन काळापासून समाजाच्या धर्म, संस्कृती व पुरुषार्थाचे केंद्र राहिले आहे. शहराच्या मध्यभागी श्री गोकर्ण मठ नावाचे मठ मंदिर बांधले. समाजाच्या श्री व्यंकटरमण देवस्थाननजिक मुख्य रस्त्यावर ही मठवास्तू आहे. ही रस्त्याच्या मागील बाजूस होती. श्री शके १७६२ मध्ये मठ परंपरेतील १८ वे यतिवर्य श्री पूर्णपद्मतीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजींनी नव्या वास्तूचा शिलान्यास केला. शके १७६४ मध्ये या मंदिरात श्री वीर विठ्ठल देवता विग्रहाची पुनःप्रतिष्ठा व गोपुराच्या शिखरावर सुवर्ण कलशाची प्रतिष्ठापना केली. ही वास्तू गोव्यातील शिल्पकार कारागिरांनी बांधलेली असून अधिकांश बांधकाम साहित्य गोव्यातूनच नेले होते. या परंपरेतील २० वे यतिवर्य श्रीमद् इंदिराकांत तीर्थ स्वामीजींनी मठासमोर प्रासाद बांधला.२२ वे श्रीगुरुवर्य श्री द्वारकानाथतीर्थ स्वामीजींनी आवश्यक जीर्णोद्धार केला व १९६४ व १९७२ मध्ये दोन वेळा चातुर्मास व्रताचरण केले.
विद्यमान श्री विद्याधिराजतीर्थांनी मठवास्तूच्या मागील जागेत श्री द्वारकानाथ भवन मंडप बांधविला व त्याचे उद्घाटन ६ मे १९९१ साली केले. लगेच त्याच वर्षी श्री स्वामीजींहस्ते नवग्रह शिला विग्रहाची प्रतिष्ठापना विधिपूर्वक केली. नंतर अंगिरस संवत्सरात चातुर्मास व्रताचरण केले. आधुनिक काळाची गरज ओळखून ज्येष्ठ नागरिकांना प्रतिष्ठेचे जीवन जगता यावे म्हणून मठाच्या मागील बाजूस तीन मजली, अत्याधुनिक सुखसोयींनी युक्त ‘पूर्णयज्ञ वसती निलय’ हा वृद्धाश्रम बांधला व त्याचे उद्घाटन दि. २०१२ साली केले. त्या वास्तूच्या बांधकामाला सव्वा कोटी रुपये खर्च झाला.
यंदा दुर्मुखनाम संवत्सरातील श्रीपादांचे दुसरे चातुर्मास व्रताचरण आहे. त्या व्रताचरणाला समाजाच्या दृष्टिकोनातून आगळे वेगळे महत्त्व आहे. विद्यमान स्वामीजींचा जन्म दक्षिण कर्नाटकातील पंचगंगा नदी संगमावरील गंगोळी गावांतील आचार्य कुटुंबात १९४५ साली झाला. त्यांच्या वयोमानाचे ७१ वे वर्ष आहे. तसेच शके १८८८ मधील माघ महिन्यात २६ फेब्रुवारी १९६७ मध्ये त्यांना संन्यास दीक्षा देवून श्रीविद्याधीराजतीर्थ असे नांव देण्यात आले. यंदा त्यांच्या चातुर्मास व्रताचरणाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. गुरुवर्य श्रीपाद् द्वारकानाथ तीर्थांच्या निर्वाणानंतर १९७३ मध्ये विद्यमान स्वामीजींचा पट्टाभिषेक झाला. मंगळूर मठांत वयोमानाच्या ७१ व्या वर्षांत व सन्यासदीक्षेनंतर सुवर्णमहोत्सवी वर्ष चातुर्मास व्रताचरण म्हणजे दुग्धशर्करा योग आहे.
पीठारोहणानंतर या ४३ वर्षांत विद्यमान श्रीस्वामीजींनी परंपरेतील बाविसही श्रीस्वामीजींचे संकल्प पूर्ण केले. संन्यास व्रताचे पालन करताना आसेतुहिमालय ते रामेश्वरम्‌पर्यंत संचार केला. तीर्थयात्रा केल्या. समाज संघटित करण्याबरोबर तेथे नूतन मठवास्तू, कल्याण मंडप बांधले. शैक्षणिक संस्था उभारल्या. आरोग्यकेंद्रे उघडली. मठाकडील व कुलदैवतेकडील समाजाचे तुटलेले धागे पूर्ववत जोडून दिले. अध्ययन, मननचिंतन केले. अनेक धार्मिक ग्रंथांचे सखोल अध्ययन केले. वैयक्तिक सुखसोयी, प्रकृति अस्वास्थ्य याची पर्वा न करता श्रीस्वामीजींनी सारी अंगीकृत कार्ये पूर्ण केली. धर्माशी एकाग्र राहून आधुनिक जगाचा वेध घेऊन समाजातील तरुणांना पुढे जाण्यास मार्गदर्शन केले.
यंदा मंगळूर येथील गोकर्ण मठात रविवार दि. २४ जुलै रोजी विधिवत् श्री स्वामीजी चातुर्मास व्रत स्वीकार करणार आहेत. दि. १६ सप्टेंबर रोजी त्याची सांगता होणार आहे. चातुर्मास व्रताचरण अनुयायी भक्तांसाठी एक पर्वणीच आहे.