शंखनाद

0
133
  • सौ. माधुरी रं. शे. उसगावकर

 

खरोखर, काळाच्या वाहत्या प्रवाहात मी कौतुकाने आणलेल्या पुस्तकांकडे माझं दुर्लक्षच झालं, हे माझ्या ध्यानी आलंच नाही. कधीकाळी ध्यानात आलं असतं तेव्हा कदाचित या पुस्तकांची स्थिती पराकोटीची विकलांग झाली असती.

 

 

दुपारची वेळ. घरात सामसूम. जेवणानंतर वामकुक्षी घेत यजमान पहुडले. मुलगा-सून मोबाईल घेऊन माडीवर गेली. दिवाणखान्यात सोफ्यावर मी रिलॅक्स्‌ड पोझमध्ये बसले. म्हटलं वर्तमानपत्र चाळावं… तर संचारबंदीच्या काळात पेपरवाला बंद… आता सोफ्यावरच मस्त डुलकी काढावी या विचाराने डोळे अर्धोन्मिलित होतात तोच कॅबिनेटच्या कप्प्यातील पुस्तके खुणावत असल्याचा भास झाला. भास कसला चक्क ती वार्तालाप करू लागली. असंच काही विचारत होती एकामागून एक… ‘काय! आम्हाला इथं ठेवून ‘शो पीस’ केला आहेस का? यातही काही भेटवस्तू म्हणून आलो तेव्हा आम्हाला कुठं ठेवू आणि कुठं नको असं झालं होतं तुला’. – ऋतुचक्र

सख्यानो! तुम्ही तर माझ्या गळ्यातील ताईत आहात? असा कसा भ्रम करून घेतला तुम्ही?- आर्जवाने मी.

‘दिसते का आमच्या अंगावर धूळ किती साचली आहे ती? काठीवरच्या कपड्याने आसूड मारून धूळ झटकायची, तेही विसरलीस. वरून आमच्या डोक्यावर खचाखच पुस्तकांचा भार ठेवून आमची स्थिती बरणीतल्या लोणच्याप्रमाणे झाली आहे याचे तरी भान आहे का!’- शेतकर्‍याचा आसूड.

‘अग पुस्तकांनो! जरा समजून घ्या ना मला. कोरोना विषाणूचे थैमान आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन आहे ना! त्यामुळे घरकामाला ‘बाई’ येऊ शकत नाही. तिची कामं, घरच्या खवय्यांच्या आवडी निवडी जोपासताना, सगळ्यांचं सगळं करताना माझी तारांबळ उडते. त्यात सर्वकाही ‘होममेड रेसिपीज’. स्वयंपाकघरातून ‘स्वीगी’, ‘झोमॅटो’ तर केव्हाच हद्दपार. तुम्ही बघताय ना कोरोना विषाणूने अदृश्य शत्रूप्रमाणे कसा उच्छाद मांडला आहे तो! मोकळा वेळ तसा मिळत नाहीच’.

‘हे तू आम्हाला सांगू नकोस. वाचनालयातील पुस्तकांचं मनन चिंतन चाललं आहे ते दिसत नाही का मला…’ इति मागोवा.

‘माझं खुमासदार वाचन केल्याशिवाय तुझी निद्रादेवी प्रसन्नच होत नसे.’ – व्यक्ती आणि वल्ली

‘अधुनमधुन माझी पानं पलटून वाचताना तुझ्या चेहर्‍यावर अद्भुत मनःशांतीची छटा उमटायची. आता गरजच उरली नसावी.’ – दासबोध

‘एक एक करून आम्हाला उत्साहाने घरी आणून सख्या सोबतीत कौतुकाचा वर्षाव केला. हवा तेव्हा आम्ही मानबिंदू.. नको तेव्हा चेष्टेचा विषय.. आता आम्ही जुनी झालो आहोत. या कप्प्यात टाकून आमची उतराई होण्याचा दिमाख मिरवू नकोस. – रात्र काळी….

‘स्वतः एक चोखंदळ वाचक! आता कुठं गेला हा चोखंदळपणा?’ वाचनाचा लळा!…..

‘वेळ मिळत नाही म्हणतेस आणि कुटुंबियांसमवेत पत्ते खेळतेस. अंत्याक्षरीत पण दिलखुलास भाग घेतेस. एवढेच नव्हे तर ‘ग्रुपवर’ व्हिडिओ कॉलपण चालू असतात…. – मजेत जगावं कसं?

‘लॉकडाऊन म्हणतेस तक्रारीचा सूर काढतेस. पण याच संचारबंदीत लॉकडाऊनवर आता तुझा तिसरा लेखही प्रसिद्ध झाला.’ – व्यक्तिमत्व विकास.

‘अग, नका गं असे माझे वाभाडे काढू. तुम्ही तरी समजून घ्याल असं वाटलं होतं.’ नम्रतेच्या सूरात मी.

‘आता कुणी कुणाला समजून घ्यावं! मागे तुझ्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी आमच्याबद्दल अभिमानाने भाषण ठोकलंस. माझ्या आशयघनाविषयी दर्पोक्तीही केलीस. मग आता कुठं गेलं तुझं हे ऽऽ पुस्तक प्रेम’… धुळीत माखलेल्या चंद्रबनातल्या सावल्या.. पुस्तकाने तर खिल्लीच उडवली.

न राहवून कानात बोटं घालून मी तर क्षणभर गच्चकन डोळेच मिटून घेतले. हळूच डोळे उघडून कानोसा घेते तर आवाज बंद. सचेतन झालेली पुस्तके अचेतन झाली, अबोल झाली. भयाण शांतता पसरली. जणुकाही घोर अपराधाची मी गुन्हेगार.

अरे बापरे! एकावर एक शेरे मारून आता अगदी गप्प पुस्तकं.

माझ्या पुस्तक प्रेमाचा (   ) असा शंखनाद झाल्यानंतर माझे मन विचलित होणार नाही तर काय?

विष्णू पुराणानुसार शंखनादाचं महत्त्व अपार आहे. शंखनाद हे विजयाचं प्रतीकही मानलं जातं. महाभारत युद्धात श्रीकृष्ण भगवान आणि पांडवांनी विभिन्न नावांच्या शंखांचा घोष केला होता असे सांगितले जाते. शुभकार्यात, पूजापाठात शंखनादाचं महत्त्व सर्वश्रुत आहे.

पुस्तकांच्या शंखनादाने माझी मेधाशक्ती प्रवाहीत झाली. शंखनादाने वास्तूदोष दूर होतो अशी श्रद्धा आहे. पुस्तक दिनाच्या दिवशी माझ्या मनावरचे पापुद्रे उलगडून आळस दूर करून ज्ञानाचं कवाड खोललं.

पुस्तकांकडून आणखी वाभाडे नको या विचाराने माझ्या डुलकीची नशा क्षणार्धात उतरली. लगेच उठले. सजावटीच्या कप्प्यातील पुस्तकांची धूळ अलगद झटकून टाकली. ती पुस्तके व्यवस्थित रचून ठेवण्याच्या कार्यभागात मग्न झाले. मधुन मधुन त्यांच्याकडे हितगुज साधण्याचा अयशस्वी प्रयत्नही करू लागले. पुस्तकांच्या क्रोधाच्या पार्‍याचा ठावठिकाणा घेण्याचा प्रयत्न जारी होता.

खरोखर, काळाच्या वाहत्या प्रवाहात मी कौतुकाने आणलेल्या पुस्तकांकडे माझं दुर्लक्षच झालं, हे माझ्या ध्यानी आलंच नाही. कधीकाळी ध्यानात आलं असतं तेव्हा कदाचित या पुस्तकांची स्थिती पराकोटीची विकलांग झाली असती.

धन्य पुस्तकांनो! पुस्तकदिनादिवशी खडबडून जागं केलं. वेळीच तुम्ही माझं लक्ष वेधलं. अन्यथा कपाटातल्या कप्प्यातच तुम्हाला वाळवीच्या स्वाधीन व्हावं लागलं असतं. शेवटी पुस्तकांच्या आत्महत्येचं पातक माझ्या नशिबी आलं असतं.

पुस्तकांनी मारलेले आसूड –

सगळ्याच आसुडांचा आवाज येत नाही

पण मला वळाचा अंदाज येत होता

स्वतःला पारखण्याचा मला वेगळाच सकारात्मक दृष्टीकोन मिळाला.