वेल्लोर येथील लोकसभा निवडणूक रद्द

0
118

>> पैशांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर

निवडणूक आयोगाच्या शिफारशीनंतर काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तामिळनाडूच्या वेल्लोर मतदारसंघातील मतदान रद्द करण्याचे आदेश दिले. वेल्लोरमध्ये १८ एप्रिलला मतदान होणार होते. मात्र, या मतदारसंघातील निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींकडे येथील मतदान प्रक्रिया रद्द करण्याची शिफारस केली होती.

या ठिकाणी मतदारांना भुलवण्यासाठी पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याची माहिती निवडणूक आयोगाला मिळाली होती. निवडणूक आयोगाने कारवाई करत द्रमुकचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे खजिनदार एस. दुरईमुरुगन यांचा मुलगा कथिर आनंद याच्या घरावर छापा टाकून मोठी रोकड जप्त केली होती. यानंतर निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा दुराईमुर्गन यांच्या मालकीच्या महाविद्यालयातून मोठी रोकड हलवण्यात येत असल्याचे समजले होते. तेव्हादेखील निवडणूक आयोगाने छापा टाकून ११.५३ कोटींची रोकड जप्त केली होती.

यानंतर पोलिसांनी कथिर आनंद आणि अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. देशभरात रोकड, अंमली पदार्थ, दारू, मौल्यवान धातू आणि मोफत वाटण्यासाठी आणलेल्या वस्तू अशा एकूण मुद्देमालाची किंमत तब्बल २,५५० कोटींच्या घरात जाते. यांपैकी ४९९ कोटींचा मुद्देमाल हा तामिळनाडूमधून जप्त करण्यात आला आहे.