वाहन विम्यासाठी आता जास्त पैसे मोजा!

0
185

वाहन विम्यासाठी विमाधारकाला आता किमान ६०० रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. वाहन विमा घेताना वैयक्तिक अपघात विम्याचे संरक्षण घेणे सक्तीचे करण्यात आले असून विमा संरक्षणाच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. विमा कंपन्यांवर नियंत्रण ठेवणार्‍या ‘दि इन्शुरन्स रेग्युलेटरी ऍण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया’ने (आयआरडीएआय) २० सप्टेंबर २०१८ रोजी विमा कंपन्यांना पत्रक काढून सूचना दिल्या आहेत की, यापुढे वाहन विमा उतरविताना वैयक्तिक अपघात विमा १५ लाख रुपयांचा सक्तीने उतरविलाच पाहिजे. यापूर्वी ही मर्यादा दुचाकी वाहनांसाठी एक लाख रुपये व चारचाकी वाहनांसाठी २ लाख रुपये इतकी होती. मद्रास उच्च न्यायालयाने ‘आयआरडीएआय’ला ही सूचना केली होती. ‘आयआरडीएआय’ने सर्व विमा कंपन्यांना हा नवा बदल २५ ऑक्टोबर २०१८ पर्यंत अंमलात आणण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वाहन विम्याचे दोन भाग असतात. एक ‘थर्ड-पार्टी लाएबिलिटी कव्हर.’ यात रस्त्यावरून चालणार्‍या किंवा त्रयस्त व्यक्तीला वाहनामुळे अपघात झाला तर त्याला किंवा जर अपघातात त्रयस्त व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या कायदेशीर वारसाला विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळते. प्रत्येक वाहनधारकाकडे हे विमा संरक्षण असणे सक्तीचे आहे. दुसरा भाग म्हणजे ‘ओन डॅमेज कव्हर.’ यात वाहनाला अपघात झाला, वाहनाची चोरी झाली वगैरेसाठी नुकसान भरपाई मिळू शकते. थर्ड पार्टी विम्यासाठीचा प्रिमियमचा दर ‘आयआरडीएआय’ दरवर्षी ठरवते, तर ‘ओन डॅमेज कव्हर’ विम्याच्या पॉलिसीचा ‘प्रिमियम’ दर प्रत्येक विमा कंपनी स्वतः ठरविते.
‘इंडिया मोटर टॅरिफ २००२’नुसार सक्तीचा वैयक्तिक अपघात विम्याचे संरक्षण हे वाहन विम्याच्या संरक्षणाचा अंतर्गत भाग आहे. हे संरक्षण वाहनाच्या मालकाला तो स्वतः वाहन चालवीत असताना अपघात झाला मिळते. मात्र त्याच्याकडे वैद्य वाहन चालविण्याचा परवाना हवा असा ‘इंडिया मोटर टॅरिफ’ या यंत्रणेचा नियम आहे.
आतापर्यंत वैयक्तिक अपघात विम्यासाठी दुचाकीधारकाला १ लाख रुपयांपर्यंतच्या विमा संरक्षणासाठी ५० रुपये प्रिमियम भरावा लागत होता, तर खाजगी चारचाकी किंवा व्यवसायासाठी वापरली जाणारी चारचाकी यांना २ लाख रुपयांच्या वैयक्तिक अपघात विमा संरक्षणासाठी १०० रुपये प्रिमियम आकारला जात होता. आता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी १५ लाख रुपयांचे वैयक्तिक अपघात विमा संरक्षण सक्तीचे करण्यात आले असून, यासाठी ७५० रुपये प्रिमियम अधिक आकारले जाणार आहेत. एखाद्या वाहनधारकाला १५ लाख रुपयांहून अधिक रकमेचे वैयक्तिक अपघात विमा संरक्षण हवे असेल तर त्याला ते मिळण्याचीही तरतूद आहे. त्यासाठीचा जास्त प्रिमियम त्याला भरावा लागेल.
वैयक्तिक विमा अपघातात वाहनचालकाचा/वाहनधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा त्याला कायमचे अपंगत्व आल्यास विमा संरक्षण मिळते. नुकसान भरपाई आर्थिक स्वरूपात मिळते. मृत्यू झाल्यास १५ लाख रुपये आर्थिक नुकसान भरपाई मिळणार. अपघातात दोन्ही डोळे निकामी झाल्यास किंवा दोन्ही हात, दोन्ही पाय निकामी झाल्यास १०० टक्के नुकसान भरपाई मिळते. एकच हात, एकच पाय किंवा एकच डोळा निकामी झाला असेल तर विमा संरक्षण असलेल्या रकमेच्या ५० टक्के रक्कम नुकसानभरपाई म्हणून मिळू शकते. ज्याचे नाव वाहन चालविणारा म्हणून पॉलिसीत नमूद असेल त्यालाच हे विमा संरक्षण मिळणार. वाहन कंपनीच्या मालकीचे असेल तर हे विमा संरक्षण मिळत नाही. वाहनाची मालकी वैयक्तिक हवी.
कंपन्यांच्या वाहनांचा वैयक्तिक अपघात विमा संरक्षणाचा प्रिमियम ‘इंडिया मोटर टॅरिफ’च्या नियमानुसार आकारता येत नाही. एका व्यक्तीच्या बर्‍याच चारचाकी असतील तर त्याला यांपैकी एका चारचाकीसाठीच हे विमा संरक्षण मिळेल. ते कोणत्या चारचाकीसाठी घ्यायचे हे वाहनधारक ठरवू शकतो. पण ज्या चारचाकीसाठी संरक्षण घेतले आहे ती गाडी न चालविता दुसरी गाडी चालविताना अपघात झाला तरी तो हे विमा संरक्षण मिळण्यास पात्र आहे. दुसरी गाडी घेताना त्याने पहिल्या गाडीसाठी वैयक्तिक अपघात विमा संरक्षण घेतले आहे याचा पुरावा विमा कंपनीला सादर करावा लागतो.
१ सप्टेंबरपासून नवीन खाजगी वाहनांसाठी अधिक वर्षांचा थर्ड पार्टी विमा सक्तीचा करण्यात आला आहे. आता नव्या दुचाकींना थर्ड पार्टी विमा पाच वर्षांचा व खाजगी ‘कार’ना तीन वर्षांचा सक्तीचा करण्यात आला आहे. विमा कंपन्या आता दुचाकींचा पाच वर्षांचा व चारचाकींचा तीन वर्षांचा, अशी विम्याच्या ‘प्रिमियम’ची रक्कम सुरुवातीलाच वसूल करतात.