वाराणसीत उड्डाणपूल कोसळून १८ ठार

0
72

येथे बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळून झालेल्या अपघातामध्ये १८ जण ठार झाले असून सुमारे ५० जण ढिगार्‍याखाली दबले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ढिगार्‍याखाली दबलेल्यांची संख्या पाहता मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेनंतर शोक व्यक्त केला असून घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

सुमारे दोन वर्षांपासून या पुलाचे काम सुरू होते. तरी या पुलाखालून वाहनांची ये-जा सुरू होती. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. छावणी रेल्वे स्थानकाच्या जवळ या उड्डाणपुलाचे काम सुरू होते. मृतांत आणि ढिगार्‍याखाली अडकलेल्या लोकांमध्ये बहुतांश मजुरांचा समावेश असून कार, ऑटो आणि दुचाक्यांसह अनेक वाहने दबली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जेसीबीच्या साहाय्याने ढिगारा उपसण्याचे आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ढिगार्‍याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू असून एनडीआरएफच्या उपकरणांसह पाच पथके घटनास्थळी कार्यरत आहेत. स्थानिक अधिकारी, पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीची पाहणी करत आहेत.

वाराणसीचा हा भाग अत्यंत गर्दी असलेला आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी या प्रकरणी चौकशी समितीची स्थापना केली असून पुढील २४ तासांत सरकारला अहवाल सादर करावा असे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख, तर जखमींना २ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केली आहे.