लॉकडाऊनमध्येही व्यवहार सुरळीत राहतील असे धोरण बनवा ः पंतप्रधान

0
129

>> व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांची घेतली बैठक

 

लॉकडाऊन राहील आणि जीवनही सुरळीत सुरू राहील असे धोरण बनवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना काल केले. लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करून ठरवायचे आहे. कोरोना दीर्घकाळासाठी आपल्यात राहणार असल्याचे समजूनच राज्यांनी धोरण ठरवावे असे सांगून दो गज दूरी हा आपल्या जीवनाचा मंत्र बनवा आणि आत्मसात करा. मास्क, फेसकव्हर हे देखील आपल्या जीवनात खूप काळासाठी राहणार आहेत हे लक्षात घ्यावे असे आवाहन यावेळी पंतप्रधानांनी केले. दरम्यान, लॉकडाऊनबाबतचा निर्णय ३ मे नंतरच होणार असल्याचे यावेळी पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

देशात लागू असलेल्या दुसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊनची मुदत ३ मे रोजी संपत आहे. याच पार्श्वभूमीवर ३ मे नंतरच्या नियोजनासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, करोना साथीला सुरुवात झाली आणि आपण योग्य वेळी लॉकडाऊनचा निर्णय आपण घेतला. राज्यांनी याची चांगली अंमलबजावणी केली त्याला जनतेनेदेखील साथ दिली. आपल्याला आता एका बाजूने कोरोनाचा मुकाबला करायचा आहे तर दुसरीकडे आर्थिक व्यवहार गतीने सुरू करायचे आहेत. ३ मे रोजी दुसरा लॉकडाऊन संपण्याची तारीख असली तरी विशेषत: रेड आणि ऑरेंज झोनमध्ये अतिशय काळजी घेण्याची आणि काटेकोर उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. संक्रमण क्षेत्रांची संख्या वाढणार नाही याचा आटोकाट प्रयत्न करावा लागेल.त्यासाठी जे जे काही करणे आवश्यक आहे ते करा, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

ज्या राज्यांत कोरोनाचा आकडा वाढतोय म्हणजे काही ती राज्ये गुन्हेगार नव्हेत असे स्पष्ट करून पंतप्रधानांनी आकड्यांचा दबाव घेऊ नका. भयभीत होऊ नका. अशा राज्यांनी खाली मान घालण्याची गरज नाही. ज्या राज्यांत आकडे कमी आहेत म्हणजे काही ती महान आहेत असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.

————–

लॉकडाऊन वाढवण्याची

१० राज्यांची मागणी

ज्या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, अशा १० राज्यांनी लॉकडाऊनच्या बाजूने आपले मत नोंदवले आहे. या राज्यांमध्ये दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांचा समावेश आहे. तेलंगण या राज्याने तर या पूर्वीच राज्यातील लॉकडाउन ७ मेपर्यंत वाढवला आहे.

———————

रुग्ण संख्या पोहोचली २७ हजारांवर

दरम्यान, २४ तासात देशभरात १३९६ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. देशातील रुग्णांची संख्या ही आता २७ हजार ८९२ इतकी झाली आहे.

दरम्यान ३८१ रुग्णांना एका दिवसात डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत ६ हजार १८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

देशातील १६ जिल्हे असे आहेत जिथे गेल्या २८ दिवसात कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. तर ८५ जिल्हे असे आहेत जिथे मागील १४ दिवसांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका, तसेच कोणत्याही धर्म किंवा पंथाला कोरोनाचे लेबल लावू नका. कोरोना कुणालाही होऊ शकतो. हा एक संसर्गजन्य आजार आहे. तो बरा होतो त्यामुळे कुठेही तेढ निर्माण होईल असे वातावरण निर्माण करू नका असेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले.