राजस्थानमधील बाडमेर येथे रामकथेचा कार्यक्रम सुरू असताना अचानक आलेल्या वादळी वार्यासह पावसामुळे मंडप कोसळून घडलेल्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला. तर ४५ पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना घडली तेव्हा मंडपात बसलेले अनेकजण दबले गेले. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अचानक आलेल्या पावसामुळे मंडपातील काही भागात विद्युत प्रवाह देखील उतरला होता. तर मंडप अंगावर कोसळल्याने घटनास्थळी एकच पळापळ आणि गोंधळ निर्माण झाला होता. पावसामुळे मंडपाच्या सभोवताली देखील मोठ्या प्रमाणात चिखल साचला होता. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अनेकांचा मृत्यू हा मंडपाखाली गुदमरून तसेच विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने झाल्याचे सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, राजस्थानमधील बाडमेर येथील मंडप पडल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. माझ्या संवेदना पीडितांच्या कुटुंबाबरोबर आहेत. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे यासाठी मी प्रार्थना करतो. मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले की, बाडमेरमध्ये रामकथेदरम्यान मंडप पडून घडलेल्या दुर्घटनेमुळे अनेकांचा जीव गेला, ही बातमी अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. स्थानिक प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे. संबंधित अधिकार्यांना तपासाचे आदेश दिले आहेत.