राज्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा

0
164

>> जलस्रोत खात्याच्या सूत्रांची माहिती

>> साळावली धरणात ३६ टक्के पाणी

यंदा मे महिन्याला प्रारंभ झाला तरी धरणामध्ये योग्य प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध आहे. राज्यातील विविध भागात पाण्याचा पुरवठा करणार्‍या प्रमुख साळावली, अंजुणेसह अन्य धरणांमध्ये मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती जलस्रोत खात्याच्या सूत्रांनी दिली.

राज्यातील धरणातील पाण्याची पातळी एप्रिल, मे महिन्यात कमी होते. जलस्रोत खात्याकडून राज्यातील नद्या, धरणांतील पाण्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम केले जाते. जलस्रोत खात्याकडून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

राज्यातील प्रमुख धरण असलेल्या साळावलीमध्ये साधारण ३६ टक्के पाण्याचा साठा आहे. या धरणातील पाण्याची पातळी आता ३३.०५ मीटर एवढी आहे. अंजुणे धरणामध्ये २६ टक्के पाण्याचा साठा आहे. या धरणातील
सध्याची पाण्याची पातळी ७६.९६ मीटर एवढी आहे. आमठणे धरणात ३८ टक्के पाण्याचा साठा उपलब्ध आहे. या धरणातील पाण्याची पातळी ४४.४४ मीटर एवढी आहे. पंचवाडी धरणामध्ये ५२ टक्के तर चापोली धरणामध्ये ५५ टक्के पाण्याचा साठा आहे. पंचवाडी धरणात पाण्याची पातळी २२.५७ तर चापोलीत ३३.०६ पाण्याची पातळी आहे. या दोन्ही धरणांमध्ये पाण्याचा नियमित भरणा केला जातो. वर्ष २०१७ मध्ये राज्यात पाऊस योग्य प्रमाणात पडल्याने सर्व धरणे भरली होती. त्यामुळे आत्तापर्यंत पाण्याची पातळी समाधानकारक आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम खात्याकडून धरणातील पाण्याचे शुद्धीकरण करून नागरिकांना पुरविण्यात येते. आगामी पावसाळ्यापर्यंत पाण्याचे नियोजन करण्यासाठी दरवर्षी एप्रिल – मे महिन्यात पाण्याचा मर्यादित स्वरूपात पुरवठा केला जातो. सध्या राज्यातील काही भागात नागरिकांना योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही, अशा तक्रारी वाढू लागल्या आहेत. राज्यातील काही भागातील नागरिकांना अपुर्‍या साधन सुविधांमुळे योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नाही. पाणी पुरवठ्याच्या सुविधांमध्ये वाढ करण्याची गरज आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.