युपी, राजस्थानातील वादळात बळींची संख्या १२९ वर

0
66

उत्तर प्रदेश आणि राजस्थानासह देशाच्या इतर भागात आलेल्या वादळामुळे आतापर्यंत १२९ लोक ठार झाले आहेत. सध्या तरी वादळ ओसरलेले असले तरी आगामी ४८ तास धोक्याचे असून पुन्हा वादळी पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाऊस आणि वाळूचे वादळ एकत्र आल्याने इमारतींच्या भिंतीही खचल्या असून या वादळामुळे ५० कोटींचे नुकसान झाल्याचे राजस्थानच्या वीज विभागाने जाहीर केले आहे.

दरम्यान, वादळ ओसरले असले तरी या वादळाचा धोका काही टळलेला नाही. हवामान खात्याने उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये अलर्ट जारी केला आहे. आगामी ४८ तास सावध राहण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तराखंड आणि बिहारसह १६ राज्यांमध्ये वादळाचा तडाखा बसण्याचा इशारा देण्यात आला असून आगामी पाच दिवस सतर्क राहण्याचे आदेश राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिले आहेत. तसेच राजस्थानमध्ये धुळीचे वादळ येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन विभागानं हवामान खात्याच्या हवाल्याने देशात पाच दिवसांचा नवा अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, बिहार, झारखंड, तेलंगणा, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, दक्षिण कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ओडिसा आदी ठिकाणी वादळ येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि दक्षिण कर्नाटकमध्ये अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. या राज्यांमध्ये ८ मे पर्यंत हवामान खराब राहणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने म्हटलं आहे.