माध्यान्ह आहारातून विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याचे प्रकार रोखण्यासाठी प्रत्येक शाळा समुहाच्या एका मुख्याध्यापकाला त्यांना अन्न पुरवणार्या स्वयंसेवी गटाच्या स्वयंपाकाच्या खोलीची तसेच अन्न स्वच्छ वातावरणात शिजवण्यात येते की नाही याची पाहणी करण्याचे अधिकार शिक्षण खात्याने दिले आहेत. त्यांना लवकरात लवकर ही तपासणी करण्याचे काम हाती घेण्याची सूचना केली असल्याचे शिक्षण संचालक गजानन भट यांनी काल सांगितले. तपासणी करून खात्याला अहवाल पाठवण्याची सूचनाही त्यांना करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. ही तपासणी कशी करावी त्यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वेही तयार करण्यात आली असल्याचे भट यांनी सांगितले. राज्यभरात सध्या ३०० शाळा समूह (स्कूल कॉम्प्लेक्स) आहेत. दरम्यान, शिक्षण खात्याने राज्यातील स्वयंसेवी गटांना माध्यान्ह आहाराचे कंत्राट आणखी एका वर्षासाठी (२०१७-१८) वाढवून दिले असल्याचेही भट यांनी सांगितले. पुढच्या वर्षापासून हे कंत्राट इस्कॉनच्या अक्षयपात्रला देण्यात येणार असल्याची सध्या चर्चा आहे.