माणूस ः नशिबाच्या हातातील कठपुतळी

0
360
  •  अनुराधा गानू
    (आल्त- सांताक्रूझ
    बांबोळी)

नशिबाचे झोके… प्रत्येकाच्या बाबतीत बर- खाली होत असतात. कधी हा झोका माणसाला एकदम उंचीवर नेऊन पोहचवतो तर कधी हा झोका एखाद्याला रस्त्यावर आणून आपटतो. काही लोकांच्या नशिबात फक्त उपेक्षाच असते तर काहींच्या नशिबात मान-सन्मान असतो.

नुकतेच ओळखीचे एक जण भेटले होते. मी विचारलं, ‘‘काय झालं तुमच्या कामाचं?’’ तर म्हणाले, ‘‘कसचं काय वहिनी, पावणे शंभर टक्के काम झाल्यातच जमा होतं आणि पाव टक्क्यावर माशी कुठेतरी शिंकली आणि सगळं काम फिसकटलं’’. यालाच म्हणतात- देअर इज गॅप बिटविन कप अँड लिप्स. तोंडाशी आलेला घास तोंडात जाईलच असं नाही. नशीब म्हणायचं. नशीबाची साथ नसेल तर सगळं व्यर्थ!
खरंच, माणसाच्या आयुष्यात नशिबाचं स्थान फार मोठं आहे. नशिबात असेल तर नसलेलं कुठून तरी मिळतं आणि नशिबात नसेल तर समोर दिसत असलेलंही मिळत नाही. आठवण झाली या २-३ वर्षांत केरळ, आंध्रप्रदेश, ओरिसा इ. ठिकाणी झालेल्या त्सुनामीची, वादळाची. फार भयंकर होतं सगळं. कितीतरी लोकांची घरं पत्त्यासारखी कोसळली. कितीतरी लोक बेघर झाले. रस्त्यावर आले. कित्येक श्रीमंत लोक भिकेला लागले. नशिबानं जे हात दानासाठी पुढे सरत होते त्याच हातांवर भिक घेण्याची वेळ आली. अन्नासाठी, कपड्यांसाठी कोणाच्या दारात जायची वेळ कधी येईल, असं त्यांनाच काय पण इतरांनाही त्यांच्या बाबतीत असं वाटलं नव्हतं. पण नशिबानं त्यांच्यावर ही वेळ आणलीच. १९६१साली पानशेत धरण फुटून पुण्यात पूर आला. तेव्हाही असंच झालं. नदीकाठची घरं सामानासकट वाहून गेली. लोक बेघर झाले. अन्नान्न दशा होणं, बेघर होणं हा काही लोकांना बसलेला नशिबाचा फटका होता. पण काही लोकांच्या बाबतीत हाच पूर चांगलं नशीब घेऊन आला. या बेघर झालेल्या लोकांना सरकारने दुसरीकडे जागा दिल्या, घरं बांधून दिलीत. लोक त्यात राहू लागले. काही वर्षांनी परिस्थिती बदलली. त्या जमिनींना खूप भाव आले. लोकांनी फुकट मिळालेल्या जमिनी चढ्या भावाने बिल्डरला विकल्या. तिथे मोठ्या हाउसिंग सोसायट्या आल्या. त्यात त्यांना फ्लॅटही मिळाले आणि वर पैसाही. पूर्वी नदीकाठच्या लहान घरात बेताच्या परिस्थितीत राहणार्‍या लोकांचं नशीब फुललं. रंकाचे राव झाले. नशीबात असलं म्हणजे काय वाटेल ते मिळून जातं ते असं!

समुद्राकाठचे लोक मासेमारी करून कसं बसं पोट भरायचे. परिस्थिती बदलली. समुद्रकाठावर मोठमोठी हॉटेल्स उभी राहिली. आलिशान फ्लॅट्‌सच्या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. मासेमारी करणार्‍यांनी आपल्या जमिनी बिल्डरला विकल्या. आज ती गरीब माणसं लक्षाधीश- कोट्यधीश झाली. पुण्यातले बरेचसे फुलबाग फुलवणारे लोक पेशव्यांकडे फुले पोहोचवत. त्या त्या बागेच्या जागा पेशव्यांनी त्यांना वतनं म्हणून दिल्या. आज त्या जमिनी विकून ते फुलवालेही कोट्यधीश झालेत. म्हणून म्हटलंय ना, ‘‘नसीब देता है तो छप्पर फाड के देता है’’. जे लोक कष्ट करतात, स्वतःला मदत करतात, प्रामाणिकपणे मेहनत करतात, त्यांना नशीब नेहमीच साथ देते. बघा, एकेकाळचा प्लॅटफॉर्मवर चहा विकणारा मुलगा, नशिबाने आज त्याला त्याच देशाचा प्रधान मंत्री बनवलं. त्याच्या प्रामाणिक कष्टाला नशिबानं दिलेली ही साथच आहे. अशी असते नशिबाची किमया!!

आमच्या ओळखीचा एक मुलगा. अत्यंत हुशार, इतका की तोड नाही त्याच्या बुद्धीला! शाळा-कॉलेज नेहमी गाजवणारा. आईवडलांची भिस्त त्याच्यावरच. पण शेवटच्या परिक्षेत नशिबाचा फासा उलटा पडला. परिक्षेला गेलेल्या मुलाला काही आठवलं नाही आणि तो चक्क नापास झाला. त्याला वेड लागलं. इतक्या हुशार मुलाच्या नशिबात हे वेड आलं आणि हे बघणं, सोसणं आईवडलांच्या नशिबी आलं. तसंच आणखी एक उदा.- आमच्या ओळखीचं कुटुंब हसतं खेळतं, न मागताच नशिबानं भरपूर दिलेलं. पण एकदा नशिबाचा फटका असा बसला की एकेक करून आईवडील गेले. मुलगा गेला. त्याची तरणी-ताठी मुलं गेली आणि मागे उरली एकटी सून.

अनेक वेळा असे अपघात होतात की घरातली सगळी माणसं त्यात जातात आणि उरतं एखादं छोटं मूल. त्याला अनाथाचा शिक्का नशीबानं मारलेला असतो पण तेच नशीब मातृछायेसारख्या संस्थेची दारही त्याच्यासाठी उघडून देतं आणि त्याचं अनाथपण घालवून टाकतं. काही वेळेला अपघातात घरचा कर्ता पुरुष मृत्युमुखी पडतो. मरणारा मरून जातो पण पाठीमागे उरलेल्यांच्या नशिबी कायमचं वैधव्य, पोरकेपण, दुःख येतं. काही माणसांच्या नशिबात फक्त सुखच सुख असतं. पण काही माणसांच्या नशिबात जन्मापासूनच दुःख त्यांची पाठ सोडत नाही. काही माणसांच्या नशिबात महाल असतो तर काहींच्या नशिबात फाटकी झोपडीही नसते. काहींना नशिबात पंचपक्वान्न असतात तर काही अन्नाला मोहताज असतात. काहींना नशिबाने कचरा पेटीतून अन्न शोधून घ्यावं लागतं तर काहींना भिक मागून खावं लागतं.

एकूण काय… नशिबाचे झोके… प्रत्येकाच्या बाबतीत बर- खाली होत असतात. कधी हा झोका माणसाला एकदम उंचीवर नेऊन पोहचवतो तर कधी हा झोका एखाद्याला रस्त्यावर आणून आपटतो. काही लोकांच्या नशिबात फक्त उपेक्षाच असते तर काहींच्या नशिबात मान-सन्मान असतो. एकूण माणसाच्या आयुष्यात नशिबाच्या पाठशिवणीचा खेळ चालूच असतो. पण नशिबाची पाठही आपल्याला दिसत नाही आणि तोंडही दिसत नाही. पण एक मात्र खरं, माणूस कितीही बढाया मारू देत, नशिबाची साथ असल्याशिवाय काही खरं नाही. आपण सगळे नशिबाच्या हातातल्या कठपुतळ्या आहोत. नशीब दोर हलवेल तसं आम्ही हलणार. नशीब नाचवेल तसं त्याच्या तालावर आम्ही नाचणार, खरं ना! प्रयत्न करत राहणं हेच आमच्या हातात आहे फक्त!!