‘माज’ विरोधी लस!

0
183

– सौ. मीरा प्रभूवेर्लेकर
अधिकाधिक सुखसोयी पुरवल्या की मुलांचं जीवन समृद्ध होईल असा समज बाळगणारे आई-बाबा नव्हे मॉम-डॅड आजकाल समाजात दृष्टीस पडतात. आपण ज्याला ज्याला बालपणी वंचित झालो ते ते मुलांना मिळवून देण्यासाठी त्यांचा आटापिटा चाललेला असतो. श्रीमंतांच्या मुलांना मिळणार्‍या सुखसोयी आपल्याही मुलांना काही प्रमाणात तरी मिळाव्यात यासाठी मध्यमवर्गीय आई-बाबांची ही धडपड असते. आर्थिक समतोलता नसलेली मुलं शाळेमध्ये एकमेकांच्या सहवासात येतात. इथे बड्या बापांच्या बेट्याचा बडेजाव आणि मध्यमवर्गीय मुलांचा आपल्या आर्थिक परिस्थितीबद्दल असलेला उणा भाव यामध्ये अदृश्य रूपात मानसिक संघर्ष चालू असतो. जेमतेम परिस्थिती असलेल्या मुलांची अधाशी नजर धनिक मुलांच्या माज-मुजोरीला अधिकच तेज बनवते. ही मुलं शाळेत आपल्या श्रीमंतीचा दिमाख दाखवतात. इतरांच्या भुकेल्या नजरा चाळवण्यात त्यांना एक प्रकारचा वेगळा आनंद मिळतो. धनाढ्य पालकांनाही आपल्या पाल्यांना जास्तीत जास्त सुखसुविधा देऊन ऐषआरामात लोळवण्यात धन्यता वाटते. आणि तसंही या मुलांच्या माध्यमातून समाजामध्ये आपल्या ‘स्टेटस्’चं प्रदर्शन करण्याचाच त्यांचा हेतू असतो. आया-आयांमध्ये तर याबाबत किती चढाओढ लागलेली असते हे आपण पाहतोच. मुलांच्या हाती सोपवलेल्या पैशांचा त्यांनी दुरुपयोग केल्यास आपली आर्थिक संपन्नताच कदाचित मुलांना मानसिक विपन्नतेकडे नेऊ शकेल याचा पुसटसा अंदाजही पैशाची धुंदी चढलेल्या धनिकांना येत नाही. इथेच मुलांच्या जडणघडणीच्या काळामध्येच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात ‘माजा’चं बीज रुजलं जाण्याची शक्यता असते. बडे उद्योगपती, मंत्री, राजकारणी यांचे कुलदीपक या माजामुळेच काय दिवे लावतात; बापाच्या मोठेपणावर कसली थेरं, लफडी, भानगडी करून बसतात याची कित्येक उदाहरणं आपण पाहतो. पिताश्रींचे हात वरपर्यंत पोचलेले असल्यामुळे युवराज अवैध कामं करण्यास मोकाट सुटलेला असतो. पिताश्रींचं वजन असल्याने कायद्याच्या कचाट्यातून सुटका होऊन शिक्षेपासूनही त्याचा बचाव होतो. परंतु जन्मभरासाठी कुळाला लागलेला काळिमा मात्र कधीच पुसून टाकला जात नाही. आपल्या पुत्राचा ‘ऐसा व्हावा गुंडा’चा आलेला धक्कादायक प्रत्यय आपल्याच संस्कारांचं फलित आहे या अनुभवाच्या पश्‍चात ती पश्‍चात्तापात होरपळून निघते. पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. ही सारी पार्श्‍वभूमी लिहिण्यामागचं कारण हेच की या अशा वैभवधुंद, अविचारी मातांना छेद देणार्‍या एका आगळ्या विचारांच्या मातेशी माझा परिचय झाला. मला तिचं साश्‍चर्य कौतुक वाटलं. तिचा आदर्श आजच्या इतरही आयांनी घेऊन उगवत्या पिढीला चंगळवादापासून दूर ठेवण्याचा आपल्या परीने प्रयत्न करावा असं वाटलं आणि तिच्याविषयी आवर्जून लिहावसं वाटलं.
गोव्याहून मुंबईला लेकीकडे मुक्कामास आले होते. त्यांच्याच सोसायटीमध्ये हे कुटुंब आहे. तिचे सासरे एम्.पी. (मेंबर ऑफ पार्लमेंट); नवरा एम.एल.ए. कम पायलट. पदरी दोन मुलं. मोठा मुलगा आठ वर्षांचा. राजकारणी म्हटल्यावर घरात बड्या बड्या प्रस्थांची ऊठ-बस, आपापली कामं घेऊन येणार्‍या जनता जनार्दनाची वर्दळ, वेळी-अवेळी टपकणारं मित्रमंडळ, खुशमस्कर्‍यांची बुरावळ, नोकर-चाकर, ड्रायव्हर्स… अशा सर्व स्तरातील माणसांची रेलचेल, हे आलंच! आमदार वैभवाच्या शिखराच्या कितीही उंचावर असले किंवा नभांगणात उंचावरून उड्डाण करणारे असले तरी त्यांचे पाय मात्र नेहमीच जमिनीवर असतात. तसेच त्यांच्या पत्नीचेही!
थोडक्यात हे सुसंस्कृत कुटुंब धनाने, मनाने, प्रतिष्ठेने, इभ्रतीने मोठं असूनही ‘डाऊन टू अर्थ’ असण्याचा दुर्मिळपणा लाभलेलं, हे विशेष. सासरा-नवर्‍याच्या सरकारी हुद्यानुसार, बदलत्या काळाच्या प्रवाहानुसार घरात एकदा का ‘हाय-फाय’नेसचं वारं वाहू दिलं तर, मुलांना कुठच्या कुठे ते भिरकावत नेईल ही दूरदृष्टी ठेवून तिने घरातलं वातावरण, वर्तन मध्यम दर्जाचं ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या श्रीमंतीला साधेपणाची झालर त्यांनी लावली होती. वाढत्या वयाबरोबर चिरंजीवांच्या अकलेचा कांदा नासू नये, डोक्यात श्रीमंतीची हवा जाऊ नये यासाठी तिने घरातील सर्वांवर, नातेवाइकांवर वगैरे फक्त आणि फक्त त्यांच्या वाढदिवसाखेरीज इतर कोणत्याही दिवशी परगावाहून किंवा परदेशातून सुद्धा येताना गिफ्टस् आणायची अक्षरशः बंदी घातली. एवढी खबरदारी आपल्या परीनं आईनं घेतली असली तरीही चिरंजीवाच्या वाढत्या वयाबरोबर त्याच्या नजरेला झालेल्या मोठेपणाच्या जाणिवा कशा पुसता आल्या असत्या? आजोबा-वडिलांची ‘मोठं’ असण्याची जाणीव त्याला होत होती. कारण सर्वजण त्यांच्याशी कसे मानानं, अदबीनं वागतात, सशस्त्र अंगरक्षक आजोबांच्या पाठून कसे फिरत असतात, कामकाजाची, नोटांची बंडलं कशी पडलेली असतात, मुजरे-सलाम-रामराम हे सगळं घरातील चित्र पाहून त्याच्या वर्तनात झालेला फरक आईच्या तीक्ष्ण नजरेतून सुटला नाही. आपल्या आणि वर्गमित्राच्या घरच्या वातावरणातला फरक त्याला कळू लागला. त्यांच्याबरोबरचं त्याचं वागणं बदलत असल्याचं तिच्या लक्षात आलं. त्याला ‘ग’ची बाधा होईल की काय आणि असं झालं तर तो बिघडून जाईल या विचाराने ती बेचैन झाली. बिघडून वाईट मार्गाला लागलेली उदाहरणं तिच्या डोळ्यांसमोर थैमान घालू लागली. मुलगा मोठा होत असताना हेच चित्र त्याच्या नजरेसमोर कायम असेल तर त्याचं पुढे काय होईल या कल्पनेनेच तिला घाम फुटला. या श्रीमंती बडेजावाचा दृष्टिस्पर्शही न होणं हे तर अपरिहार्यच होतं आणि हे सारं नीट समजावण्याचं त्याचं वयही नव्हतं. तरीही त्याचं मानसिक पोषण याच वयापासून गर्वविरहित आणि नम्रतेच्या भावनांनी, उत्तम विचार पेरून व्हायला हवं हे प्रकर्षाने तिला जाणवलं. ती रात्र त्याच्या भवितव्याच्या काळजीनं तिने अक्षरशः जागून काढली. त्याच्या डोळ्यांवर आलेली धुंदी त्याच्या डोक्यात चढू देऊ नये यासाठी आत्ताच खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे असं तिनं स्वतःला बजावलं.
दुसर्‍या दिवशी चिरंजीव शाळेतून आल्या आल्या त्याचं चहा-पाणी आवरून ती त्याला आपल्या रूममध्ये घेऊन गेली. आपल्या शेजारी बसवलं. त्याच्या डोक्यावरून तिचा मायेचा हात फिरला. त्याला समजेल अशा शब्दात म्हणाली, ‘‘बाळा, काल तुझ्या मित्रांबरोबर झालेले संवाद मी ऐकत होते. तुझे खेळ, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू त्यांना दाखवताना तुला खूप ग्रेट असल्याचा फील येत होता, हो ना? खरं सांग. तुझा तो ऐवज पाहताना आपल्याकडे मात्र या वस्तू नाहीत याची एक प्रकारची खंत काहींच्या चेहर्‍यावर मला स्पष्ट दिसत होती. हे बघ, तू त्यांना जे काही दाखवतोयस, ते तुझ्या बाबांनी खूप मेहनतीच्या कमाईतून आणलेलं आहे. फुकट नाही मिळालेलं. माणसाला त्याने घेतलेल्या कष्टानुसार मिळत असतं आणि तेच त्याचं असतं. सत्ता असली की आपोआप नाव मिळतं, लक्ष्मी येते. तिचा दुरुपयोग तुझ्या बाबांनी कधीच केला नाही. परंतु हाती आलेली सत्ता कायम टिकणारी थोडीच असते? आज आहे तर उद्या नसेलही! तू बघतोयस ना, की जनतेची कामं करण्यात किती व्यस्त असतात ते! वेळेवर धड अन्न पोटात टाकायला त्यांना फुरसत नसते. दौर्‍यावरून थकून भागून घरी येणं, निश्चिंत झोप न मिळणं हे आरोग्यासाठी किती घातक आहे? पण तरीही ते स्वतःच्या जिवाची पर्वा न करता झटत असतात. आपल्या कुटुंबाला थोडा वेळ द्यावा असं त्यांना वाटत नसेल का? वाटतं. पण या व्यापात ते कौटुंबिक सुखही मिळवू शकत नाही रे! हे पहा, हा सारा मान, प्रतिष्ठा, पैसा हे फुकट नाही मिळालेलं! त्यांनी दिलेल्या योगदानाचा हा मोबदला आहे. त्यांच्यामुळे आपण हे सुख उपभोगतोय. म्हणून आपण त्यांच्या नावावर मोठं होता कामा नये, राजा! आता तू लहान आहेस, तू ही शिकून मोठा होशील, कमवशील, तेव्हा ते फक्त तुझं स्वतःचं असेल. बाबांच्या मोठेपणावर आपण का बरं मोठेपणा मिरवायचा? होय की नाही? मी हे सगळं तुला का सांगते आहे तर अलीकडे तू तुझ्या मित्रांसमोर जो काही रुबाब दाखवू लागलायस ना, ते ठीक नाही बाळा! बाबांच्या मोठेपणावर तू मोठा झालेला मला नाही आवडणार! समजतंय नं तुला, मी काय म्हणतेय ते!’’
चिरंजीव निरागस चेहर्‍यानं डोळे विस्फारून आईचे बोल लक्षपूर्वक ऐकत होता. आजची मुलं वयाच्या मानाने खूपच स्मार्ट असतात. त्याला आईच्या सांगण्याचा नेमका अर्थबोध झाला होता. कारण त्यानंतर मित्रांकडे बढाया मिरवणारा युवराज, आईला पुन्हा कधीच दिसला नाही. आपण योग्यवेळी ‘माज’विरोधी टोचलेली उपदेशाची लस त्याला लागू पडल्याची खात्री त्या आईला पटली आणि ती निश्चिंत झाली.