मधुमेह आणि त्यामुळे येणारी संकटं…

0
132

मधुमेहतज्ज्ञांकडे नियमित न येणारे रुग्ण गाफिल राहतात आणि एक दिवस अचानक इमर्जन्सी येऊन रुग्णाला थेट ‘आयसीयू’मध्ये भरती करावे लागते. अशाच काही इमर्जन्सीजची माहिती या लेखात आपण घेणार आहोत.
डायबेटिसबद्दल इतके अत्याधुनिक शोध लागले आहेत, की साधारणपणे शुगरसाठी रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण नगण्य आहे. तरीही रजिस्टर पाहिले, तर भरती होणार्‍या रुग्णांमध्ये डायबेटीस असलेल्यांचे प्रमाण जास्त असते. रुग्णालयात मृत्यूचे रेकॉर्ड तपासले, तर डायबेटीस असलेले रुग्ण जास्त असतात. डायबेटीस असलेल्या रुग्णांचा रुग्णालयात राहण्याचा कालावधी इतरांपेक्षा जास्त असतो. याचाच अर्थ असा, की डायबेटीसचे रुग्ण बरे होण्यासाठी जास्त वेळ घेतात. या आजाराने होणारे मृत्यूही जास्त असतात. कोणत्या आहेत या मेडिकल इमर्जन्सी…?
डायबेटिक किटोऍसिडोसिस : ‘टाइप १’ या मधुमेहात जेव्हा इन्सुलीनचे डोस चुकतात तेव्हा साखरेचा चयापचय बिघडून शरीरात किटोन्स तयार होतात आणि शरीरात पीएच ऍसिडिक होऊन तब्येत बिघडते, पोट दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, उलट्या होणे, गरगरणे आणि याकडे दुर्लक्ष झाल्यास शेवटी बेशुद्धी, कोमा आणि मृत्यूचा घाला असा हा प्रवास घडत असतो. इन्सुलीन, सलाइन, अँटिबायोटिक्स, व्हेंटिलेटर शरीराचा पीएच सुधारणारी औषधे असे कितीतरी उपाय करावे लागतात, तरीही या आजाराचा मृत्यूदर अंदाजे ५० टक्के आहे. तेव्हा मनानेच इन्सुलीन बंद करणार्‍यांना सावध राहावे. अशाच प्रकारचा ‘टाइप २’ मधुमेहातील ‘लॅक्टिक ऍसिडोसिस’ हा प्रकारही गंभीर आहे आणि रुग्णालयात भरती व्हावे लागते.
हायपोग्लायसेमिया : शरीरातील साखरेचे प्रमाण ७० एमजी टक्क्यांच्या आत जाऊ लागले, की भूक लागणे, कसेतरी होणे, घाम येणे, चक्कर येणे असे होऊ लागते. यावेळी पटकन दोन चमचे साखर खाऊन लगेच पोटभर जेवणे आणि पाणी पिणे आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष झाले, तर मात्र फार गंभीर हायपो होतो. आपल्या मेंदूला सतत साखरपुरवठा लागतो, पण साखर ५० एमजी टक्क्यांच्या खाली गेली, की हा पुरवठा कमी होऊन बेशुद्धी येणे, पॅरालिसिस होणे, फिट्‌स येणे आणि अती गंभीर परिस्थितीत कोमा तसेच मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे उपाय म्हणून साखर वेळेवर घेणे गरजेचे आहे. ‘हायपोग्लायसेमिया’ हा बहुतेक वेळा टाळता येणारा असतो. परंतु, लहरी वृत्तीने वागणारे रुग्ण जेवणाच्या वेळा न पाळणे, औषधे सांगितलेल्या वेळी न घेता भलत्याच वेळी घेणे, पथ्य पाळण्याचे टाळले की घरीच साखर तपासून स्वतःच इन्सुलीनचा डोस वाढवणे असे प्रकार करतात आणि या बेशिस्तीमुळेच बहुतेक सारे हायपो घडत असतात. उपाशीपोटी व्यायाम करणे, वाजवीपेक्षा जास्त व्यायाम करणे, यामुळेही हायपो उद्भवतो. याचमुळे पेशंटने डॉक्टरांकडून मिळालेल्या आहाराचा, व्यायामाचा आणि औषधाचा तक्ता काटेकोरपणे पाळून हायपो टाळावा.
हार्ट ऍटॅक/स्ट्रोक/पॅरालिसिस : अनेक दिवस अनियंत्रित असलेल्या मधुमेहामुळे रक्तवाहिन्यांचे आवरण कठीण होऊन रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात. यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो. हृदयाला रक्तपुरवठा न झाल्यास अचानक हार्ट ऍटॅक तसेच मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यास पॅरालिसिस, स्ट्रोक उद्भवतो. याचमुळे मोठी अवयवहानी होऊन रुग्ण दगावण्याचाही धोका असतो. पोटात गॅसेस वाढणे, उलटी होणे, घाम येऊन अस्वस्थ वाटणे अशा तक्रारींमुळे हा ऍटॅक आहे, हे लक्षातही येत नाही. म्हणून या वेदनाविरहीत हार्ट ऍटॅकमुळे रुग्ण रुग्णालयात भरती व्हायला वेळ लागतो. याचमुळे मृत्यूचे प्रमाणही वाढते. यामुळे डायबेटीसला ‘सायलेंट किलर’ म्हणतात.
संसर्ग : मधुमेहामध्ये विविध जंतूप्रादुर्भाव वरचेवर होतातच, पण त्याचे गांभीर्यही इतरांपेक्षा जास्त असते. म्हणूनच वेळेवर आणि योग्य उपचार केले गेले नाहीत, तर छोट्या-छोट्या जंतूप्रादुर्भावाचे गंभीर इन्फेक्शन होऊन रुग्णालयात भरती व्हावे लागते. न्यूमोनिया, ब्रॉंकायटीस, मेनिंजायटीस, युरिन इन्फेक्शन, किडनी इन्फेक्शन (पायलोनेफ्रायटीस), पित्ताशयाचे इन्फेक्शन (कोलेसिस्टायटीस), पायाचे इन्फेक्शन (सेल्युलायटीस), टीबी, नागिण (हरपीज) अशी अनेक गंभीर इन्फेक्शन मधुमेहात होतात. या सर्वांचे उपाय योग्य केले तर ते बरे होतात, पण यासाठी साखरेचे नियंत्रण काटेकोर असावे लागते. पहिल्यापासून शुगर नियंत्रणात असेल, तर इन्फेक्शनचे प्रमाण आणि गांभीर्य कमी राहते.
अंधत्व : आतापर्यंत चांगले दिसत होते आणि आता एका किंवा दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही, असे अचानक आलेले अंधत्व पाहून पायाखालची जमीन सरकते, पण हे अचानक आलेले नसते. मधुमेहामध्ये साखरेमुळे कठीण झालेल्या रक्तवाहिन्यांमुळे डोळ्याच्या पडद्याचा (रेटिनाचा) रक्तप्रवाह विस्कळीत होतो. रक्तप्रवाह सुधारण्याच्या प्रयत्नात रेटिनावर अधू केशवाहिन्यांचे जाळे उभे राहते आणि अचानक एक दिवस यातील अधू रक्तवाहिनी फुटून पडद्यावर मोठा रक्तस्राव होतो आणि अंधत्व येते. यावर लेसर, इंजेक्शन, औषधे देऊन उपाय करावे लागतात, पण तरीही नजर पूर्ण सुधारण्याची खात्री नसते. आधी नेत्रतज्ज्ञ आणि लेसर स्पेशालिस्ट (रेटिना स्पेशालिस्ट) लेसर उपचार करायला सांगतात, तेव्हा हा साधासोपा ओपीडीचा उपायसुद्धा रुग्ण टाळतात आणि मग अंधत्वाला तोंड द्यावे लागते. रेटिना स्पेशालिस्टना टाळून साधे उपाय केले, तर रेटिनोपॅथी सायलेंट असल्याने लक्षातही येत नाही आणि मग रडायची वेळ येते. त्याचमुळे ‘अ स्टीच इन टाइम सेव्हज् नाइन्’ हे तत्त्व प्रत्येकाने लक्षात ठेवावे. शेवटी डायबेटीसमध्ये इमर्जन्सी येऊ नये, म्हणून पहिल्या दिवसापासून स्वतःला आणि मधुमेहाला नीट वळण लावा.