पोलादपूर बस अपघातातील ३० मृतदेह काढण्यात यश

0
87

पोलादपूर ते महाबळेश्‍वरदरम्यान असलेल्या आंबेनळी घाटातील अपघातात सापडलेल्या बसमधील ३० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात मदतकार्य करणार्‍या पथकास यश आले आहे. दापोली कृषी विद्यापीठाचे ३३ कर्मचारी सदर दुर्दैवी बसमधून महाबळेश्‍वर येथे जाण्यास शनिवारी निघाले असताना हा अपघात झाला होता. गिर्यारोहक व एनडीआरएफ कर्मचार्‍यांचे बसमधील मृतदेह शोधण्याचे काम काल थांबवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, मृत व्यक्तींच्या निकटवर्तियांना प्रत्येकी ४ लाख रुपये मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. भविष्यात असे अपघात न होण्यासाठी अभ्यास समिती नेमण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्राचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने पोलिसांबरोबरच १५० गिर्यारोहकांच्या पथकाची मदत या कामी घेतली. त्यांनी दरीत उतरून मृतदेह मोठ्या प्रयत्नांनी वर आणले. एनडीआरएफचे पथक बरेच उशिरा आल्याबद्दल नागरिकांत नाराजी व्यक्त होत होती.