पाल्याच्या विकासाआड येऊ नये!

0
131

– आरती सुखटणकर (निवृत्त मुख्याध्यापिका)

‘भौतिक शास्त्राच्या’ नियमानुसार- कोणतीही वस्तू उचलण्यापेक्षा ढकलणे सोपे असते… उदा. जबाबदारी!! आज अशाच चालढकलापायी अनेक मुले भावनिक, मानसिक व हो, शारीरिक भुकेनेसुद्धा तळमळत आहेत. याचा आपण विचार करायला नको का?

….. मुलांना ‘करू नको’ म्हणून आज्ञा केली की तेच नेमके करावे ही त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती असते पण एखाद्या गोष्टीमुळे आपले नुकसान कसे होत आहे हे पटवून दिले की ते ती गोष्ट टाळण्याचा पक्का निश्‍चय करतात. म्हणूनच शिक्षकांनी व पालकांनी स्वतःच हे समजणे अत्यावश्यक आहे.
दूरदर्शन, संगणक नि मोबाइल या तीन वैज्ञानिक आविष्कारांमुळे विश्‍व अगदी माणसाच्या मुठीत आलंय परंतू त्यांच्या गैरवापरामुळे माणूसच त्यांच्या आहारी जाऊ लागलाय- ‘असलं तर सूत नाहीतर भूत!’ या तिघांचेही स्वभाव जवळजवळ सारखेच आहेत. माणसानेच निर्माण केलेल्या या भूतांना सूत बनवायचे की त्यांच्या आहारी जाऊन स्वतःच त्यांचे गुलाम बनायचे हे माणसानेच ठरवले पाहिजे. आपल्यासारखी निमवयस्कर माणसेच जर त्यांचे गुलाम बनू लागलोय तर नव्या पिढीचे काय? ‘आत जाऊन अभ्यास कर’, असे मुलाला सांगताना पालक मात्र या ‘तिघा मित्रां’बरोबर वेळ घालवत असतो मग मुलाचे लक्ष पुस्तकात कसे लागणार? पुस्तकातली माहिती व चित्रे स्थिर असतात तर हे तिन्ही चोर चलत दृश्ये दाखवून मुलांचे चित्त (मुलांचेच काय…मोठ्यांचे सुद्धा) विचलीत करीत असतात. त्यांच्यावर अंकूश ठेवला तर त्यांच्याकडून कल्पनेपलीकडे काम करून घेता येते. म्हणतात ना- ‘ऐरावत रत्न थोर, तया अंकुशाचा मार’!!
परीक्षांच्या निकालाबरोबरच प्रत्येक शिक्षक आपल्या विषयांचाही निकाल लावत असे- त्यामुळे त्या त्या विषयात प्रत्येक मुलाच्या प्रगतीचा आलेख मिळत असे. चाळीस टक्क्यांहून कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुटल्यावर ‘विशेष वर्ग’ घेतला जाई व त्यात विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवल्या जात. विद्यार्थ्यांना न कळलेला घटक शिक्षक पुन्हा पुन्हा शिकवून त्याच घटकावर पुन्हा एक घटक चाचणी घेतली जाई. नववीच्या ‘ब’ वर्गातली ‘निला’ हुशार मुलगी होती. तिला खरं म्हणजे या ‘विशेष वर्गाची’ आवश्यकताच नव्हती. पण एकदा ती माझ्याकडे आली व या विशेष वर्गात हजर राहण्याची परवानगी मागू लागली. मी म्हटले, ‘‘निला, तुला छान गुण मिळालेत. मग तुला या वर्गाला यायची गरजच काय?’’ त्यावर तिने मला सांगितले, ‘‘टिचर, दुपारी घरी मी एकटीच असते. आई-बाबा दोघंही कामावर जातात व संध्याकाळी घरी येतात. अविदादा (तिचा मोठा भाऊ) पण कॉलेजला जातो. तोही खूप उशिरा घरी येतो. मला घरी एकटंच राहायचा कंटाळा येतो, भीती पण वाटते. अभ्यास तरी किती करणार ना? खेळायला पण आमच्या घराजवळ कोणीच नाही. मी येऊ का ‘विशेष वर्गाला’? मी अजिबात टिचरना त्रास देणार नाही.’’- तिचे गार्‍हाणे चूक नव्हतेच. मी तिला परवानगी तर दिलीच, त्याशिवाय तिच्या मदतीने इतर मुलेही छान अभ्यास करू लागली. खूप वेळा असे दिसून येते की शिक्षकांपेक्षा आपल्या सहयोगी विद्यार्थ्यांकडून समजावून घेणे मुले पसंत करतात. शिक्षकांनी अशा हुशार मुलांचा छान सहयोग घ्यावा. पालकांनीही हा विचार करावा की आपण घरी नसताना आपली मुले वेळ कसा घालवत असतील? हीच वेळ असते मुलांवर संस्कार घडण्याची. कामानिमित्त मोठी माणसे घराबाहेर, घरात सोबतीला कोणी नाही. अशावेळी मुलांनी काय करावे? पुष्कळदा मुले गैरमार्गाला लागतात- दूरदर्शन, संगणक, दूरध्वनी यांच्यातर आहारी जातातच पण त्याचबरोबर गैरसंगत, गैरसवय यांच्या आहारी जाऊन गैरव्यवहारही करू लागतात. पालकांना काही कळायच्या आतच त्यांची गाडी उताराला लागलेली असते… मग ‘मुले’ आमचे ऐकत नाहीत. तुमचे ऐकतील. तुम्ही त्यांना समजवा’ अशा तक्रारी घेऊन पालक शिक्षकांकडे येतात! शिक्षकांचे म्हणणे असते – ‘मूल आमच्याकडे दिवसातील ५/६ तासच असते. बाकीचा वेळ पालकच त्याच्याबरोबर असतात नि जन्म दिलेल्या पालकांचे ऐकत नाहीत ती मुले शिक्षकांचे काय ऐकतील?’ – अशा तर्‍हेने शिक्षक व पालक दोघेही आपापली जबाबदारी एकमेकांवर ढकलून मोकळे होतात – यात मुलांचा काय अपराध? – मागे एक विनोद वाचला होता – ‘भौतिक शास्त्राच्या’ नियमानुसार- कोणतीही वस्तू उचलण्यापेक्षा ढकलणे सोपे असते…. उदा. जबाबदारी!! आज अशाच चालढकलापायी अनेक मुले भावनिक, मानसिक व हो, शारीरिक भुकेनेसुद्धा तळमळत आहेत. याचा आपण विचार करायला नको का?
आज आपल्या गरजा वाढल्या आहेत व त्या वाढतच राहणार आहेत. ‘सिंपल लिव्हींग व हाय थिंकिंग’ हा वाक्‌प्रचार खूपच जुना झाला आहे- आता ‘हाय लिव्हींग व लो थिंकिंग’ असेच सर्वत्र अनुभवास येत आहे. मुलाला जन्म दिल्यानंतर स्त्री फारतर सहा महिने किंवा वर्षभर बाळाच्या संगोपनासाठी घरी राहते – नंतर मात्र ‘नोकरी करणे किती आवश्यक आहे’ हे आवश्यक नसले तरी तसे ठरवते. तिचा स्वाभिमान, हक्क, शिक्षण नि महत्त्वाकांक्षा बालसंगोपनापेक्षा सरस ठरतात व मुलाला एखाद्या ‘बाईच्या/दाईच्या’ हाती किंवा पाळणाघरात सोपवून ती घराबाहेर पडते. – पालकांना पर्याय पाळणाघर व निर्जीव खेळ असेच समीकरण आजच्या समाजात दिसून येते. मुलाबरोबर ‘किती’ वेळ घालवला यापेक्षा वेळ ‘कसा’ घालवला हे मुलाच्या वाढीबरोबरच विकासासाठी आवश्यक असते. मुलाची वाढ ही नैसर्गिकच असते पण ‘विकास’ हा संस्कारांवर अवलंबून असतो. हे संस्कार घरी पालकांनी व शाळेत शिक्षकांनी निःस्वार्थपणे घडवायचे असतात. पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची बैठक होती त्यात एका पालकाने अभिमानाने मला सांगितले, ‘‘मी रोज माझ्या मुलाला शाळेत ‘ड्रॉप’ करतो स्कूटरवरून!’’… किती हा सहवास मुलाला आपल्या वडिलांचा!!! मुलाकडे पाहातही नाही कारण मुलगा ‘पाठीशी’ असतो नि संवाद होतो फक्त रस्त्यावर स्कूटर थांबते तेव्हाच!! याला ‘सोबत घालवलेला वेळ’ म्हणायचे का? तुम्हीच ठरवा….
काही पालक असेही असतात – शहरातील प्रथितयश डॉक्टरचा एकुलता एक मुलगा ‘बबलू’ – तो पाचवी ते दहावी आमच्या शाळेतच होता. शाळेपासून हाकेच्या अंतरावर घर परंतु त्याची आई त्याला रोज शाळेत सोडायला येई. त्याचे दप्तर तिच्या खांद्यावर असे. शाळा सुरू होण्यापूर्वी ती वर्गात त्याच्या बाकापर्यंत त्याला पोचवून दप्तर तिथे नीट ठेवत असे. प्रार्थनेची घंटा झाली की ती वर्गाबाहेर उभी राहून त्याच्याकडे पाहात राही- वर्गातली शिक्षिका दरवाजा लावेपर्यंत! सर्व शिक्षकांनी व शिपायानेही तिला खूपदा सांगून पाहिले. ही गोष्ट माझ्याही कानावर आली होती म्हणून मी तिला भेटायला बोलावले. ती आली नाही म्हणून मीच त्यांच्या घरी गेले. मला पाहताच प्रथम तिने चक्क दारच लावून घेतले! मी दवाखान्यात बबलूच्या बाबांना भेटायला गेले – तेही बायकोच्या स्वभावाने हतबल झाले होते. त्यांच्याकडून कळले ते असे — खूप नवससायास केल्यावर जवळजवळ लग्नानंतर नऊ वर्षांनी बबलूचा जन्म झाला. कुण्या ज्योतिष्याने ‘याला खूप जपले पाहिजे’ असे सांगितले. तेव्हापासून बबलूला नजरेआड न होऊ देण्याचे जणू त्या माऊलीने व्रतच घेतले होते!
माझ्यापुढे हे एक आव्हान होते…. नियमाप्रमाणे मी पालकांना दाराबाहेर उभे ठेवू शकत नव्हते. पी.टी.च्या तासाला ग्राउंडवर पाठवू शकत नव्हते. वर्गातली मुले हळुहळू बबलूची टिंगल करु लागली तेव्हा बबलूच जरा शहाणा झाला. त्याने आईला शाळेत येण्यास मज्जाव केला. मग ती शाळेच्या मुख्य गेटसमोर थांबू लागली. मग मी निरोप पाठवला. ‘शाळेच्या लायब्ररीत येऊन बसा’. ..हा निरोप तिला रुचला अन् बबलूची आई लायब्ररीत येऊन बसू लागली. मग मी हळूहळू तिच्याशी मैत्री केली, तिच्याशी बोलू लागले, आमच्यात संवाद सुरू झाला. विविध विषयांवर बोलता बोलता त्या माऊलीच्या मनातली अंधश्रद्धा व भीती दूर करण्यात मला यश मिळाले. बबलू अभ्यासात बरा होता त्यामुळे वरच्या वरच्या वर्गात चढत दहावीत पोचला. मग मात्र मी घावच घातला… म्हटले, ‘‘तुमच्या मुलाला आता तुम्ही थोडे स्वातंत्र्य द्यायला हवे. उद्या तो कॉलेजला जाईल, नोकरी करू लागेल, त्याचे लग्न होईल आणि तरीही जर तुम्ही असेच त्याच्या आजुबाजूला रहाल तर त्यालाच ते आवडणार नाही. सर्वांसमोर त्याने तुमचा अपमान केला, तो घर सोडून गेला तर तुम्हाला चालेल का?’’- माहीत नाही. पण त्यानंतर मात्र बबलूच्या आईचे शाळेत येणे मंदावले. बबलू दहावी झाला, कॉलेजला गेला, एम.बी.ए. झाला नि आता सिंगापूर येथे नोकरीही करत आहे…! या प्रसंगातून एक निष्कर्ष काढला – मुलाच्या विकासाआड आईवडिलांनी येऊ नये. पाल्याबद्दल वाटणारे प्रेम-ओढ ही भावना एका बाजूला व त्याच्याप्रतीचे कर्तव्य दुसर्‍या बाजूला. पाखरं नाही का पिलांना वाढवत! चिमुकली असतात तेव्हा चोचीतून दाणा-पाणी भरवतातच की पण मोठी झाली की स्वतःचे खाद्य हुडकायला, गगन भरारी घ्यायलाही शिकवतातच अन् त्यांनी ‘आपले घरटे’ बांधावे म्हणून स्वतःच्या घरट्यातून हुसकूनही लावतात त्याला. हाच तर निसर्गक्रम आहे- माणूस मात्र मृत्यूनंतरही आपणच निर्माण केलेल्या इच्छा-वासनांच्या जाळ्यात स्वतः गुंतून पडतो, मुक्तीसाठी धडपडतो….
– ‘‘पुनरपि मरणं, पुनरपि जननं; पुनरपि जननि जठरे शयनं|’’
… श्रीमद् शंकराचार्यांची वाणी मनुजीवनाचे कटू सत्य विशद करते.
क्रमशः
………………………