पत्नीचा जंगलात नेऊन निर्घृण खून

0
194

माटणे (महाराष्ट्र) येथील रमाकांत गावस याने आपली पत्नी रेश्मा गावस (४०) हिचा न्हावेली, कुडणे येथील जंगलात नेऊन गळा आवळून खून करण्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी संशयित रमाकांत याने खुनाची कबुली दिली असून पोलिसांनी कुडणे येथे खून केलेल्या जागी जाऊन कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतला आहे. मयत रेश्मा मूळ नानेली, सत्तरी येथील असून पती-पत्नीत वारंवार भांडण होत असे. नवर्‍याच्या जाचाला कंटाळून ती २५ जुलैपासून आपल्या सूर्यकांत, सुरेश व सुहास या तीन मुलांना घेऊन नानेली येथील माहेरी राहायला आली होती. मात्र, ७ ऑक्टोबरपासून ती अचानक बेपत्ता झाली होती. त्यानंतर रेश्माच्या आईने आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार ९ रोजी वाळपई पोलीस स्थानकात नोंदविली होती. १० ऑक्टोबर रोजी जावई रमाकांत याने आपल्या मुलीचे अपहरण केल्याचे मयताच्या आईने पोलीस तक्रारीत म्हटले होते. त्यानुसार वाळपई पोलिसांनी संशयित रमाकांत याला ताब्यात घेतले होते. शेवटी काल संशयिताने आपल्या पत्नीचा खून केल्याची कबुली देताना न्हावेली, कुडणे येथे तिला बोलावून घेऊन खून केल्याचे पोलिसांना सांगितले. रेश्मा व रमाकांत या दोघांना साखळी बसस्टँडवर पाहिल्याचे लोकांनी सांगितले होते. वाळपई पोलिसांना तपासकाम करताना न्हावेली येथे मोबाइलचे शेवटचे लोकोशन सापडले होते. मात्र, नंतर मोबाइल बंद झाल्याचे आढळून आले होते. या माहितीच्या आधारे वाळपई पोलिसांचा संशय बळावला व खुनाचा उलगडा होण्यास पोलिसांना मदत झाली.