पंतप्रधान मोदी फर्डे वक्ते; पण भाषणांनी पोटे भरत नाहीत

0
77

>> सोनिया गांधींचे नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्री मोदी हे उत्कृष्ट वक्ते आहेत. एखाद्या अभिनेत्याप्रमाणे ते बोलतात. मात्र त्यांच्या अशा भाषणांनी भुकेलेल्यांची पोटे भरू शकत नाहीत. त्यासाठी रोजगार आणि अन्नाची गरज असते अशा प्रतिक्रियेद्वारे कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी काल येथे पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली.

कर्नाटक विधानसभेसाठीच्या निवडणूक प्रचारसभेत श्रीमती गांधी बोलत होत्या. आपल्या भाषणात मोदी यांना लक्ष्य करताना सोनिया म्हणाल्या की मोदींना सध्या कॉंग्रेसमुक्त भारताच्या भूताने पछाडले आहे. कॉंग्रेसमुक्त भारत तर सोडाच आपल्यासमोर अन्य कोणी उभे राहिलेलेही त्यांना चालत नाही. मोदी जेथे जातील तेथे ते खोट्या गोष्टी सांगतात. आपल्या राजकीय लाभासाठीच देशातील महान नेत्यांची नावे घेतात असा दावा त्यांनी केला.

अनेक राज्ये जेव्हा दुष्काळाने त्रस्त झाली होती त्यावेळी त्यांना केंद्र सरकारकडून मदतीची गरज होती. कर्नाटकातील शेतकरीही दुष्काळग्रस्त बनले होते. त्यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामैय्या यांना मोदींची भेट हवी होती. परंतु मोदींनी भेट घेऊ दिली नाही. मोदी यांची ती कृती म्हणजे कर्नाटकातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांचा अपमान होता असेही सोनिया म्हणाल्या त्यामुळे कर्नाटकातील कॉंग्रेस सरकारने शेतकर्‍यांसाठी काही केले नाही म्हणणे म्हणजे शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. हाच तुमचा ‘सबका साथ सबका विकास’ आहे काय असा सवाल त्यांनी केला.