पंचकर्म परिचय भाग – २

0
929
  •  वैदू भरत म. नाईक
    कोलगाव

शारीरिक सौंदर्य विशेषतः त्वचा, केस, डोळे यांचे सौंदर्यवृद्धीसाठी, तारुण्य राखण्यासाठी व वजन मर्यादेत ठेवण्यासाठी जे पंचकर्म उपचार केले जातात त्यांना सौंदर्यवर्धक पंचकर्म उपचार म्हणतात. संपूर्ण आरोग्याशिवाय सौंदर्य हे व्यर्थ व अशक्य आहे.

मागील अंकावरून….
बहुदोष अवस्थेमध्ये पंचकर्म चिकित्सेचे महत्त्व आहे. मध्यदोष अवस्था असेल तर व्यायाम, दीपन, पाचन ही चिकित्सा करावी. हीनदोष अवस्थेमध्ये केवळ लंघन चिकित्सेनेच दोषांना जिंकता येते. परंतु या लंघनामध्ये वमनादि चार प्रकारची शोधने, तृष्णा, वायू, आतप, पाचन, उपवास व व्यायाम या क्रिया अतर्ंभूत आहे. म्हणजेच हीनदोष अवस्थेमध्ये पुन्हा पंचकर्माचे महत्त्व आहेच.
शरीरामध्ये रोगोत्पत्ती होण्यासाठी दोष, धातु, मला, विष (विजातीय द्रव्य) कारणीभूत असतात, चिकित्सकाने सर्वप्रथम या विष किंवा विजातीय द्रव्यांचे निर्हरण केले पाहिजे. यालाच शोधन किंवा पंचकर्म उपचार म्हणतात. जी व्यक्ती काम, क्रोध, भय, शोक, लोभ आदी मानस दोषाचा त्याग करून एकाग्र मनानेशोधन कर्म करवून घेते त्याच व्यक्तिला शोधन कर्मांचा समुचित लाभ मिळतो. यासाठी रुग्णांने उपरोक्त मनोविकारांचा पूर्णत्याग करून मोठ्या श्रद्धेेने चिकित्सकाचे सर्व निर्देश एकाग्रतेने पाळावेत.

पंचकर्म उपचारांचे फायदे –
पंचकर्म उपचार केल्यामुळे पुढील फायदे झालेले दिसतात.
ज्या रोगांसाठी आपण पंचकर्म उपचार केलेले आहेत. ते रोग नष्ट होतात. केवळ शमन औषधोपचार जर केले असतील तर तात्पुरत्या काळापुरती रोगाची लक्षणे कमी झाल्यासारखी वाटतात पण पंचकर्म उपचार केल्यानंतर मात्र पुन्हा पुन्हा ते व्याधी उद्भवत नाहीत. याशिवाय इतर काही फायदे या उपचारामुळे होतात. ते खालीलप्रमाणे –
१) शरीरामध्ये अग्नि प्रदीप्त होतो.
२) शरीराला व मनाला स्वस्थता मिळते.
३) इंद्रिये प्रसन्न होतात.
४) कार्यशक्ती अर्थात स्टॅमिना वाढतो.
५) शरीर पुष्ट भरदार होते.
६) मन व बुद्धी आपल्या कार्यांमध्ये उत्कर्ष करतात.
७) शरीराचा वर्ण, कांती यामध्ये सुधारणा होते. त्यामुळे त्वचा तजेलदार दिसते.
८) ज्या व्यक्तींना संतती नसते त्यांना संततीचा लाभ होतो.
९) वृद्धावस्था लवकर येत नाही.
१०) निरोगी दीर्घायुष्य मिळते.
११) जुनाट रोग व व्याधी कायमचे नष्ट होतात.
१२) पंचकर्म उपचार तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली घेतल्यास कोणतेही दुष्परिणाम होत नाही.

अनेक प्रयोग व संशोधनाअंती असे आढळून आले आहे की पंचकर्म चिकित्सेमुळे केवळ रोगांचाच नाश होत नाही तर शरीरातील संपूर्ण शुद्धी होते.
पंचकर्म चिकित्सेचे विविध हेतुंनुसार वर्गीकरण –
हिनगुणयुक्त आहार, विविध मानसिक तणाव, व्यायामाचा अभाव, प्रदूषण, घातक रसायनांशी जवळीक, घातक, औषधे इ. अनेक कारणांमुळे मानवाची रोगप्रतिकारकशक्ती धोक्यात आली आहे. त्यामुळे विविध रोग जडतात आणि त्यामुळे हळू हळू मानवाचे आयुष्य कमी होऊ लागते. पंचकर्म केल्याने शरीरातील ही रोगकारक तत्वे बाहेर निघून जातात. शरीरातील पेशीन् पेशी विष व विकाररहित होते. शरीरातील सर्व घटकांमध्ये चैतन्य निर्माण होते. त्यामुळे त्या व्यक्तीचे आयुष्य वाढते व वृद्धावस्था उशिराने येते.

पंचकर्म उपचारांनंतर शरीरातील सर्व घटक स्वच्छ, शुद्ध, निर्मळ, ताजेतवाने झाल्यामुळे आपण नंतर जे औषधी उपचार करू त्यांना शरीरातील चांगला प्रतिसाद मिळतो.
अशा रीतीने पंचकर्म चिकित्सा ही आयुर्वेदातील एक बहुआयामी चिकित्सा आहे.
दोष ज्यावेळी कोष्ठातून शाखेमध्ये (रस, रक्त, मांस इ.) जातात त्यावेळी रोगांची उत्पत्ती होते. हा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे. उष्ण, तीक्ष्ण पदार्थांचे सेवन तसेच अहितकर विहार याने वायुच्या गतीमुळे दोष कोष्ठातून रस, रक्तादि धातुंमध्ये जातात. तिथे अनुकूल परिस्थिती मिळाली की तेच दोष प्रकुपित होऊन रोग उत्पन्न करतात. हे दोष शाखेतून कोष्ठात आणणे व नजिकच्या मार्गाने शरीराबाहेर काढणे हीच पंचकर्म चिकित्सा होय.

दोष कोष्ठात आणावयाचे उपाय १) दोषांची वृद्धि करून २) दोष विलयन करून ३) दोषपाक करून ४) स्त्रोतस मुख उघडे करून ५) वायुचे नियंत्रण करून.
हे पाचही उपाय केवळ पंचकर्माच्या पूर्वकर्माने साध्य केले जातात. म्हणूनच काही वेळ केवळ पूर्वकर्मानंतर रूग्णाला अपयश मिळतो. प्रथम ‘स्नेहन’ केले जाते. त्याने विष्यंदन होऊन दोष मृदू होतात. क्लेद वाढून द्रवता वाढते व दोष सरकण्यास मदत होते. त्यानंतर स्वेदन केल्याने दोषाचा नाश उष्णगुणांमुळे होतो व धातुंमध्ये चिकटलेले दोष मोकळे होऊन स्वस्थान सोडतात. स्वेदनामुळे स्त्रोतसांची मुखे उघडली जातात. स्नेहन स्वेदनाने वायुचेही नियंत्रण होते व दोष शाखेतून कोष्ठात आणले जातात.
तद्नंतर आवश्यकतेनुसार वमन किंवा विरेचन करून दोषांचे निर्हरण केले जाते.
पंचकर्म दोष संबध- १) वमन- कफदोषासाठी २) विरेचन-पित्तदोषासाठी ३) बस्ति- वातदोषासाठी ४) रक्तमोक्षण- हे रक्ताच्या दुष्टीसाठी व त्याच्या आश्रयाने राहणार्‍या पित्तदोषाची चिकित्सा आहे. ५) ‘नस्य’ ही नासा, ऊर्ध्वजत्रू शिरः भागातील दुषित दोषांसाठी चिकित्सा आहे.

स्वास्थ्यवर्धक पंचकर्म
मानसिक तणाव, शारीरिक व मानसिक श्रम, दुषित व असंतुलित आहार विहार, प्रज्ञापराध, असात्मेंदियार्थ संयोग इ. हेर्तूचे सेवन घडतच प्रत्यक्ष व्याधी जरी उत्पन्न झाला नाही तरी वृद्धावस्था लौकर येऊ शकते. यासाठी स्वस्थ मनुषाचे पंचकर्म उपचार केले पाहिजेत. त्यांना स्वास्थ्यवर्धक पंचकर्म उपचार असे म्हणतात.
अ) दिनचर्येमध्ये पंचकर्म – अभ्यंग, उद्वर्तन, शिरोभ्यंग, नस्य, पादाभ्यंग, कर्णपुरण, नासापुरण, शिरोपिचू ही कर्मे स्वस्थ व्यक्ती घरच्या घरी स्वत:चे स्वत: करू शकते.
आ) ऋतुनुसार पंचकर्म
हेमंत ऋतु १) अभ्यंग २) मूधतैल (शिरोभागी तेल धारण करणे) ३) उष्णसदन (उबदार घरात बसून स्वेद) ४) आतपसेन (सूर्याचे उन अंगावर येणे) सूर्यस्नान याला निसर्गोपचारामध्ये खूपच महत्त्व आहे. शीत प्रदेशातील लोकांना खूपच आवड असते. ५) उत्सादन ६) स्वेदन
वसंत ऋतू – कफसंचय व प्रकोपाचा काळ, आग्नमांद्यामुळे व्याधींची उत्पत्ती होते. ९) वमन २) विरेचन ३) आस्थापन अनुवासन बस्ति (वात पित्तप्रकोप असल्यास) ४) नस्य (कफासाठी) अर्थात् ही कर्मे पाचन, स्नेहन, स्वेदनपूर्वक घ्यावीत.
शरद ऋतू – पित्तप्रकोपाचा काळ २) तिक्तघृत पान (कडू औषधांनी सिद्ध तूप २) रक्तमोक्षक
शिशिर ऋतू – अभ्यंग २) स्वेदन ३) विरेचन ४) घृतपान
वर्षा ऋतू – वातदोशाचा प्रकोप काळ १) बस्ती २) क्रमाने वमन विरेचन (अग्नीमांद्य असल्यामुळे) ३) अंगमर्दन
ग्रीष्म ऋतू – सूर्याच्या अतीव उष्णतेमुळे शरीरातील द्रव्य धातूची अल्पता रूक्षत्व उत्पन्न होते व वायूचा संचय होऊ लागतो. अभ्यंतर स्नेहपान (तूप सेवन करणे)
जेव्हा दोषांच्या संचय काळातच त्यांचे निर्हरण केले जाते. तेव्हा त्या त्या दोषांच्या प्रकोपादि पुढील अवस्था आपोआपच थांबतात. व रोगोपत्ती होत नाही.
म्हणूनच ग्रीष्म ऋतूत संचित वाताचे श्रावण महिन्यात, वर्षाऋतूतील संचित पित्ताचे कार्तिक महिन्यात व हेमंतातील संचित कफांचे चैत्रात शोधन करावे.
व्याधींनुसार पंचकर्म – (रोगनिवारक पंचकर्म)
विविध व्याधींमध्ये त्रिदोष हे वृद्धी किंवा क्षय होऊन निरनिराळ्या पद्धतीने विकृत झालेले असतात. त्यामुळे प्रत्येक व्याधीच्या दोषांची अवस्था बघून त्यानुसार पंचकर्म केले तर व्याधी मुळापासून नष्ट होते. आयुर्वेदातील सर्व चिकित्सा ही दोषांना सामावस्थेत आणण्यासाठीच केली जाते.
विशिष्ट व्याधींसाठी पंचकर्माच्या काही विशिष्ट क्रिया, विशिष्ट क्रमाने, विशिष्ट द्रव्ये वापरून केल्या जातात. त्यांना रोगनिवारक पंचकर्म असे म्हटले जाते.
सौंदर्यवर्धक पंचकर्म –
शारीरिक सौंदर्य विशेषतः त्वचा, केस, डोळे यांचे सौंदर्यवृद्धीसाठी, तारुण्य राखण्यासाठी व वजन मर्यादेत ठेवण्यासाठी जे पंचकर्म उपचार केले जातात त्यांना सौंदर्यवर्धक पंचकर्म उपचार म्हणतात. संपूर्ण आरोग्याशिवाय सौंदर्य हे व्यर्थ व अशक्य आहे. या सिद्धांतानुसार सौंदर्यवर्धक उपचार केले जातात. शरीरशुद्धीकर शोधनकर्मे, लेप, अभ्यंग, शिरोधारा, सिंचन, अवगाह आदी उपचारांचा समावेश यामध्ये होतो. आधुनिक काळात या प्रकारच्या पंचकर्म उपचारांना फार मोठी मागणी आहे. वैद्यांनी अभ्यास आत्मविश्‍वास, निर्धार व योग्य प्रयत्न त्यांचे योगाने या संधीचे सोने केले पाहिजे. ठिकठिकाणी निर्माण झालेली कशरश्रींह ठशीेीींी, कशरश्रींह डरि हे याच गोष्टीची निदर्शक आहेत. कारण शारीरिक कांती वाढविण्यासाठी पंचकर्माइतके दुसरे उपयुक्त कोणतेही उपचार नाहीत.