ना प्रेम, ना जिव्हाळा…

0
179
  • प्रज्वलिता प्र. गाडगीळ

 

तेव्हा प्रत्येकामध्ये फार आपुलकी होती, म्हणून हे असं चालायचं. पण आता तसं नाही. मी.. आणि माझा राजा.. मुलांसाठी डे-केअर आहेच. सकाळी सगळी एकदम बाहेर पडतात. रात्री सगळीच एकदम घरात. ना शेजार ना पाजार. ना प्रेम ना आपुलकी.

 

माझी मैत्रीण एकदा आपल्या आईवर रागावली. त्तिने आपल्या आईशी गट्टीफू केली अन् ती माझ्याकडे आली. मला म्हणाली, जेवायला काय केलंस सांग आणि मी आता तुझ्याकडेच राहीन म्हणतेय. मी माझ्या आईशी कधीही बोलणार नाही… असं सांगता सांगताच गेली परत आपल्या घरी आणि एक भरलेली बॅग रिकामी केली व आपले सर्व कपडे त्यात भरले आणि आली माझ्याकडे. ‘खरोखरच मी तुझ्याकडे कायमचीच राहणार’. ‘बरं, जेवण तर करून घे. सावकाश जेव आणि मग काय झालंय ते सांग.’ मग जेवण झाल्यावर गप्पा, खेळ सर्व व्यवस्थित झालं. रात्र होताच तिला आईची खूप आठवण आली. गेली, उठली, धावत घरी गेली आणि आपल्या आईच्या कुशीत झोपली. पण आईने जरा दुर्लक्षच केलं. थोड्या वेळाने ती जरा दूर जाऊन डोक्यावर पांघरुण घेऊन गप्प झोपली. मग पाहते तर काय? बाईसाहेब गाढ झोपली होती. आईला मात्र पूर्ण खात्री होती की रात्र झाल्यावर येईल आपोआप. दिवसभर रागाने आईपासून दूर झालेली मैत्रीण, पण रात्र होताच आली जागेवर कारण तिला आईशिवाय करमतच नसे.

पण… तिचा भाऊ मात्र वेगळाच होता. तो दिवसा आणि रात्री आमच्याकडेच राहायचा. कारण आमच्या घरातील सर्वांना फार आवडायचा. गोंडस, गोरापान, बोबडे बोल बोलत सर्वांच्या मागून दुडुदुडु धावत असे. आमच्या घरात एवढं लहान कोणीच नव्हतं. म्हणून त्याचं येणं, राहणं, खाणं, पिणं, झोपणं सर्व आमच्यातच असे. आमच्या परिवारातीलच एक झाला होता. आम्ही बाहेर निघालो तर तोही येत असे, दहा- दहा दिवस तो आमच्या नातलगांकडेही राहायला येत असे. जरा मध्यरात्री कुरबूर करायचा. पण थोपटल्यावर गप्प झोपायचा. पाहुण्यांकडे तो वेगळं वागायचा. आपल्या घरच्यांसारखा पुढे पुढे तो कधीच करीत नसे. काय हवं ते हळूच माझ्या कानात सांगायचा. हे दृश्य पाहताच सर्वजण हसत असत. तिकडच्यांनाही त्याने आपलेसे केले होते. छोटा असला तरी आपलं- परकं चांगलं समजत असे. एकदा तर या बालकाने आमचे सर्वांचे कपडे बॅगेत भरले, आमच्या सर्व वस्तू बॅगेजवळ आणून ठेवल्या आणि म्हणाला, ‘जाऊ या आमच्या घरी’. ‘का रे बाळा? कशाला एवढी घाई?’ तो आपल्या भाषेत सांगत होता, पण आम्हाला त्याचं बोबडं बोलणं समजत नसे. मग आम्हीच विचार केला की याला घरची आठवण येत असेल. मग तो रडण्याआधीच गेलेलं बरं. म्हणून आम्ही आमच्या गावी आलो. गाडीत बसल्यावर पोपट बोलू लागला, म्हणजे हा खुश झाला. घरी पोचताच आमच्याकडे नं येताच आईला बिलगला.

खरंच… आम्ही तर्क केला तो बरोबर होता. मग मात्र दोन दिवस फिरकलासुद्धा नाही. आम्ही कितीही बरं केलं तरी आई ती आई हो! हा निसर्गनियमच आहे. चार दिवसांनंतर पुन्हा त्याचा दिनक्रम सुरू. आईने खाऊ वाटीतून दिला की वाटी घेऊनच दुडदुडा उघडा तर उघडाच पळत यायचा आणि मला भरवायचा. खूप बरं वाटायचं. गोंडस हात-पाय, सुंदर… आम्हाला हे खरंखुरं खेळणंच वाटायचं. घरी जाताना आपली वाटी घरभर शोधायचा. आपली वस्तू न चुकता न्यायचा. हळुहळू स्टूल घेऊन वर चढायचा, दंगामस्तीने घर आनंदाने न्हाऊन निघायचं. पण त्याची ताई मात्र आईवेडी! फक्त आईच लागायची. आज बारा वर्षांची झाली, तरी आई लागतेच. राग आला तरच ती इकडे फिरकत असे. या मुलांच्या येण्याने आमच्या घराचं नंदनवन झालं.

तेव्हा प्रत्येकामध्ये फार आपुलकी होती, म्हणून हे असं चालायचं. पण आता तसं नाही. मी.. आणि माझा राजा.. मुलांसाठी डे-केअर आहेच. सकाळी सगळी एकदम बाहेर पडतात. रात्री सगळीच एकदम घरात. ना शेजार ना पाजार. ना प्रेम ना आपुलकी. फक्त व्यवहार, व्यवहार आणि व्यवहार!!