नारायण राणेंच्या राजकीय चढउतारांची कहाणी

0
376

एडिटर्स चॉइस
– परेश प्रभू

 

नारायण राणे… महाराष्ट्राच्या – विशेषतः दक्षिण कोकणच्या राजकारणातील एक वादळी नाव. त्यांचा ‘नार्‍या’पासून ‘नारायणरावां’पर्यंतचा राजकीय प्रवास शब्दांकित करणारे ‘No Holds Barred’ हे आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होणार आहे. याला आत्मचरित्र जरी म्हटले गेले, तरी हे काही परिपूर्ण आत्मचरित्र नाही. हे केवळ राणे यांचे राजकीय आत्मकथन आहे. तेही त्यांच्या नजरेतून मांडलेले अनुभव आहेत, त्यामुळे बरेचसे एकांगीही आहे, परंतु तरीही आजच्या राजकारणाचे ताणेबाणे समजून घेण्यासाठी वाचण्याजोगेही आहे.

शिवसेनेपासून सुरू झालेला राणेंचा राजकीय प्रवास व्हाया कॉंग्रेस आणि भाजप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षापर्यंत कसा येऊन स्थिरावला, याची ही बरीचशी प्रांजळ कहाणी आहे. प्रियम गांधी मोदी यांनी ती मूळ इंग्रजीतून शब्दांकित केली आहे आणि हार्पर कॉलिन्स ही प्रख्यात प्रकाशनसंस्था तिचे प्रकाशक आहेत. केंद्र आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील कालचे आणि आजचे प्रमुख मोहरे बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, मनोहर जोशी, शरद पवार, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस, सोनिया गांधी, राहुल गांधी, अहमद पटेल आणि इतर बारीकमोठ्या नेत्यांचे आलेले अनुभव राणेंनी या पुस्तकात कथन केले आहेत. राणे यांचा एकूण वादळी राजकीय प्रवास पाहता हे आत्मकथन स्फोटक असेल अशी अपेक्षा होती आणि तसे ते काही गौप्यस्फोट करणारे जरूर आहे, परंतु त्याहून अधिक त्यातून दिसते ती कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या व सामान्य कुटुंबातून आलेल्या एका नेत्याची चढउतारांची राजकीय वाटचाल. या राजकीय प्रवासात आपल्याला जे बरे वाईट अनुभव आले ते पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणेच कोणताही आडपडदा न ठेवता राणे यांनी सांगितले आहेत. कॉंग्रेस आणि भाजप ह्या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी आपल्याला मुख्यमंत्रिपदाचे गाजर दाखवत कशी फरफट केली तेही सांगायचे राणे यांनी यात टाळलेले नाही. नावांनिशी त्यांचा हिशेब त्यांनी यात पूर्ण केला आहे. मात्र, राजकारण सोडून अन्य विषयांना या पुस्तकात पूर्णपणे बगल दिलेली आहे, त्यामुळे हे कथन बरेचसे अपुरे वाटते.

या आत्मकथनातून राणेंची तीव्र सत्ताकांक्षा जशी दिसते, तसेच त्यांच्यासारख्या जनाधार असलेल्या नेत्याच्या पायांत पाय टाकून अडथळे निर्माण करण्याचे त्यांच्याच पक्षांतील सहकार्‍यांकडून कसे प्रयत्न झाले, त्याचाही तपशील राणेंनी काही हातचे राखून न ठेवता यात दिला आहे. श्रीधर नाईक खून खटल्याविषयी सांगताना आपल्याला आधी कळले असते तर आपण शिवसैनिकांना त्यापासून थांबवले असते असा दावा राणेंनी केला आहे.

राणेंना बाळासाहेबांकडून मिळालेले प्रेम आणि पदे याविषयी ते कृतज्ञता व्यक्त करतात, परंतु आपल्याला शिवसेना का सोडावी लागली याची कारणे देताना उद्धववर त्याचे खापर फोडतात. तो निर्णय घ्यायला काही लोकांनी आपल्याला भाग पाडले असे ते म्हणतात.

बाळासाहेबांनी आपण राजीनामापत्र दिल्यानंतर आपल्याला फोन केला व ‘नारायण, तुझा राग शांत झाला का?’ असे विचारल्याचे कळताच उद्धव यांनी बाळासाहेबांना, ‘राणेंना परत आणणार असाल तर मी आणि रश्मी मातोश्री सोडू’ असा निर्वाणीचा इशारा दिल्याने बाळासाहेबांचा निरुपाय झाल्याचा राणेंचा दावा आहे. बाळासाहेबांच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना सोडावी लागली आणि कॉंग्रेसच्या एका मुख्यमंत्र्याच्या मुलामुळे मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडावे लागले अशी व्यथा त्यांनी व्यक्त केली आहे.
इंदिरा गांधींच्या हत्येनंतर बाळासाहेबांना खलिस्तानवाद्यांनी धमकी दिल्याने सुरक्षेस्तव त्यांना लोणावळ्याला जावे लागले, तेव्हाच्या आपली सुरक्षा जागी आहे की नाही हे पाहायला रात्री दोन वाजता बाहेर डोकावलेल्या मीनाताईंना एका कारमध्ये राणे आणि त्यांचे सहकारी त्या अपरात्रीही दक्ष असल्याचे दिसते, तेथून ह्या आत्मकथनाची सुरुवात होते. हे पुस्तक अद्याप प्रकाशित असल्याने त्याचा संपूर्ण तपशील सांगणे काही योग्य होणार नाही, परंतु एक झलक येथे दाखवणे वावगे ठरू नये.

कोकणातल्या कणकवलीजवळच्या वरवडे गावी जन्मलेला, परंतु मुंबईत मिल कामगार असलेल्या वडिलांचा हा मुलगा. वडिलांच्या आजारपणामुळे ते सहकुटुंब गावी जातात. जाताना या मुलाला शिक्षणासाठी मामाकडे चेंबूरला ठेवून जातात. चौदाव्या वर्षी शिवसेना या झंझावाताशी त्याचा मग परिचय होतो. तेथून बाळासाहेब ठाकरे या वादळाशी नाते जडते. शिवसेनेसारख्या तेव्हाच्या आक्रमक संघटनेतून राजकीय प्रवास सुरू होतो. या दिवसांतील एक प्रसंग ह्रद्य आहे. कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी फीचे पैसे मागायला ते काकांकडे जातात, परंतु काका पैसे द्यायला नकार देतात, त्यामुळे कॉलेजचा प्रवेश अर्ज फाडून टाकून नोकरी पत्करावी लागते.
चेंबूरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल राणे यांनी फारसे काही सांगितलेले नाही, परंतु त्या दिवसांत काही चुका केल्याची प्रांजळ कबुली मात्र दिली आहे. हनुमंत परब हा आपला मित्र आणि आपण दोघे मिळून एकच हार विकत घेऊन एकत्र बाळासाहेबांना कसा घालायचो आणि त्यामुळे परिसरात ‘हर्‍या – नार्‍या’ची आपली टोळी प्रसिद्ध झाल्याचा किस्सा राणेंनी सांगितला आहे.

घराशेजारी राहणारी उषा विचारे विवाहबद्ध होऊन नीलम राणे कशी बनली आणि आजतागायत हा सुखी संसार कसा चालला आहे हे कुुटुंबवत्सल राणे या आत्मकथनात सांगतात. राजकारण्यांची मुले जास्त शिकत नाहीत, परंतु आपली नीलेश व नीतेश ही दोन्ही मुले कशी उच्चशिक्षित बनली आणि त्यामुळे आपल्याला त्यांचा कसा अभिमान वाटतो हेही आवर्जून नमूद करतात.

शिवसेना शाखाप्रमुख, नगरसेवक, बेस्ट समितीचा सदस्य, नंतर अध्यक्ष अशी एकेक यशाची पायरी चढत जाताना मुंबईच्या महापौरपदाची अपेक्षा धरली असताना बाळासाहेब कोकणात मालवणमधून विधानसभेची निवडणूक लढवायला सांगतात. इच्छा नसताना ती उमेदवारी कशी स्वीकारावी लागते आणि त्या निवडणुकीसाठी जिवाचे रान कसे करावे लागते हेही राणेंनी यात सांगितले आहे. मुंबईला वास्तव्य असूनही मतदारसंघात आपले स्थान कसे निर्माण केले हे सांगताना राणेंनी त्या दिवसांत सोसलेल्या त्रासांचीही माहिती दिली आहे. महिन्यातून चार वेळा मुंबई गोवा महामार्गावरून नऊ तास प्रवास करून रोज मतदारसंघातील चार गावांवरच्या चाळीस वस्त्या पादाक्रांत करून आपण कसा प्रचार केला तेही त्यांनी सांगितले आहे.
या आत्मकथनातून अनेकदा राणेंचा राजकीय चाणाक्षपणा, धोरणीपणा, अभ्यासू वृत्ती यांचे दर्शन घडते. प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थितीचा अचूक अंदाज घेत त्यानुसार आपली भूमिका ठरवणार्‍या राणेंची शिवसेना सोडल्यानंतर मात्र परवड का झाली हा तपशील वाचनीय आहेच, परंतु राजकारणात वावरणार्‍यांसाठी चिंतनीयही आहे. राजकारण हा किती जिवघेणा खेळ असतो याचे दर्शन त्यातून घडते. अनेकदा राणेंच्या झालेल्या परवडीमागे त्यांची तीव्र सत्ताकांक्षाच कारणीभूत असल्याचे जाणवते. त्यातून इतरांच्या मनामध्ये निर्माण झालेली असुरक्षितताच त्यांच्या राजकीय प्रवासातील अडथळा बनल्याचे दिसून येते. मनोहर जोशींच्या जागी तुला मुख्यमंत्री करणार असे बाळासाहेब पुन्हा पुन्हा सांगतात, परंतु ते घडण्यास खूप वेळ जावा लागतो, शिवसेना सोडल्यानंतर कॉंग्रेस प्रवेश केलात तर सहा महिन्यांत मुख्यमंत्री करू असे आश्वासन कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते देतात, परंतु ते कधीच प्रत्यक्षात येत नाही, कॉंग्रेस सोडाल तर भाजपामध्ये राजकीय उत्कर्षाची ग्वाही त्या पक्षाचे नेते देतात, परंतु तिथेही त्यांची उपेक्षा केली जाते. हे सारे अपमानास्पद अनुभव राणेंनी या पुस्तकात विस्ताराने सांगितले आहेत. सहकार्‍यांविषयी राणेंच्या मनात आलेली संशयाची भावनादेखील आडपडदा न ठेवता त्यांनी या आत्मकथनात सांगितली आहे. मग ते सुभाष देसाई असोत, प्रमोद नवलकर असोत, विलासराव असोत, नाही तर अशोक चव्हाण असोत.

आपल्या आमदारकीच्या, मुख्यमंत्रीपदावरील काळातील कामगिरीच्या तपशिलाला थोडा आत्मप्रशस्तीचा दर्प येतो, परंतु वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी मिळालेल्या मुख्यमंत्रिपदाचा वापर करीत आपण केलेली कामे, जनतेसाठी सुरू केलेली हॉटलाइन, जनता दरबार, मुंबईतील ९७ गुंडांचा नायनाट वगैरेंची नोंद अपरिहार्यपणे येणे साहजिक आहे.

या आत्मकथनातील सर्वांत वेधक प्रकरण आहे ते ९९ च्या निवडणुकीवेळच्या घडामोडींचे. शिवसेना – भाजपच्या जागा कमी का आल्या, आपण सत्तास्थापनेसाठी अपक्ष व छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळवूनही भाजपच्या नेत्यांनी त्यात अडथळा का आणि कसा आणला, कॉंग्रेस – राष्ट्रवादीचे विलासराव देशमुखांचे सरकार स्थापन झाल्यानंतर ते पाडण्यासाठी आपण कशी मोहीम उघडली, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे आमदारही कसे गळाला लागले, परंतु भाजपने बाळासाहेबांकडे जॉर्ज फर्नांडिसांना पाठवून ऐनवेळी या मोहिमेला आपला पाठिंबा नसल्याचे कसे जाहीर करायला लावले, हा या आत्मकथनातील कळसाध्याय आहे, त्यामुळे वाचकांनी तो या पुस्तकात मुळातूनच वाचणे आवश्यक आहे. ९९ च्या निवडणुकीत उद्धवनी शिवसेनेचे १५ उमेदवार परस्पर बदलल्याने सरकार स्थापनेसाठी जागा कमी पडल्या, १४५ आमदारांचा पाठिंबा आपण मिळवूनही मुंडेंसाठी महाजनांनी भाजपतर्फे सही करायला नकार दिला, मुंडेंनी जॉर्ज फर्नांडिसांना बाळासाहेबांकडे पाठवून फोडाफोडीला त्यांनी दिलेला पाठिंबा काढायला लावला वगैरे एकाहून एक स्फोटक धमाके येथे आपल्याला वाचायला मिळतील. त्यांचा तपशील मी येथे उघड करू इच्छित नाही.

शिवसेना सोडल्यानंतरचा आपला प्रवास सांगताना त्यात कॉंग्रेसने वेळोवेळी कसे झुलवले, भाजपने जवळ करूनही कसे दूर ठेवले वगैरे व्यथा राणेंनी आत्मकथनात प्रांजळपणे मांडल्या आहेत. मात्र, त्या वाचताना याला भाबडेपणा म्हणावे की त्यांच्या तीव्र सत्ताकांक्षेचे हे त्यांच्या पदरात पडलेले फळ म्हणावे असा प्रश्न पडतो. कॉंग्रेसने विलासरावांच्या जागी अशोक चव्हाणांना आणले आणि अशोक चव्हाणांच्या जागी पृथ्वीराज चव्हाणांना आले, परंतु या सार्‍या टप्प्यांवर राणेंना हात चोळत राहावे लागले, त्याचा केविलवाणा तपशील सांगायला राणे डगमगलेले नाहीत.

चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलीच्या लग्नासाठी भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत एकत्र गेलो असता आपल्याला भाजप प्रवेशाचे निमंत्रण कसे मिळाले, वर्षावर बोलवून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात वा दिल्लीत मागाल ते पद देऊ असे आश्वासन कसे दिले गेले, परंतु तिथेही आपली कशी फरफट केली गेली त्या आपल्या व्यथेला नारायण राणेंनी वाचा फोडली आहे. भाजपने त्यांना सध्या राज्यसभेची खासदारकी दिली आहे, परंतु आपण आजही महाराष्ट्रावर डोळा ठेवून आहोत असे राणे या आत्मकथनाच्या शेवटी सांगतात. ‘काळ हे सगळ्याचे उत्तर असते’ असा विश्वास त्यांना वाटतो. ‘नारायण राणेंना निकाली काढणे सोपे नाही’ असा इशाराही जाता जाता त्यांनी दिला आहे. आपल्याला कोकणात असलेला जनाधार दुसर्‍या कोणत्याही नेत्याला नाही. राष्ट्रीय पक्षांनी जराशी मदत केली तर आपण निवडणुकांत विरोधकांचा धुव्वा उडवू असा आत्मविश्वास करताना ‘पिक्चर अभी बाकी है दोस्त..’ असे सांगायलाही ते अर्थातच विसरत नाहीत! राणेंना निकाली काढू नका हाच या आत्मकथनाचा एकूण मथितार्थ आहे!