धाडसी व्यक्तिमत्त्व : जॉन आगियार

0
236
  •  गोकुळदास मुळवी

    जॉन आणि माझी जोडी चांगलीच जमली होती. त्या काळात आम्ही दोघांनी अनेक प्रकरणांना वाचा फोडली. सामाजिक प्रश्न हाताळले. गोवा- मराठी पत्रकार संघाचे आम्हीही सदस्य झालो. प्रत्येक कार्यक्रमात आम्ही सहभाग दाखवत होतो. कवळेची श्रीशांतादुर्गा आईला न विसरता त्यांनी असेच पुढे जावे आणि खूप मोठे व्हावे. आज त्यांच्या ६०व्या वाढदिवशी माझ्या त्यांना खूप खूप शुभेछा!

रामनाथी येथे श्रीरामनाथ सभागृहात एका संस्थेचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला मी पत्रकार म्हणून उपस्थित होतो. कार्यक्रम सुरू होण्यास थोडा उशीर होता. इतक्यात माझ्याजवळ एक मुलगा आला व म्हणाला ‘तू मुळवी न्ही?’ मी म्हटले ‘होय’. तो म्हणाला, ‘माझी आई, तुझी आणि तू लिहिलेल्या ‘तूं आई आहेस का?’ या नाटकाची खूप स्तुती करते आहे’.. असे सांगून त्यांनी माझ्याशी संवाद साधला. आपण श्री. हर्डीकर गुरुजींकडून मराठी भाषा शिकतो आहे. मला लेखनाची आवड आहे. मी त्याला म्हटले, ‘लिहीत राहा. आणि वाचनाची गोडी लावून घे. माझी काही मदत हवी असल्यास मी द्यायला तयार आहे’. ही आमची पहिली ओळख होती. नंतर ते शिकत राहिले. कधी-मधी भेट झाली तर थोडेसे बोलणे. मी माझी शिक्षकाची नोकरी सांभाळून नवप्रभा, राष्ट्रमत व तरुण भारतात फोंड्याच्या बातम्या देण्याचे काम करत होतो. पुढे पुढे हा जॉन आगियार माझा मित्र बनला. घरात आई-वडलांचा एकुलता एक मुलगा. त्यांची ‘उंडे’ काकणे बनविण्याची तिस्क-फोंडा येथे घरातच भट्टी होती. वडील ख्रिश्चन तर आई हिन्दु सारस्वत-ब्राह्मण समाजातील. वत्स गोत्री. आपल्या आई-वडिलांचे गुण घेऊन जन्माला आलेला हा मुलगा. त्याचे नाव त्यांनी जॉन असे ठेवले. घरातच नाही तर शेजार्‍यांचाही तो लाडका बनला. शिकत असतानाच त्यांनी लेखनाला सुरवात केली. चौगुले महाविद्यालयांत – शिकत असतांना कॉलेज जीवनात व शालेय जीवनात विविध स्पर्धात भाग घेऊन पारितोषिके पटकावली. चौगुले महाविद्यालयातून बी.ए.पर्यंत पदवी संपादन केल्यानंतर साळगावकर कायदा महाविद्यालयात कायदेविषयक शिक्षण घेण्यासाठी प्रवेश केला पण अपरिहार्य कारणास्तव हे शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले. पिंड लेखकाचा असल्याने वयाच्या १८व्या वर्षी ओ हेराल्ड या पोर्तुगीज, कोंकणी वर्तमानपत्राच्या कोंकणी विभागात काम केले. हे करत असतानाच फोटो जर्नालिझमचेही प्रशिक्षण घेतले. मडगावहून प्रसिध्द होणार्‍या वेस्ट कोस्ट टाइम्स व हेराल्डसाठी स्टाफ-रिपोर्टर म्हणून काम केले.

मध्यंतरी फोंड्याहून दै. गोमंतकसाठी मराठीतून बातम्या पाठवल्या. शोधक वृत्तीने बातम्या काढून ते पाठवायला लागल्याने ते थोड्याच दिवसात प्रसिध्दीस आले. फोंडा पोलीस स्टेशनवर एका पोलीस निरीक्षकाने एका पिकअप ड्रॉयव्हरला पोलीस स्टेशनच्या समोर अडवून बूटाच्या लाथानी मारहाण केली. या घटनेचे फक्त त्यांनी हेराल्डमधून व मी मराठीतून सनसनाटी वृत्त फोटोसह प्रसिध्द केले. त्यामुळे फोंड्यातच नव्हे गोव्यात खळबळ झाली. फोंडा पोलीस स्टेशनवर मोर्चा सुध्दा आला. तोडफोड झाली. आणखी एक म्हणजे दमणमधून एक उपनिरीक्षक फोंडा पोलीसस्टेशनवर आला होता. त्यानेही एका कॉन्स्टेबला जबर मारहाण केली. तो गंभीर झाल्यावर त्याला तिस्क-फोंडा येथे डॉ. सिरसाट यांच्या इस्पितळात गुपचूप दाखल केले. आम्ही दोघानी त्या कॉन्स्टेबलची भेट घेतली. त्याची परिस्थिती गंभीर होती. बोलण्याच्या देखील मनस्थितीत नव्हता. या घटनेचे वृत्त आम्ही दोघांनीच दिले. त्यामुळे परत खळबळ झाली. व वरिष्ठ पातळीवरून चौकशी सुरू झाली. सायंकाळी तो एका पत्रकाराला घेऊन केबीनमध्ये बसला होता. त्याचीही बाजू ऐकून घ्यावी म्हणून आम्ही त्याच्या केबीनमध्ये गेलो असता ‘गेटऑऊट’ म्हणून आमच्यावर ओरडले. एका कॉन्स्टेबलला बेल मारून बोलावले आम्हाला बाहेर काढण्यासाठी. पण त्या पूर्वीच आम्ही बाहेर पडलो. तो पत्रकार आणि हा क्रूरकर्मा पोलीस अधिकारी फिदीफिदी हसत होते. त्यावेळी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे होते आणि केरी फोंडा येथे एका समारंभाला ते येणार होते. एक निवेदन तयार केले व कार्यक्रम संपल्यावर श्री. राणे यांची भेट घेऊन सविस्तर माहिती त्यांना दिली. श्री राणे मला ओळखत होते. ते म्हणाले, ‘ठीक आहे. त्याला परत दमणला पाठवतो’. आणि काय आश्चर्य २४ तासाच्या आत त्याच्या हातात बदली ऑर्डर दिली. पत्रकारांना मान देणारा मुख्यमंत्री म्हणून आम्ही पुढे त्यांच्याकडे नेहमीच आदराने पाहिले.

जॉन आणि माझी जोडी चांगलीच जमली होती. या काळात आम्ही दोघांनी अनेक प्रकरणांना वाचा फोडली. सामाजिक प्रश्न हाताळले. गोवा -मराठी पत्रकार संघाचे आम्हीही सदस्य झालो. प्रत्येक कार्यक्रमात आम्ही सहभाग दाखवत होतो. पण नंतर संघात राजकारण आले. त्यांनी ग्रामीण पत्रकारांना बाजूला केले. मडगावचे तत्कालीन राष्ट्रमतचे प्रतिनिधी स्व. रत्नकांत पावसकर यांना हा अपमान सहन झाला नाही. त्यांनी ग्रामीण पत्रकार संघ स्थापन करण्याचा निर्धार केला. एक दिवस जॉन आणि पावसकर माझ्याकडे आले.

फोंडा तालुका पत्रकार संघ स्थापन करण्याचा निर्धार केला. लगेच हॉटेल पर्लच्या सभागृहात एक बैठक घेतली. बैठकीत रत्नकांत पावसकर यांनी मार्गदर्शन केले. नंतर कमिटी निवडली. माझी अध्यक्षपदी तर जॉनची सेक्रेटरी म्हणून निवड झाली. इतर पदाधिकारी निवडले. त्यानंतर मडगाव, सावर्डे, कुडचडे आदी ठिकाणी पत्रकार संघ स्थापन झाले. मध्यंतरी जॉन जरा विचित्रच वागायला लागला. बाहेरच्या लोकांना बरा. अनेक मित्रपरिवार जोडला, पण घरात पाऊल ठेवताच मस्ती करायला लागला.

एक दिवस त्याच्या आईने मला अडवून त्याच्या करणीचा पाढा वाचला. दरम्यान त्याने संघाच्या सेक्रेटरीपदाचाही राजिनामा दिला. मी त्याच्या घरी जाऊन विनंती केली. पाहिजे तर अध्यक्ष हो. पण संघात फूट नको, पण ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. मलाही जरा संशय आला. असा वागणारा जॉन नव्हता. मी त्यांच्या आईचा निरोप घेऊन आमच्या पूर्वाचारी देवळात गेलो व त्याचेविषयी देवाचा प्रसाद घेतला तेव्हा देवाने त्याला देवीची मागणी असल्याचे दाखवून दिले. मग देवी कोणती याचे स्पष्टीकरण घेतले असता कवळेच्या श्री शांतादुर्गेची मागणी होती. तरी मी त्याच्या आईला शांतादुर्गेला प्रसाद घेऊन खात्री करायला सांगितले. श्रीशांतादुर्गा तिची कुलदेवी होती. ‘जॉनला नेऊन देवीसमोर पाणी सोडले. तेव्हापासून वागणुकीत फरक पडत गेला. आता जॉन श्री शांतादुर्गेला स्मरतो, जत्रा चुकवत नाही. बेळगाव मराठा लाईफ इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये आर्मी अटॅचमेंट कॅम्पमध्ये दोनदा सहभाग दाखवला. मध्यप्रदेशमध्ये २१ दिवसांच्या झालेल्या साहसी स्पर्धात ऍडव्हान्स सहभाग लीडरशिप कॅम्पमध्ये रॉक क्लाईंबिंगचे प्रशिक्षण १९८२ साली घेतले.

केंद्रीय विदेश मंत्री एदुआर्द फालेरो यांचे त्यानी खाजगी सचीव म्हणून काम केले. त्यानंतर जॉनची माहिती खात्यात माहिती सहाय्यक म्हणून नीवड झाली. ते शूटर, गृहरक्षक (होमगार्ड) पणजी विभागाचे मानद कंपनी कमांडर, पणजी ट्रॉफीक वार्डन म्हणून काम केले आहे. १९८२ व १९८३ साली गोवा ते पूणे आणि गोवा ते हैद्राबाद अशा सायकल प्रवासाच्या चमूचे नेतृत्व त्यांनी केले आहे. मध्यप्रदेशातील पंचमढी येथे २१ दिवसांचे ‘ऍडव्हान्स लिडरशीप विथ रॉक क्लाईंबिंग’ या शिबिरासाठी गोव्यातून फक्त त्यांचीच निवड झाली होती. मेजर ए.के. कोल्हटकर हे त्यांचे ट्रेनिंग ऑफिसर होते. त्यांच्या नेतृत्वाखाली बरेच अनुभव घेतले. या काळात २५ ते ३० फूट उंच चट्टान चढण्याचा अनुभव घेतला. मेजर चतुर्वेदी, कॅप्टन अहिम महम्मद यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन तंत्रज्ञान व वैज्ञानिक पध्दतीचा अवलंब केल्याने मोठ मोठे चट्टान सहज चढता आले. हे क्षण अविस्मरणीय होते. मनाला आनंद देणारे जवळ
जवळ १०० फुटी महाकाय चट्टानंाशी झुंज द्यायचाही अनुभव घेतला. एन.सी.सी.मुळे राष्ट्रीय एकात्मता कशी साधता येते याचा अनुभव याच शिबिरातून घेतला. सुरवातीपासूनच त्यांच्यात धाडसी गुण होते. त्या गुणांचा आजही त्यांनां जागोजागी उपयोग होतो.

फोंडा तालुका पत्रकार संघाचे ते सचिव व सदस्य म्हणून काम करत असतांना आम्ही अनेक उपक्रम राबविले. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, समुहगीत गायन स्पर्धा, अखिल गोवा पातळीवर बॅडमिंटन स्पर्धा, बाल चित्रकला स्पर्धा, गुणी जनांचे सत्कार, अखिल गोवा पातळीवर ग्रामीण पत्रक मेळावे, स्वरसम्राज्ञी गिरिजाताई केळेकर स्मृती संगीत संमेलन. सर्वात महत्वाचे म्हणजे दरवर्षी पावसाळ्यात फोंडा शहरातील रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडत. त्यामुळे दुचाकी वाहन चालवणेही अशक्य व्हायचे. वृत्तपत्रात बातम्या देऊनही संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करायचे. पत्रकार संघाने निर्णय घेतला – रस्त्यावर पडलेल्या खड्डयांत झाडे लावून वनमहोत्सव साजरा करायचा. पत्रकार संघाचे सदस्य व नागरिकांना एकत्र आणून तीन वर्षे असा कार्यक्रम राबवला. तेव्हापासून रस्त्यांना तेवढ्याप्रमाणांत खड्डे पडणे बंद झाले. नागरिकांनी पत्रकार संघाचे कौतुक केलेच, शिवाय सर्व प्रसारमाध्यमांनी दखल घेऊन मोठी प्रसिध्दी दिली. स्थानिक समस्या, वाहतूक व्यवस्था, पर्यावरण आदी विषयांवर त्यांनी वर्तमानपत्रांतून लेखन केलेले आहे. आजवर त्यांनी १८ वेळा रक्तदान केलेले आहे.

त्यांचा ‘पावला’ हा कोंकणी कवितासंग्रह १९९६ रोजी प्रसिद्ध झाला. त्यानंतर गुलमोहर, सांज, वोल्यो यादि, ऑफ साईड (इंग्रजी निबंध) व मांडवीच्या देगे वेल्यान (रोमन कोंकणी निबंध) प्रसिद्ध झाले. वोल्यो यादि या कविता संग्रहाला कोकणी भाषा मंडळाचा साहित्य पुरस्कार लाभला.

अधूनमधून त्यांच्या कविता व लेख आजही प्रसिध्द होत आहेत. दक्षिण गोवा पत्रकार संघाचे काही काळ उपाध्यक्ष म्हणून काम केले व आजही ते सदस्य आहेत. पणजी येथे गुजचेही ते सदस्य होते. २००३ साली चेन्नई येथे झालेल्या मावळणकर राष्ट्रीय नेमबाज अजिंक्यपद स्पर्धेसाठी गोव्यातून निवड झालेल्या प्रतिनिधींचे नेतृत्व त्यांनीच केले. आकाशवाणी, दूरदर्शनवरून त्यांच्या साहित्याचे व त्यांनी घेतलेल्या अनेक मान्यवरांच्या मुलाखती प्रसारीत झालेल्या आहेत. वेगवेगळ्या वृत्तपत्रातून ‘करमचंद’ या टोपण नावाने प्रासंगिक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. माझ्याप्रमाणेच त्यांना समाजावर होत असलेल्या अन्यायाची चीड येते. मग त्यांची लेखणी सरसावते. या त्यांच्या गुणांची मी नेहमीच कदर केलेली आहे. फोंडा जेसी, गोवा मुंडकार कुळ संघटना सारख्या संस्थामधून श्री. रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेले आहे. फोंडा तालुका पत्रकार संघाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा संघातर्फे सत्कार करण्यात आला.

ते माहिती विभागात एक कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचे सिद्ध झाले. माहिती अधिकारी म्हणून त्यानी चांगली सेवा बजावली. त्यांनी गोवा पोलिस विभागाचे जनसंपर्क अधिकारी म्हणूनही काम पाहिले. होमगार्ड्समध्ये त्यांना मुख्यमंत्र्यांनी सुवर्ण पदक इ २००७, २०१२ मध्ये गुणवंत सेवांसाठी राष्ट्रपती पदक, २०१३ मध्ये डीजीसीडी प्रशंसा, २०१४ मध्ये डीडीजी एनसीसी प्रशस्तिपत्र. २०२० मध्ये प्रतिष्ठित सेवांसाठी राष्ट्रपती पदक त्यांना प्राप्त झाले. कवी म्हणून तर प्रसिद्ध होतेच पण या काळात ते गीतकार म्हणूनही प्रसिध्द झाले.

वडिलांचाच कित्ता पुढे गिरवत त्यांनी हिंदू मुलीशीच लग्न केले. पत्नी सौ. सविता, मुलगा नवदीप, मुलगी अंजली, सून नव्या यांच्या सहवासात आपल्या संसाराला उभारी देत असताना वाट्याला येणारे खात्यांतर्गत असो वा साहित्याचे असो ते काम तो ठाकठीकपणे करतोच. सर्वांशी मिळून मिसळून राहण्यातच समाधान मानतो. दोन्ही धर्माचे संस्कार झाल्याने दोन्ही धर्माच्या नियमांचे पालन करतात. आई-वडिल देवाला प्रिय झाल्याने कवळेची श्रीशांतादुर्गा हीच आता त्यांची आई आहे. आईला न विसरता त्यांनी पुढे जावे आणि खूप मोठे व्हावे. आज त्यांच्या ६०व्या वाढदिवशी माझ्या त्यांना खूप खूप शुभेछा!