देशात प्रलंबित खटल्यांच्या निकालास ४५० वर्षे लागतील

0
82

‘फोरम फॉर फास्ट जस्टिस’चे निरीक्षण
सध्या न्यायालयात लाखो खटले तुंबून पडलेले असून ते सगळे हातावेगळे करायचे झाल्यास त्यासाठी ४५० वर्षांपेक्षा जास्त काळ लागणार असल्याचे सांगून न्यायदान वेगाने होण्यासाठी कायदा दुरुस्ती हाच उपाय असल्याचे, ‘फोरम फॉर फास्ट जस्टिस’ या बिगर सरकारी संघटनेचे अध्यक्ष भगवानजी रयानी यांनी काल पणजीत बोलताना सांगितले.दरम्यान, जलद न्याय मिळण्यासाठी कायद्यात दुरुस्ती व्हावी यासाठी आपली संघटना सध्या राष्ट्रीय पातळीवर आंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. कायदा दुरुस्ती व्हावी या मागणीसाठी काही महिन्यापूर्वी मुंबईत नवी मुंबई ते आझाद मैदान या दरम्यान मोर्चा काढण्यात आला होता अशी माहितीही त्यानी दिली.
माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप हे यावेळी सन्माननीय पाहुणे म्हणून तर ज्येष्ठ वकील एम्. एस्. उसगांवकर हे प्रमुख म्हणून यावेळी हजर होते.
यावेळी बोलताना संघटनेचे अन्य एक नेते ओमप्रकाश मोंगा म्हणाले की खटले ४०-५० वर्षांपर्यंत चालतात. लोकांना न्याय मिळत नाही. त्यामुळे काही लोक न्यायासाठी माफियांचीही मदत घेतात. कायदा दुरुस्तीची मागणी धसास लावण्यासाठी देशव्यापी आंदोलनाची गरज असून त्यासाठी २०१५पर्यंत देशभरात १०० सोसायट्यांची स्थापना करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे ते म्हणाले.
कायदे तयार करणार्‍यांना हलवून जागे करण्यासाठी मोठे आंदोलन छेडावे लागणार असल्याचे ते म्हणाले.