तिसर्‍या महायुद्धाची ठिणगी पडणार?

0
216
  • शैलेंद्र देवळाणकर

सिरियामध्ये नुकताच झालेला रासायनिक हल्ला हा रशिया व इराणच्या मदतीनेच झाला असल्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यास कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. ब्रिटिश गुप्तहेराच्या विषप्रयोगावरुन अमेरिका व युरोपियन देश आणि रशिया यांच्यात विकोपाला गेलेला तणाव पाहता सिरियाच्या मुद्दयावरून युद्धाचा भडका उडतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

सिरियामधील संघर्ष आज आठव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. बशर अल असाद विरुद्धचा छोटा उठाव यादवी युद्धात रुपांतर झाला. या यादवी युद्धाने इस्लामिक स्टेटसारख्या संघटनेच्या प्रसारासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली. २०११ पासून सुरू झालेला हा संघर्ष आजही सुटण्याच्या स्थितीमध्ये दिसत नसून उलटपक्षी तो अधिकाधिक चिघळत जाण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. याचे कारण गेल्या सात दिवसांमध्ये सिरियामध्ये दुसर्‍यांदा रासायनिक हल्ला झाला आहे. या हल्ल्यांमध्ये सुमारे ४० हून अधिक जणांचा बळी गेला आहे. हा हल्ला अत्यंत निषेधार्ह आणि अमानवी आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यामध्येही अशाच स्वरुपाचा हल्ला झाला होता आणि त्यामध्ये सुमारे ८५ जणांचा मृत्यू झाला होता. त्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तात्काळ त्याचे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. अमेरिकेकडून त्यावेळी टॉम हॉक मिसाईल्स डागण्यात आली होती. जवळपास ५९ टॉमहॉक मिसाईल्स सिरियावर डागण्यात आली होती. आता तशाच स्वरुपाची कारवाई अमेरिकेकडून केली जाण्याची दाट शक्यता आहे.

हा हल्ला एका विशिष्ट पार्श्‍वभूमीवर झालेला आहे आणि ती लक्षात घेणेही अत्यंत गरजेचे आहे. अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून अमेरिका सिरियातून २००० सैनिक काढून घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर काही तासांतच हा रासायनिक हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यातून अमेरिकेचा सिरियामधील लष्करी हस्तक्षेप वाढणार आहे. त्यातून हा संघर्ष पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी या रासायनिक हल्ल्यासंदर्भात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यावरही टीका केली आहे. २०१३ मध्ये अशा प्रकारचा रासायनिक हल्ला झाला होता, त्याच वेळी अमेरिकेने कठोर पावले उचलली असती तर याची पुनरावृत्ती झाली नसती असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

रासायनिक हल्ले हे अत्यंत संहारक असतात. यातून अत्यंत विषारी वायू हवेत पसरतात. ही अस्रे क्षेपणास्रांच्या साहाय्यानेच डागली जातात. यामध्ये प्रामुख्याने क्लोरिन सायनाईट, सिरेन, मस्टॅर्ड गॅस, टीअर गॅस यांसारख्या शस्रास्रांचा वापर केला जातो. वास्तविक, अशा प्रकारची रासायनिक अस्रे दुसर्‍या महायुद्धाच्या काळात मोठ्या प्रमाणावर वापरली जात होती. त्यानंतर या अस्रांचा वापर आत्ताच होतो आहे.
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सिरियाकडे ही रासायनिक शस्त्रास्त्रे नाहीत. त्यामुळे त्यांनी ही संहारक अस्रे कोठून तरी आयात केली असण्याची शक्यता आहे. यामध्ये रशियाचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण सिरियातील बशर अल असाद सरकारला रशियाचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अमेरिका आणि रशिया आमने सामने उभे ठाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आज अमेरिका आणि अमेरिकेच्या प्रभावाखालील युरोपियन देश बंडखोरांच्या बाजूने उभे आहेत; तर दुसरीकडे रशिया व इराण हे बशरच्या बाजूने आहेत. या दोन गटांमधील संघर्षाची किंमत गरीब, निष्पाप नागरिकांना चुकवावी लागत आहे. सिरियन संघर्षामध्ये आतापर्यंत ४ लाख सिरियन नागरीक मारले गेले आहेत. लाखो लोक विस्थापित झाले आहेत.

सध्या अमेरिका आणि रशियामधील तणाव हा आधीच विकोपाला गेला आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये एका गुप्तहेरावर झालेल्या विषप्रयोगानंतर थेरेसा मे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अमेरिका आणि १८ युरोपियन राष्ट्रांनी १०० हून अधिक रशियन राजदूतांना काढून टाकले होते. ही घटना अत्यंत ऐतिहासिक होती. शीतयुद्धानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारे एखाद्या राष्ट्राविरोधात सामूहिक राजनियक कारवाई करण्यात आली. यानंतर रशियानेही या देशांच्या राजदूतांची हकालपट्टी केली होती. या मुद्दयामुळे रशिया विरुद्ध अमेरिका आणि युरोपियन देश हा संघर्ष चिघळण्याच्या स्थितीपर्यंत येऊन ठेपला होता. तशातच हा रासायनिक हल्ला झाला आहे.

अमेरिका आणि रशियाची सध्याची आक्रमक धोरणे पाहता या हल्ल्याच्या निमित्ताने युद्धाची ठिणगी पडते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. तसे झाल्यास चीनसारखा देश रशियाच्या बाजूने जाऊ शकतो. कारण सध्या सुरू असलेल्या व्यापारी युद्धामुळे चीन आणि अमेरिका यांच्यातील कडवटपणा वाढत चालला आहे. अशा स्थितीत चीन रशियाच्या बाजूने उभा राहिल्यास कदाचित तिसर्‍या महायुद्धाची ठिगणीही पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच यासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघटनेसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेने तात्काळ पुढाकार घेऊन यामध्ये मध्यस्थी करून शांततेच्या मार्गाने तोडगा काढणे आवश्यक आहे. २०१३ च्या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघटनेने सिरियाविरोधात कडक कारवाई करण्याचे ठरवले होते. मात्र त्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा आणि ब्लादीमिर पुतिन यांच्यामध्ये करार झाल्यामुळे ही कारवाई होऊ शकली नाही. कदाचित त्यावेळी ही कारवाई झाली असती तर रासायिनक हल्ल्याची पुनरावृत्ती टळू शकली असती. मात्र तसे झाले नाही. आता बदलत्या आंतरराष्ट्रीय समीकरणांमुळे आणि संघर्षामुळे हा रासायनिक हल्ला महायुद्धास निमित्त ठरतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. कारण ट्रम्प यांनी या हल्ल्याशी संबंधित असणार्‍यांना जबर किंमत चुकवावी लागेल असा इशारा दिला आहे.

या संपूर्ण संघर्षमय, अशांततेच्या वातावरणाचे परिणाम भारतावरही होणार आहे. वास्तविक, भारताची यासंदर्भातील भूमिका स्पष्ट असून ती वाखाणण्याजोगी आहे. सिरियाचा प्रश्‍न शांततेच्या मार्गाने सोडवण्यात यावा असे भारताचे मत आहे.
त्यामुळेच मागील काळात अमेरिकेकडून भारताला सिरियामध्ये शांतीसैन्य पाठवण्याचे आवाहन करण्यात येऊनही भारताने त्यास नकार दिला, कारण लष्कराच्या, युद्धाच्या मार्गाने सिरियाचा संघर्ष मिटणार नसून तो चिघळतच जाणार आहे याची भारताला कल्पना आहे. मात्र हा संघर्ष टिपेला पोहोचला आहे. त्यातून संपूर्ण आखातामध्ये अस्थिरतेचे वातावरण तयार झाले आहे. या परिस्थितीकडे भारताने सावध होऊन लक्ष ठेवून राहणे गरजेचे आहे. कारण भारताला होणारा इंधन आणि भूगर्भ नैसर्गिक वायूचा पुरवठा हा आखाती देशांमधून होतो. तेथे अशांतता निर्माण झाल्यास कच्च्या तेलाचे भाव वधारतात.

परिणामी देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढून महागाई वाढण्याची शक्यता बळावते. साहजिकच याच्या झळा सामान्य नागरिकांबरोबरच भारतीय अर्थव्यवस्थेेला सोसाव्या लागतात.

आखातात अशांतता पसरल्यास तेथे काम करणार्‍या ६० लाख भारतीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍नही निर्माण होतो. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्यांना भारतात परत आणण्यासाठी बरीच यातायात करावी लागतेच, शिवाय त्यांचे परत येणे भारताला रोजगार संधींच्या दृष्टीनेही परवडणारे नसेल. त्यामुळे सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीकडे भारताने अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून राहणे आवश्यक आहे.