ढासळत्या अर्थव्यवस्थेचे सरकारला नाही अजिबात भान : मनमोहन सिंग

0
101

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था सातत्याने ढासळत असल्याचा दावा करीत मोदी सरकारवर पुन्हा शरसंधान केले आहे. देशाच्या अर्थ व्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस खालावत आहे. मात्र खेदाची गोष्ट म्हणजे सरकारला त्याविषयी जाणीव किंवा फिकिर वाटत नाही.

सध्या आपण आर्थिक मंदिचा सामना करीत आहोत व या स्थितीकडे गांभीर्याने लक्ष द्या असा सल्ला डॉ. सिंग यांनी मोदी सरकारला दिला आहे. डॉ. सिंग म्हणाले की देशाच्या विकास दरात (जीडीपी) घसरण होऊन तो पाच टक्केच राहिला आहे. हे पाहून आम्हाला २००८ मधील आठवण होते. त्यावेळी आमचे सरकार होते व अर्थ व्यवस्था कोलमडली होती. तेव्हाची ती स्थिती आंतरराष्ट्रीय आर्थिक संकटामुळे झाली होती. तरीही आम्ही त्यावेळी त्या आव्हानाला संधीच्या रूपात पाहिले व अर्थ व्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी पावले उचलली.

आजही आपण तशाच परिस्थितीला सामोरे जात आहोत. मग ते रियल ईस्टेटचे क्षेत्र असो किंवा कृषी असो अथवा अन्य कोणतेही क्षेत्र. प्रत्येक क्षेत्रात होणार्‍या घसरणीमुळे अर्थ व्यवस्था दिवसेंदिवस अधिकच खालावत आहे. जर योग्य गतीने या परिस्थितीतून सावरले गेले नाही तर रोजगार क्षेत्रात सर्वात भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे.
दिवसेंदिवस बेरोजगारीत वाढ होत राहिली तर अर्थ व्यवस्थेसमोरील अडचणीत भर पडणार आहे, असा इशारा डॉ. सिंग यांनी दिला. याआधी कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी याच विषयावरून मोदी सरकारला टीकेचे लक्ष्य केले होते.