ज्येष्ठ अभिनेत्री सुधा करमरकर यांचे निधन

0
86

बालरंगभूमीच्या आधारवड अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुधा करमरकर यांचे काल मुंबईत निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. करमरकर यांनी ‘मुंबई मराठी साहित्य संघा’च्या सहकार्याने १९५९ मध्ये ‘लिटिल थिएटर’ची स्थापना केली होती. लिटिल थिएटरतर्फे ‘मधुमंजिरी’ हे पहिले बालनाट्य सादर केले होते. ते खूप गाजले. त्याचे लेखन रत्नाकर मतकरी यांनी आणि दिग्दर्शन सुधाताईंनी केले होते.

सुधाताईंचा जन्म १९३४ साली मुंबईत झाला. वडील तात्या आमोणकर हे साहित्य संघ या नाट्यसंस्थेशी संलग्न असल्याने त्यांना घरातूनच नाट्यसेवेचे बाळकडू मिळाले होते. वयाच्या १८व्या वर्षी त्या भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यप्रकारात त्या प्रवीण झाल्या होत्या. त्यांनी ‘रंभा’ या नाटकात साकारलेली रंभेची भूमिका खूप गाजली. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवी मिळवल्यानंतर मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला होता. आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेतील ‘उद्याचा संसार’ या नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक सुधाताईंना मिळाले होते.

सुधाताईंनी बालरंगभूमीसाठी दिलेले योगदान खूप मोठे होते. लिटिल थिएटरच्या माध्यमातून त्यांनी अनेक बालनाट्ये सादर केली. त्यांनीच या बालनाट्यांचे दिग्दर्शन केले होते. ‘चिनी बदाम’, ‘अल्लाउद्दिन आणि जादूचा दिवा’, ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’, ‘जादूचा वेल’, ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘कळलाव्या कांद्याची कहाणी’, अशी अनेक बालनाट्ये त्यांनी सादर केली. व्यावसायिक रंगभूमीवरही त्यांनी काम केले होते. ‘विकत घेतला न्याय’, ‘तो राजहंस एक’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘थँक्यू मि. ग्लाड’, ‘पुत्रकामेष्टी’, ‘बेईमान’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘पती गेले गं काठेवाडी’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘अश्रूंची झाली फुले’, अशा व्यावसायिक नाटकांतूनही त्यांनी काम केले. त्यांना २०१२ साली महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या वतीने नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलेे होते.