ज्ञानदेवे रचिला पाया…!

0
1123
  •  रमेश सावईकर

ज्ञानेश्‍वरांच्या जीवनविषयक शिकवणीमुळे वैदिक धर्माचा आणि सामाजिक जीवनधर्माचा पाया बळकट झाला! संत नामदेव, तुकाराम यांनी हे कार्य पुढे नेत भागवत धर्माचा ध्वज उंच फडकवत ठेवला. त्याची शान आजही आपण एकविसाव्या शतकांत अनुभवतो आहोत.

ईश्‍वराच्या कृपेने मानवजातीच्या कल्याणाकरिता ज्या थोर विभूती जन्माला आल्यात, त्यांच्यामध्ये संत ज्ञानेश्‍वरांची गणना करावी लागेल. संतश्रेष्ठ ज्ञानदेव ही भगवद्भक्तांची ‘माऊली’ म्हणून मराठी संतसाहित्यात ओळखली जाते. मराठी संतसाहित्यनिर्मितीचा विचार करता ज्ञानदेव हे त्याचे महामेरू मुकुटमणी मानावे लागतील.

केवळ तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि विद्वत्ता यांमुळेच ज्ञानदेवाना विभुतीमत्व प्राप्त झाले नाही तर त्यांच्या जीवनाचा किमयागार होते त्यांचे गुरू निवृत्तीनाथ. त्यांनी दिलेला अनुग्रह ही ज्ञानदेवांच्या जीवनातील महान घटना होय. निवृत्तीनाथांनी परंपरागत योगशक्ती जेव्हा ज्ञानेश्‍वरांच्या ठिकाणी संक्रमित केली तेव्हा त्यांचा संपूर्ण कायापालट झाला. विश्‍वात्मक चैतन्याशी ते समरस झाले. या शक्तीच्या द्वारे त्यांनी मराठी वाङ्‌मयात मोठे चमत्कार घडवून आणले. त्यांच्या प्रज्ञारुपी कल्पवल्लीला असाकाही बहर आला की तिला लागलेल्या फुलाफळांचा अनिर्वचनीय सुगंध लक्षावधी लोकांच्या शुद्ध अंतःकरणात शतकानुशतके दरवळतोय. म्हणूनच भगवद् गीतेवर त्यांनी केलेले भाष्य ‘भावार्थ दीपिका’ तथा ‘ज्ञानेश्‍वरी’ आज एवढी शतके उलटूनही पारिजातकासारखी ताजी- टवटवीत आहेत.

संत ज्ञानेश्‍वरांचा जन्म तेराव्या शतकात श्रावण कृष्ण अष्टमी शके ११९७ (इ.स.१२७५) रोजी मध्यरात्री आपेगाव येथे झाला. आपेगांव हे औरंगाबाद जिल्ह्यात पैठणजवळ गोदावरीच्या तिरावर वसलेले गाव. त्यांचे वडील विठ्ठलपंत व आई रुक्मिणीबाई तीर्थयात्रा करून आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. थोरले बंधू निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई यांच्यासह ज्ञानदेवानाही पायी पंढरपूर वारी करण्याचा योग त्यांच्या वडलांमुळे आला होता.

संन्याशाची मुले म्हणून त्यांना कर्मठ ब्राह्मणांनी वाळीत टाकलं. त्यामुळे काही काळ परित्यक्त ब्राह्मण म्हणून घालवावा लागला. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये म्हणून ज्ञानेश्‍वरांच्या आईवडिलांनी आत्महत्या करून देहान्त प्रायश्‍चित्त घेतले.
ज्ञानदेवांनी ‘भावार्थ दीपिका’ या भगवत्‌गीतेच्या अनुवादवजा टीका ग्रंथाचे कार्य नेवासा (अहमदनगर जिल्हा) येथे राहून पूर्ण केले. संस्कृत भाषेतील ज्ञान त्यांनी प्राकृत भाषेत आणले म्हणून ‘ज्ञानेश्‍वरी’ हे मराठी वाङ्‌मयाचे देशीकार लेणे म्हणावे लागेल. ज्ञानदेवांनी मराठी भाषाभिमान व ज्ञानेश्‍वरीची महती व्यक्त केली ती पुढील ओवीतून प्रत्ययास येते.
माझ्या मर्‍हाटाचि बोलू कौतुके|
परि अमृतातेहि पैजा जिंके|
ऐसी अक्षरे रसिकें| मेळविन ॥ ६१४)
ज्ञानेश्‍वरीत कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोगावर सुमारे ९०० ओव्या इ.स.१२९० मध्ये त्यांनी लिहिल्या. विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब्रह्म ऐक्याची महती कथित करणारा ‘अमृतानुभव’, चांगदेवांना लिहिलेली ६५ ओव्यांची उपदेशपर व अद्वैत सिद्धांताचे अप्रतिम दर्शन घडविणारे ‘चांगदेव पासष्टी’ या संत ज्ञानदेवांच्या इतर वाङ्‌मय निर्मिती होत.
तेराव्या शतकातील मराठी संत कवी, भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी व तत्त्वज्ञ म्हणून संत ज्ञानदेवांचे स्थान वाङ्‌मयात अन् वारकरी सांप्रदायिक भक्तगणात अढळ आहे.

जो जे वांछिल तो ते लाहो, असे म्हणत अखिल विश्‍वाची काळजी वाहणार्‍या संत ज्ञानेश्‍वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माऊली’ म्हणतात. आत्मानंदाचा, अविनाशी सुखाचा लाभ सर्वांना व्हावा म्हणून ज्ञानेश्‍वरीच्या द्वारे मराठी भाषेत ब्रह्मविद्येचा सुकाळ करून सोडला. गुरूकृपेने आपणास प्राप्त झालेला आनंद सर्व जगाला द्यावा अशी त्यांची विश्‍वहितात्मक दृष्टी-भावना होती.
दिसो परतत्त्व डोळा| पाहो सुखाचा सोहळा|
रिघो महाबोध सुकाळा| माजी विश्‍व॥
तैसा वाग्विलास विस्तारु| गीतार्थेसी विश्‍व भरु|
आनंदाचा आवारु| मांडू जगा॥
अशा शब्दात त्यांनी आपला विश्‍वव्यापक दृष्टिकोन व्यक्त केला आहे. ईश्‍वराने सूर्याला दिलेला प्रकाश किंवा चंद्राला दिलेले अमृत आपोआपच सर्व जगाला प्राप्त होते, त्याप्रमाणे मला आपण दिलेला आनंद मी बोललो नाही तरीही जगाला मिळणारच आहे. कारण तो जगाकरताच मला देवाने दिला आहे, असे संत ज्ञानदेव म्हणतात.
जीव- जगत् व जगदात्मा याचा यथार्थ अद्वैत सिद्धांत ज्ञानेश्‍वरांनी मांडला आहे. आपण देह नसून अविनाशी चैतन्य आहोत आणि हेच चैतन्य सर्वत्र भरले आहे, असे स्वरूपाच्या अद्वैताचे ज्ञान झाले म्हणजे ‘तरति शोकमात्मवित्’, या आत्मवेत्त्याला शोक, मोह, दुःख, भीति स्पर्श करू शकत नाहीत.

‘मी विश्‍वेसी विश्‍वात्मा’ हा विश्‍वाच्या किंवा जगाच्या खर्‍या चिन्मय स्वरूपाचा सिद्धांत ते सांगतात. आत्मज्ञान झाले तरी ते ठसावे, स्थिर व्हावे म्हणून मन शुद्ध करावे लागते. निष्काम कर्म, भक्ती व योग ही चित्तशुद्धीद्वारा आत्मज्ञानाची तीन साधने आहेत.
म्हणौनि जे जे उचित | आणि अवसरे करुनि प्राप्त|
ते कर्में हेतुरहित| आचर तूं॥
हेतुरहित केलेले, उचित व निःस्वार्थ कर्तव्यकर्म बंधक तर होत नाहीच पण निश्‍चित मोक्ष देते. स्वधर्मानुसार प्राप्त झालेले काम म्हणजेच कर्तव्यकर्म होय. एवढे ध्यानात ठेवून कसल्याही फळाची अपेक्षा न बाळगता कर्म करीत रहावे. म्हणजे ते सत्कारणी लागेल.

भक्तिविषयी सांगताना त्यांनी निर्गुणावर श्रद्धा ठेवून त्याला शरण जाणे, त्याच्याशी चित्त एकाग्र करणे हीच खरी भक्ती मानली आहे.
स्थूलाकारी नाशिवंते| भरवसा बांधोनि चित्तें|
पाहति मज अविनाशातें | तरी कैसेनि दीसे॥
स्थूल आकार म्हणजे परमात्मा किंवा परमेश्‍वर नव्हे. कारण आकार विनाशी आहे. सर्वव्यापक, अव्यक्त, अमूर्त असा ईश्‍वर भूतमात्रांच्या हृदयात आहे. त्यांच्याविषयींची आपली कर्तव्ये निष्काम बुद्धीने केल्यामुळेच या सर्वात्मक परमेश्‍वराची खरी पूजा होते. हे तत्त्वज्ञान भक्तियोगात संत ज्ञानदेवांनी भक्तास कथित केले आहे. सामान्य साधकांनी भक्तियुक्त निष्काम कर्मयोगाचे साधनच स्वीकारावे असे ज्ञानदेवाचे मत होते. देह म्हणजे मी ही भ्रांति ज्याची गेली त्याला अजर, अमर व सुंदर आत्मस्वरूप समजल्याने परम आनंद होतो. सौंदर्य हा शरीरगत भाव नाही. तो आत्म्याचा अव्यक्त भाव आहे. आत्मज्ञानाने प्रत्येक माणसाला जरा- मरणाच्या भयापासून मुक्त होऊन सुंदर होता येते, असे मत ज्ञानदेवांनी मांडले आहे.

शांतरस ही अशी चैतन्यमय अवस्था आहे. सात्त्विक लोकांनाच आत्मज्ञान होऊन शांतरसाचा आस्वाद घेता येतो आणि सात्त्विक कर्ते नेहमी ‘धृत्युत्साहसमन्वित’ असतात हे लक्षात घेतले म्हणजे शांतरसाचा आविष्कार करण्यात ज्ञानदेवांचा हेतू तामसी, आलस्य आणि राजसी विषयासक्ती नाहीशी व्हावी, खलांची व्यंकटी मोडावी व सात्त्विक वृत्ती वाढीला लागावी हा हेतू होता.

संत ज्ञानेश्‍वरांनी नामदेवांच्या जोडीने भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. तीर्थयात्रा करून लोकांना भक्तीमार्गाविषयी सज्ञानी केले. त्यांनी धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. या धर्माचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरोबा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारिक नेतृत्व त्यांनी केले.

संतांची मानसिक स्थिती, खुद्द नामदेवांना झालेल्या वेदना, ज्ञानेश्‍वरांचा संयम व निग्रह या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगात उमटलेले दिसते.
आधी रचिली पंढरी| मग वौकुंठ नगरी |
जेव्हा नव्हते चराचर| तेव्हा होते पंढरपूर॥
असे पंढरीचे समृद्ध वर्णन संत नामदेवांनी केले आहे. पंढरपूरच्या विठोबा रूपात सर्व लावण्य दडलेले आहे आणि सख्यांनो ते सुखमय रूप मी प्रत्यक्ष पाहिले आहे. त्याच्या निव्वळ असण्याच्या अर्थाने माझे संपूर्ण मन व्यापून गेले आहे, त्याच्याशिवाय मला क्षणभरही विरंगुळा लाभत नाही. माझे चित्तच नव्हे तर चैतन्यसुद्धा विठोबाच्या ध्यासात मुरून गेले आहे, असे ज्ञानदेव सांगतात. त्यांना केवळ श्रीविठ्ठलाच्या सहवासातच स्वारस्य आहे. ते म्हणतात, ‘बापरखुमादेविवरु विठ्ठलुचि पुरे | चित्त चैतज्ञ मुरे बाई ये वो॥
संत ज्ञानेश्‍वर शेवटच्या अध्यायात विश्‍वात्मक देवाला वाक्‌यज्ञाचे फलस्वरूप म्हणून पसायदान मागताना म्हणतात,
जे खळांची व्यंकटी सांडो| तया सत्कर्मी रती वाढो|
भूता परस्परे जडो| मैत्र जीवांचे ॥
ज्या व्यक्ती वाईट प्रवृत्तीच्या (खळ) आहेत त्यांच्यातील खलत्व सत्प्रवृत्तीत परावर्तीत व्हावं आणि त्याची फलश्रुती म्हणजे सर्वच व्यक्त सर्वांचे मित्र होवोत.
दुरितांचे तिमिर जावो| विश्‍व स्वधर्मे सूर्ये पाहो|
जो जे वांछिल तो ते लाहो| प्राणिजात॥
ज्या आगीचा धर्म जाळणे, नदीचा प्रवाहित करणे त्याचप्रमाणे माणसाला माणुसकीचा धर्म आपण मानला आणि त्याचा प्रत्यय प्रत्येकाच्या जीवनात आला तर त्या धर्मरूपी सूर्याच्या प्रकाशाने प्रत्येकाचे जीवन उजळून निघेल. याचा परिणाम असा होईल की ज्याला जे जे हवे ते ते मिळेल. स्वतःसाठी परमेश्‍वराकडे काहीही न मागता विश्‍वशांतीसाठी माणुसकीचा धर्म सर्वांमध्ये आचरित व्हावा म्हणून पसायदान मागणारे संत ज्ञानदेव हे संतश्रेष्ठ ठरतात.

संतज्ञानेश्‍वरांनी मराठी भाषेतील अमर ग्रंथसंपदा महाराष्ट्राच्या स्वाधीन केली व आपले जीविताकर्य आता संपले असे वाटून या योगीराजाने वयाच्या २१व्या वर्षी म्हणजे शके १२१८ मध्ये (इ.स.१२९६) कार्तिक वद्य त्रयोदशीला आळंदी येथे सिद्धेश्‍वरासमोर संजीवन समाधी घेतली.
संत ज्ञानेश्‍वरांनी समाधी घेतली तेव्हा निवृत्तीनाथांची अवस्था म्हणजे …
बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट|
ओघ बारा वाटा मुरडताती॥ …. अशी झाली. नामदेव म्हणतात….
कोण जाणे माझे जीवीचा कळवळा | प्रेमाश्रु डोळां लोटताती|
नामा म्हणे येथे बोलवेना मज| जातसे नीजगुज आवडीचे ॥
संत ज्ञानेश्‍वरांनी संजीवन समाधी घेतल्याच्या प्रसंगासंबंधी गोमंतकीय कवी बा. भ. बोरकर म्हणतात…
‘ज्ञानदेव गेले तेव्हा बावला मोगरा|’
भागवत धर्माचा पाया संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी रचिला. त्यावरती इमारत बांधण्याचे काम नामदेवांनी केले आणि संत तुकारामांनी केलेले भक्त वारकरी सांप्रदायिक कार्य म्हणजे भागवत धर्माच्या इमारतीवर कळस चढविला! ज्ञानेश्‍वरांच्या जीवनविषयक शिकवणीमुळे वैदिक धर्माचा आणि सामाजिक जीवनधर्माचा पाया बळकट झाला! संत नामदेव, तुकाराम यांनी हे कार्य पुढे नेत भागवत धर्माचा ध्वज उंच फडकवत ठेवला. त्याची शान आजही आपण एकविसाव्या शतकांत अनुभवतो आहोत.