जीवन सुंदर आहे

0
147

करमळीतील अल्पवयीन मुला – मुलीने ‘प्रेम प्रकरणा’ तून आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याची ह्रदयद्रावक घटना नुकतीच घडली. प्रेम म्हणजे काय हे न कळण्याच्या वयातील मुलांनी उचललेले हे टोकाचे पाऊल आजच्या एकूणच समाजस्थितीवर बोट ठेवते आहे. असे या मुलांच्या आयुष्यात काय घडले की त्यांना आपले उमलते आयुष्य एका क्षणात चुरगाळून फेकून द्यावेसे वाटावे? आपल्या घरच्यांची, कुटुंबियांची यत्किंचित पर्वा न करता हे जग सोडून द्यावेसे वाटावे? आपला लाखमोलाचा जीव त्यागताना या मुलांनी चिठ्ठी चपाटीही लिहून मागे ठेवलेली नाही. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये काय चालले होते, कोणती खळबळ माजली होती, त्याचा माग काढणे आता शक्य नाही, परंतु जे घडले ते विदारक आहे आणि समाजाने सजगपणे या वाढत्या आत्महत्यांच्या समस्येवर गांभीर्याने विचारमंथन करण्याची गरज त्यातून प्रकर्षाने व्यक्त होते आहे. गोव्यामध्ये अलीकडील वर्षांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण प्रचंड वाढलेले दिसते. आयुष्यातील एखाद्या क्षुल्लक घटनेवरूनही माणसे नैराश्याच्या खोल खोल खाईत लोटली जातात, जिथून परत फिरण्याची वाट नाही अशा परक्या प्रदेशात निघून जातात. मागे राहिलेल्या आप्तांवर दुःखाचा केवढा डोंगर कोसळणार आहे याचा विचारही त्यांना करावासा वाटत नाही ही कसली भयावह परिस्थिती आज समाजात निर्माण झालेली आहे? घराघरांतले भक्कम कौटुंबिक आधाराचे धागे कसे बरे विरविरीत होऊन गेले आहेत? भोवती सगळे सगेसोयरे असूनही माणसे एकाकी पडत चालली आहेत, इतरांपासून तुटत चालली आहेत. हे कसले भीषण स्थित्यंतर आहे? समाजातील विचारवंतांनी या समस्येवर थोडे अंतर्मुख होण्याची वेळ निश्‍चितपणे आलेली आहे. आपल्या मुलाच्या विकलांगत्वाने व्यथित होऊन एखादे कुंभारजुव्याचे हसते खेळते नाईक कुटुंब एका फसव्या क्षणी तिहेरी आत्महत्येचा मार्ग अनुसरते. भाऊ रागावला या क्षुल्लक कारणावरून दोन कोवळ्या मुली आमोण्याचा पूल गाठतात आणि स्वतःला खाली झोकून देतात, एखादी वेदश्री आपल्या गोड गोजिर्‍या मुलीसह जुवारीत उडी घेते… हे सारे काय चालले आहे? राष्ट्रीय सरासरीपेक्षा गोव्यातील आत्महत्यांचे प्रमाण कितीतरी अधिक आहे. त्यातही पंधरा ते पस्तीस या वयोगटातील आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. आता तर पंधरा पेक्षाही कमी वयाची कोवळी मुले समोरच्या उगवत्या जीवनसूर्याकडे सरळ पाठ फिरवून घनदाट अंधाराच्या कृष्णविवरात झोकून देऊ लागली आहेत. गोव्यातील या समस्येच्या अनुषंगाने विद्यालयांमधून समुपदेशकांची नियुक्ती गोवा बाल कायद्याखाली करण्यात आली. परंतु समुपदेशकांकडे जाऊन आपल्या मनीच्या व्यथा उघड करण्याऐवजी थेट प्राणत्यागाचा टोकाचा मार्ग अनुसरणार्‍या या आपल्या मुलांच्या संगोपनामध्ये आपणच कमी पडतो आहोत का? करमळीत परवा आत्महत्या केलेला मुलगा उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शिकायचा. तो चांगला खेळाडू होता, वर्गात गप्पांत रमलेला असायचा असे त्याचे प्राध्यापक सांगतात. मग जीवनाकडे अशा सकारात्मक नजरेतून पाहणार्‍या या मुलाला आपल्या नववीच्या वर्गातल्या अल्पवयीन ‘प्रेयसी’ सह या जीवनाला रामराम ठोकावा का वाटला असेल? चित्रपट, दूरचित्रवाणी मालिकांवर आणि माध्यमांवर अशा आत्महत्यांचे खापर फोडून समाज नेहमी मोकळा होतो. परंतु माध्यमांमध्ये चांगल्या गोष्टीही दाखवल्या जातात. मग नकारात्मकतेचीच कास का धरली जाते? पूर्वी आत्महत्यांमागे खरोखरच गंभीर कारणे असायची. गरीबी, बेकारी, दिवाळखोरी, आर्थिक संकटे, कौटुंबिक छळ अशा कारणांवरून माणसे आत्महत्येचा मार्ग अनुसरायची. अलीकडे लाखमोलाचा जीव त्यागायला कसलेही क्षुल्लक कारण पुरते. दिल्लीत मागे एका चौदा वर्षांच्या मुलाने वडिलांनी स्कूटर दिली नाही म्हणून आत्महत्या केली. मागे चिठीही लिहून ठेवली की, ‘आता तुमचे पैसे वाचवा’. परीक्षेतील थोडेसे अपयशही मुले जिव्हारी लावून घेताना दिसत आहेत. आजच्या सुरक्षित वातावरणात वाढणारी मुले अधिक भावुक, हळवी आणि मानसिक आंदोलने पेलण्यास असमर्थ ठरत आहेत का? की पालकांना त्यांना द्यायला वेळ नसल्याने एकाकी पडू लागली आहेत? प्रश्न अनेक आहेत. उत्तरे सर्वांनी शोधायची आहेत. आत्महत्या रोखल्या पाहिजेत. हे जीवन सुंदर आहे आणि प्रत्येक रात्रीच्या गर्भात उद्याच्या उषेच्या हाका दडलेल्या आहेत, नवी सोनेरी किरणे येणारच आहेत, हे प्रत्येक उमलत्या कळीच्या मनी ठसवावेच लागेल.