चंदनाच्या टिळ्याचे आरोग्यदायी फायदे….

0
237

हिंदू धर्मात पूजा करताना टिळा लावण्याची प्रथा आहे. पूजाच कशाला इतर मंगल कार्याची सुरूवातही गंध लावूनच करण्यात येते. गंध लावल्याशिवाय कोणतेही मंगल कार्य सुरू होत नाही.

कपाळावर टिळा नसणे हे अशुभ मानले जाते. पूजेच्या वेळी कुंकुम टिळा किंवा चंदनाचा टिळा लावतात. हा टिळा कपाळावर किंवा दोन्ही भुवयांच्या मधोमध लावण्याची प्रथा आहे. अनामिकेच्या खालचा भाग हस्तज्योतिषानुसार सूर्यक्षेत्र मानले गेले आहे.

कपाळावर आज्ञाचक्राचे स्थान आहे. सूर्याच्या बोटाने टिळा लावल्याने मुखमंडल सूर्याप्रमाणे तेजस्वी बनू लागते. तसेच आज्ञाचक्रही जाग्रत व्हायला मदत होते. यामुळे मनाची एकाग्रता वाढायला मदत होते. टिळा लावणारा यशस्वी आणि ओजस्वी बनतो.

कपाळावर चंदनाचा टिळा लावण्याचे आरोग्यदायी महत्त्व!

पूजाविधींमध्ये कपाळावर टिळा लावण्याची प्रथा आहे. भारतात नियमित देवपूजेमध्येदेखील चंदनाचा वापर केला जातो. परंतू आपल्या प्राचीन संस्कृतींनादेखील विज्ञानाचा आधार आहे.
मग जाणून घ्या चंदनाच्या टिळा लावण्यामागील आरोग्यदायी कारण ….

* वैज्ञानिक आधार *
कपाळावर दोन भुवयांमध्ये ‘अग्न’ चक्राचे स्थान असते. या स्थानालाच ‘तिसरा डोळा’ म्हणतात. हे एक उर्जास्थान असल्याने अध्यात्मात या स्थानाला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच कपाळावर चंदनाचा टिळा लावण्याची प्रथा आरोग्यदायीदेखील ठरते.

चंदनाच्या टिळ्याचे फायदे ….

१) एकाग्रता सुधारते
आध्यात्मिक गुरू श्री श्री रवी शंकर यांच्या मते, तिसरा डोळा हा शरीरात एकाग्रता वाढवण्याचे केंद्रस्थान आहे. चंदनाचा टिळा कपाळावर लावल्यास मन स्थिर होण्यास आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. थंड प्रवृत्त्तीचे चंदन शरीरात आणि कालांतराने मनाला शांतता मिळवण्यास मदत करते.

२) डोकेदुखीपासून आराम मिळतो
चायनिज ऍक्युप्रेशरनुसार दोन्ही भुवयांमधील जागा ही शरीरातील नसा एकत्र मिळण्याची जागा समजली जाते. त्यामुळे या ठिकाणी मसाज केल्यास डोकेदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते. तसेच या ठिकाणी चंदनाचा टिळा लावल्यास नसांमध्ये थंडावा निर्माण झाल्याने डोकेदुखीच्या त्रासापासून त्वरीत आराम मिळण्यास मदत होते.

३) सकारात्मक बनवते
तिसर्‍या डोळ्याचे स्थान हे अंतर्मन आणि विचारांचे केंद्रस्थान आहे. नकारात्मक विचारातून शरीरात येणारी नकारात्मक भावना या चक्राच्या माध्यमातून आत येते. मात्र चंदनाच्या टिळ्यामुळे त्यांना रोखण्यात यश येते.

४) निद्रानाश आणि ताण-तणावापासून आराम
अतिथकवा, मानसिक ताण किंवा अतिउत्साही मनामुळेदेखील निद्रानाश होण्याची शक्यता असते. आयुर्वेदानुसार कपाळावरील या स्थानावर चंदनाने मसाज केल्यास ताण कमी होण्यास तसेच निद्रानाशाच्या समस्येवर मात करण्यास मदत होते.

५) शरीरात थंडावा निर्माण होतो
चंदनामध्ये मंद सुवासाप्रमाणेच शरीरात थंडावा निर्माण करण्याची क्षमतादेखील आहे. यामुळे त्वचेच्या समस्या दूर होतात. सोबतीलाच नसांनादेखील थंडावा मिळतो. भारतासारख्या उष्णकटीबंधीय क्षेत्रात कपाळावर चंदन लावणे तुमच्या सार्‍या शरीराला थंड करण्यास मदत करते.