गौरवशाली योग परंपरा

0
171
  • सुदर्शन (केपे)

संसाररूपी भट्टीत पोळलेल्यांना मनशांती देणारी, व्याधीग्रस्तांना शारीरिक आणि मानसिक तापापासून मुक्त करणारी, योगसाधकांना जीव-शिवाची भेट घडवून आणणारी, मानवांची मोक्षपदाची अंतिम इच्छा पूर्ण करणारी ही योगविद्या म्हणजे आमच्या परोपकारी पूर्वजांनी जगाच्या कल्याणासाठी जतन करून ठेवलेला अनमोल खजिना आहे.

विसाव्या शतकातील प्रारंभी एका नरेंद्राने (स्वामी विवेकानंदाने) अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत सहभाग घेऊन भारतीय तत्त्वज्ञानाची आणि अध्यात्माची दिव्य गुढी उभारून भारताच्या गौरवशाली-वैभवशाली संस्कृतीची खरी-खरी ओळख संपूर्ण जगाला दिली अन् आज या एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी दुसर्‍या एका नरेंद्राने (भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी) आपल्या अभ्यासपूर्ण वाणीने योगशास्त्राचे माहात्म्य ‘युनो’मधील इतर देशांना पटवून, ‘युनो’मार्फत ‘२१ जून’ हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याची मान्यता प्राप्त करून जगामध्ये भारतीय योग-विद्येची गौरव पताका पुन्हा एकदा सार्‍या विश्‍वात स्वाभिमानाने उंच फडकावली आहे.

या अनमोल व ऐतिहासिक कार्याबद्दल मा. नरेंद्र मोदीजींचे आभार मानून, अभिनंदन करणे आम्हा सर्व भारतीयांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे.
२१ जून २०१५ या पहिल्या आंतरराष्ट्रीय योगदिनी दिल्ली येथील राजपथावर आयोजित केलेल्या योग-प्रात्यक्षिकांच्या महाकुंभात ८४ देशांतील नागरिकांसह ३५ हजार योग-साधक सहभागी झाले होते. ‘‘योग हे शरीर आणि मनाला संतुलित करण्याचे माध्यम असून जीवनात प्रेम, शांती, एकता आणि जागतिक सद्भावना निर्माण करणारा हा उपक्रम आहे. जगाला तणावमुक्त- व्याधीमुक्त करून मानवतेचे कल्याण करणे हाच या योगदिनाचा मुख्य उद्देश आहे,’’ असे या महाकुंभातील योगसाधकांना मार्गदर्शन करताना मा. मोदीजींनी स्पष्टपणे सांगितले होते.

भारतीय ऋषिमुनींच्या दैवी-चिंतनातून, आत्मसाक्षात्कारातून आविष्कृत झालेली ही योगविद्या म्हणजे कोणताही धर्मभेद, जातीभेद, लिंगभेद न करता संपूर्ण मानवजातीचे कल्याण इच्छिणारे एक ईश्‍वरी वरदानच आहे. संसाररूपी भट्टीत पोळलेल्यांना मनशांती देणारी, व्याधीग्रस्तांना शारीरिक आणि मानसिक तापापासून मुक्त करणारी, योगसाधकांना जीव-शिवाची भेट घडवून आणणारी, मानवांची मोक्षपदाची अंतिम इच्छा पूर्ण करणारी ही योगविद्या म्हणजे आमच्या परोपकारी पूर्वजांनी जगाच्या कल्याणासाठी जतन करून ठेवलेला अनमोल खजिना आहे. अशा या अनमोल खजिन्याचे आम्ही वारसदार असून या योगभूमीत आम्ही जन्मलो हे आमचे सौभाग्य आहे. पण एवढे सौभाग्य असूनही बहुतेक भारतीय आजही कळत-नकळत या योगविद्येपासून दूर दूर राहिले आहेत, हे आमचे दुर्दैव आहे. जगातील इतर राष्ट्रांनी मात्र या योग-खजिन्याचा भरपूर लाभ घेतलेला आहे. अजूनही घेत आहेत.

भोगवादी, भौतिकवादी आणि अनेक प्रकारच्या व्याधींनी त्रासलेल्या पाश्‍चिमात्त्य राष्ट्रांतील जनतेला आज मनःशांती आणि निरोगी जीवन हवे आहे. यासाठी संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे. कारण योगविद्येसारखे रामबाण औषध असलेल्या भारताशिवाय अन्य कोणताही देश जगाला मनःशांती आणि व्याधीमुक्त जीवन प्रदान करू शकत नाही. भारतीय योगविद्येमध्ये एवढे मोठे दिव्य सामर्थ्य आणि क्षमता आहे याची विदेशी पंडितांनी प्रत्यक्ष अनुभूती व प्रचिती घेतली आहे.

रासायनिक विषारी खते आणि किटकनाशके फवारून पिकवलेले कडधान्य, फळे, भाजीपाला आदी खाऊन आपले हे शरीर कळत-नकळत हळूहळू व्याधिग्रस्त होत चालले असून आपली शारीरिक आणि मानसिक दुर्बलता वाढली आहे, हे बहुतेकांना माहीतच नाही. अशा वेळी ही योगविद्या फारच उपयुक्त ठरते. विषारी द्रव्ये बाहेर टाकून, दुर्बल शरीराची कार्यक्षमता वाढविण्याचे सामर्थ्य या योगाभ्यासामध्ये आहे.

आपले शरीर हे एक पवित्र यज्ञकुंड आहे. या यज्ञकुंडातील जठराग्नीत चिकन, दारू, तंबाखू, फास्टफूड आदी मांसाहारी पदार्थ टाकून (खाऊन) हा पवित्र यज्ञ कोणीही भ्रष्ट करू नये. अशा व्यक्तीकडून केलेली योगसाधना सफल होत नाही. मोक्षप्राप्ती हे या नरदेहाचे अंतिम ध्येय आहे. परमेश्‍वराची कृपादृष्टी संपादन करण्यासाठी, मोक्षपदाचा अधिकारी होण्यासाठी योगसाधकाने आपल्या आचार-विचार-उच्चारातून या पवित्र यज्ञकुंडाचे पावित्र्य राखावे. योग या शब्दाचा भावार्थ- आपल्या आत असलेल्या जिवात्म्याचे चराचरी असलेल्या परमात्म्याशी भेट घडवून आणणे, एकरूप होणे, मीलन होणे, समरस होणे असा आहे. या सृष्टीतील चौर्‍यांशी लक्ष योनींना (जीवमात्रांना) सृष्टिकर्त्या परमेश्‍वराकडून ऊर्जा पुरविली जाते. या ऊर्जेमुळेच तुम्ही-आम्ही सर्व आता या क्षणापर्यंत जिवंत आहोत. या ऊर्जेलाच जिवात्मा- अंशात्मा म्हणतात.

आमच्या भोगवादी वृत्तीमुळे ‘मी’पणाच्या अहंकारामुळे, भक्ती-भावाच्या अभावामुळे, आमच्या शरीरातील या दिव्य शक्तीचे, आमच्या देहचालकाचे आम्हाला विस्मरण झालेले असते. योगविद्येच्या माध्यमातून योग-साधकाला आपण परमात्मा परमेश्‍वराचे अंश आहोत याचे स्मरण होते. स्वतः प्रकाशित होऊन दुसर्‍यांनाही प्रकाशित करण्याचे दैवीसामर्थ्य या योगसाधनेमध्ये आहे. भोगी होऊन रोगी जीवन जगण्यापेक्षा, योगी होऊन परोपकारी आणि पारमार्थिक जीवन जगण्यामध्येच या नरदेहाचे मोक्षपद आहे, नरजन्माचे सार्थक आहे. हे सर्व साध्य करण्यासाठी योगसाधकाने स्वानुभवी योग-शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योग-साधना करावी.
‘‘गौरवशाली, वैभवशाली, सुसंस्कारित, व्याधीमुक्त, आत्मनिर्भर, स्वावलंबी आणि जगत्‌गुरू पदाला लायक असा भारत घडवायचा असेल तर त्यासाठी लागणारे सद्गुण- तेजस्वी विचारधारा, देव-धर्म-देश-संस्कृतीविषयी आस्था, आध्यात्मिक दृष्टी असलेले आणि राष्ट्रभक्तीने भारलेले भूमिपुत्र या ‘योग’ साधनेतूनच निर्माण होणार आहेत,’’ असे योगऋषी प. पू. रामदेवबाबा आपल्या योग प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करताना मोठ्या आत्मविश्‍वासाने आवर्जून सांगतात. अशा या सर्वगुणसंपन्न, शारीरिक आणि मानसिक व्याधीतून मुक्त करणार्‍या, कोरोनासारख्या विषाणूला यशस्वीपणे प्रतिकार करू शकणार्‍या, मोक्षप्राप्तीचे ध्येय साध्य करून जीव-शिवाची भेट घडवून आणणार्‍या, जगत्‌गुरू पदाची इच्छा पूर्ण करू शकणार्‍या या ‘योग’विद्येचा देश-विदेशांत निष्काम वृत्तीने प्रसार-प्रचार करणार्‍या सर्व भारतीय संस्थांचे, योगाचार्यांचे, योग-साधकांचे आणि योगकार्यात तन-मन-धनाने योगदान देणार्‍या हितचिंतकांचे या ‘योगदिना’निमित्त अभिनंदन!