गोमंतकाची परंपरा जपणारा शिगमोत्सव

0
625

– नारायण विनू नाईक, मंगेशी
गोमंतकात सार्वजनिक स्वरूपात जे उत्सव साजरे केले जातात त्यात भारतीय संस्कृतीचे दर्शन हे केवळ ग्रामीण भागात साजर्‍या होणार्‍या उत्सवातूनच पहायला मिळते. विविध धर्माचे उत्सव मग ते ख्रिश्चन, मुस्लिम व हिंदू असो, दरवर्षी ठरावीक वेळी साजर्‍या होणार्‍या या उत्सवाच्या वेळी त्यांचे सम्मीलन घडते. गणेश चतुर्थी, दिवाळी, नाताळ, कार्निव्हल, ईद व शिगमोत्सव हे गोमंतकीयांचे काही प्रमुख सण. या सणामुळे एकमेकांच्या गाठीभेटी होऊन मैत्री वृद्धिंगत होण्यास मदत होते.– शिगमोत्सव परंपरा –
प्राचीन आदिवासी संस्कृतीची पाळेमुळे शिमग्याने जतन केली जातात. लोकभावनेच्या बळावर ही संस्कृती आजपर्यंत टिकून राहिली आहे. कृषिप्रधान संस्कृतीमुळे या उत्सवाला लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ऋतुमानाप्रमाणे शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या समाजात हा सण अधिक जवळचा वाटतो. कोकणातील हा शिमगा गोव्यातही सुरू झाला. त्याने गोमंतकीय लोकजीवनातील कलात्मकतेला साद घातली. उत्सवाच्या रूपाने समाजपुरुषाला विनम्र आवाहन केले. गायन, वादन, नृत्य आणि अभिनय यांची जोशपूर्ण आतषबाजी शिमग्याच्या निमित्ताने ऐकायला मिळते. या उत्सवावेळी प्रत्येक गावात नवचैतन्य संचारते. ढोल, ताशे, समेळ, घुमट, कासाळे, झांज यांचा आवाज सर्वसामान्य खेळगड्यांच्या मनात आनंद लहरी उमटवतो. तोणयामळे, तारगडी ही लोकनृत्ये सादर करणारे मेळ प्रत्येक वाड्या-वाड्यावरून बाहेर पडतात. मेळ म्हणजे लोकनृत्य, गायन, सादर करणारा कलाकारांचा समूह. पूर्वी प्रत्येक गावागावांतूनच नव्हे तर वाड्यावाड्यावरून असे मेळ बाहेर पडत असत. देवभक्तीच्या भावनेने हे सर्व काही साजरे केले जाते. ईश्‍वरी अधिष्ठानामुळे आपल्याला ही कला सादर करण्याची इच्छा झाली. असे प्रत्येकाला वाटू लागते. गोव्यातील शिमगा म्हणजे गावागावांतील रोमटामेळ आणि लोकनृत्ये!
मंतकात शिमगोत्सव दोन प्रकारे साजरे केले जातात. पहिला धाकटा व दुसरा थोरला. धाकटा शिमगोत्सव फाल्गुन शुद्ध नवमीला सुरू होऊन पंचमी किंवा नवमीपर्यंत संपतो. काही ठिकाणी गुढीपाडव्यापर्यंत शिगमोत्सव चालतो. रंगमंच होळी पुनवेपासून सुरू होतो. त्या शिमग्याला ‘गुलाल’ असेही म्हणतात. नवमीपासून सुरू होणार्‍या शिगमोत्सवाला गावातील देवस्थानच्या मांडावर सारे गावकरी जमतात. तेथे ढोल, ताशे घेऊन ग्रामदेवतेला नारळ ठेवतात आणि उत्सव सुखरूप पार पाडण्यासाठी देवाला गार्‍हाणे घालतात. नंतर नमनाची गाणी गायली जातात. शिमगाचे नमन वैशिष्ट्यपूर्ण असते. प्रत्येक गावात वेगवेगळ्या पद्धती असतात. समईच्या पेटल्या ज्योतीला साक्ष ठेवून शिमग्यात म्हटल्या जाणार्‍या गाण्यांना ‘ज्योती’ म्हटले जाते. मांडांवरील नमन होताच गावच्या देवासमोर नमन घातले जाते. ढोल, ताशे, कासाळे ही वाद्ये सूर धरून धरून वाजू लागतात.
– मेळ (लोकसमूह गट) –
बहुतेक मेळात मानाची एक गुढी असते. तिला निशाण असे म्हणतात. तिचे प्राणपणाने रक्षण करा असे पूर्वजांनी सांगून ठेवलेले असते. मेळातल्या माणसाने गुढी कशी आणावी याचेही संकेत ठरलेले असतात.
गुढीची पूजा वगैरे करून तिला पुष्पमाला अर्पण केल्या जातात. मेळातील साहित्य म्हणजे गुढ्या, छत्री, तोरणे, ढोल, ताशे, समेळ, झांज, रणशिंगे आदी वाद्ये असतात. मेळात प्रत्येक प्रकारची सोंगे आणली जातात. त्यात श्रीराम, श्रीकृष्ण, श्रीहनुमान, नारद यासारख्या पौराणिक सोंगाबरोबरच छत्रपती शिवाजी, संत-साधू आदींचा समावेश असतो. शिमग्यात कला सादरीकरणापेक्षा उपरोधात्मक कलाविष्काराला अधिक महत्त्व असते. तालगडी, तोणयामेळ, गोफ यांची सुरुवात शिमग्यातूनच झाली.
– छत्रीची पूजा –
शिमग्यातील आणखी एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे ‘तळी’. लोकांच्या घरासमोरील अंगणात मेळ नाचायला आला की घरातील महिला एका ताटात नारळ, तांदूळ दरवाज्यात आणून ठेवतात. यालाच तळी असे म्हणतात. मेळात छत्री नाचवली जाते. या छत्रीची पूजा केली जाते. नंतर मेळाचा प्रमुख एका विशिष्ट पद्धतीने गार्‍हाणे घालतो. घरातील मंडळींचे कल्याण कर असे म्हणून ताटातील थोडे तांदूळ घरावर टाकतो.
– गडे पडणे –
शिगमोत्सवात काही गावात गडे पडण्याची पद्धत आहे. देवालयासमोर गडे (अंगात दैव शक्तीचा संचार झालेले) गोलाकार उभे राहतात. मध्यभागी ढोल व ताशे वाजविले जातात. गडे नाचत नाचत रामायण, महाभारतावर आधारित गीते म्हणतात. काही वेळाने त्या गड्याच्या अंगी दैवी शक्ती संचारून तो नाचत नाचत जमिनीवर पडतो. असे एक एक गडा जमिनीवर पडत असता त्याला दुसरा उठवतो. नंतर त्या गड्याच्या प्रत्येकी एक एक नारळ देऊन ते सर्व गडे स्थानिक (क्षेत्रपाल- देवचार) या स्थळी जातात पुढे सर्व गडे स्मशानभूमीवर जातात. तेथील स्मशानातील अस्थी व इतर साहित्य गोळा करतात आणि एका तिरडीवर ठेवतात. त्यावर एक सफेद कपडा घालून तो तिरडीवर खांद्यावर घेऊन स्वस्थानी येतात. मृत पावलेल्या माणसाबद्दल जसे रडतात तसे हे गडे रडत रडत मोठा आवाज करीत असतात. काही वेळाने पुन्हा त्या ठिकाणी जाऊन आणलेले साहित्य तेथे टाकतात. नंतर जवळच्या नदीत किंवा तलावात आंघोळ करून आपापल्या घरी परततात.
शिगमोत्सवानिमित्त गावातील मांडावर किंवा मंदिरासमोर पौराणिक, ऐतिहासिक किंवा सामाजिक नाटके सादर केली जातात. गावच्या परंपरेप्रमाणे सीमेपर्यंत देव देवतांची पालखी वाजन गाजत मिरवणुकीने नेली जाते. तेथे प्रत्येक धार्मिक विधी करून मूळस्थानी परत येतात. काही गावात पालखी प्रत्येक घरासमोर येऊन तिची खणा-नारळाने ओटी भरली जाते.