गांगुलीने बनवले टीम इंडियाला कणखर

0
146

सामना निकाल निश्‍चिती प्रकरण (२०००) झाल्यानंतर भारताची प्रतिमा संपूर्ण क्रिकेटविश्‍वात मलीन झाली होती. दुसरा एखादा देश असता तर यातून सावरलाच नसता. परंतु, सौरव गांगुलीने भारतीय संघाचे नेतृत्व करतानाच देशाची प्रतिमा सुधारतानाच संघाला कणखर बनवले, असे इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने सांगितले.

हुसेन यांनी सांगितले की, त्याच्या नेतृत्वात भारताने देशात आणि परदेशातही शानदार विजय मिळवले. ज्या पद्धतीने सौरव गांगुलीने स्वतःचा संघ तयार केला आणि तरुण खेळाडूंना संगत घेऊन परदेशी भूमीवर झेंडा फडकावला ते कोैतुकास्पद होते. नासिर हुसेन याने दादाने भारतीय संघाचे चित्र कसे बदलले याबद्दल सविस्तर सांगितले. हुसेन याच्यानुसार यापूर्वी भारतीय संघ सर्वोत्कृष्ट खेळाडूंसह एक चांगला संघ असायचा, परंतु गांगुलीने या संघाला एक कणखर संघ बनवले.

हर्षा भोगले यांच्याबरोबर झालेल्या लाईव्ह सत्रामध्ये बोलताना हुसेन म्हणाला, ‘सौरव गांगुलीच्या आधी भारत एक चांगला संघ होता. या संघात अझर, जवागल श्रीनाथ सारखे महान खेळाडू होते. पण गांगुलीने या संघाला कणखर संघ बनविले. गांगुलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने २००२ मध्ये श्रीलंकेबरोबर संयुक्तपणे चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकली होती तसेच २००३ च्या विश्‍वचषक स्पर्धेमध्ये उपविजेतेपदापर्यंत मजल मारली होती. त्याचबरोबर भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीबद्दल बोलताना हुसेन म्हणाला की, कोहलीने भारतीय संघाला तंदुरुस्ती आणि जिंकण्याची मानसिकता दिली. हुसेन म्हणाला, ‘लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये बर्‍याच गोष्टींवर काम करावे लागते. मला वाटते विराट कोहली ज्या पद्धतीने संघ हाताळत आहे त्यामुळेच संघामध्ये तंदुरुस्तीची संस्कृती रुजली आहे आणि जिंकण्याची मानसिकतादेखील कोहलीमुळेच आहे. या चॅट दरम्यान हुसेनने न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यमसनला त्याचा आवडता कर्णधार म्हणून निवडले आणि इंग्लंडचा कर्णधार ऑईन मॉर्गनला व्हाईट बॉल क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून निवडले. नासिर हुसेन याने इंग्लंडकडून कसोटीत ५७६४ व वनडेत २३३२ धावा केल्या आहेत. दीर्घ काळासाठी तो इंग्लंड संघाचा कर्णधारही होता.