खलाशांना परत आणण्याबाबत दोन दिवसांत तोडगा ः रेजिनाल्ड

0
121

>> मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती

 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी भेट घेऊन विदेशात जहाजांवर असलेल्या खलाशांना परत आणण्याचा विषयावर चर्चा काल केली. गोमंतकीय खलाशांना परत आणण्याच्या विषयावर दोन दिवसात तोडगा निघेल, असा विश्वास आमदार रेजिनाल्ड  यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

विदेशात असलेल्या गोमंतकीयांना परत आणण्याचा विषयाचे कुणीही राजकारण करू नये. मुख्यमंत्री डॉ. सावंत विदेशात असलेल्या खलाशांना आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. त्यांनी गोमंतकीय खलाशांबाबत भेदभाद केलेला नाही. त्यामुळे सर्वांनी मुख्यमंत्र्यांवर विश्‍वास ठेवण्याची गरज आहे. खलाशांना परत आणण्याच्या विषयावरून बुधवारी घडलेली घटना दुर्दैवी आहे, असेही रेजिनाल्ड यांनी सांगितले.

विदेशातून आणण्यात येणार्‍या गोमंतकीय खलाशांना क्वारंटाईन करून ठेवण्यासाठी शुल्क आकारू नये. विदेशातून आणण्यात येणार्‍या खलाशांकडून क्वारंटाईन शुल्काची आकारणी केली जाणार आहे, अशी चुकीची माहिती काही जणांकडून पसरविण्यात येत आहे. ज्यांना व्हीआयपी वातावरणात राहायचे आहे. त्यांच्याकडून क्वारंटाईन शुल्काची आकारणी करण्यास हरकत नाही, असेही आमदार रेजिनाल्ड यांनी सांगितले.