खरी परीक्षा लॉकडाऊन संपल्यावर…

0
183
  •  माधुरी रं. शे. उसगावकर
    (फोंडा)

आता जर आपण बदललो तर नक्कीच लॉकडाऊननंतरच्या काळात सहीसलामत उत्तीर्ण होऊ व कोरोना विषाणूपासून भयमुक्त होऊ. भयमुक्त वातावरणात तणावरहित आयुष्याचा आनंद उपभोगू. हे एक आव्हान आहे असं समजून आपण ते स्वेच्छेने पेलण्याचा निर्धार करुया.

सध्या लॉकडाऊन ही एक सुवर्णसंधी आहे. घरी बसून कंटाळा आला असं म्हणून कंटाळून कसं चालेल? सूर्यप्रकाश, क्रियाशीलता, कुटुंबियांसाठी वेळ, छंदोपासना, आध्यात्मिक साधना हे तर लॉकडाऊन झालं नाही ना! ज्या स्थितीत आहो त्या स्थितीत सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून सुंदर आयुष्याची मजा अनुभवण्यातच सुंदर जीवनाचे कौशल्य आहे.

संचारबंदीत घरी बसणे, विनाकारण बाहेर न जाणे हे शक्यतो आचरणात आणले जाते. काही विनाकारण बाहेर घिरट्या घालत असतात त्यांना आपत्‌कालीन परिस्थितीचं गांभिर्य नाही असंच म्हणावं लागेल.

कोरोना विषाणूबद्दलची मनातली भीती ही जणु टांगती तलवारच आहे. त्यात भर म्हणजे कोरोना व्हायरसवर अजूनही लसीकरण निघाले नाही. संशोधकांचे जिकरीचे प्रयत्न चालूच आहेत हे आपण जाणतोच. तोपर्यंत आयुर्वेदिक उपचार चालूच ठेवावे जेणेकरून आपली प्रतिकारशक्ती वाढते. सकस आहार, आराम, व्यायाम हे अत्यावश्यक आहे. सर्दी व कफ होईल असे पदार्थ खाऊ नये किंवा कटाक्षाने टाळावे. त्यामुळे कोरोनाची अवाजवी भीती व गैरसमजूत दूर होईल.

घरी बसण्याचा कंटाळा येतो… असा सूर बहुतांशी ऐकू येतो, पण त्याला पर्याय नाही. एखादी कला जोपासावी. नाहीतरी एरवी दिवसभराच्या उठाठेवीत आपल्याला एवढा वेळ कुठे मिळत होता? रिकामटेकड्या वेळात कोरोनाविषयी आलेख पाहात, उखाळ्या पाखाळ्या करण्याशिवाय वाचन, मनन, चिंतन करून अमूल्य वेळ सार्थकी लावावा. ‘स्वतःचा जीव महत्त्वाचा’ हे अनुसरून शासनाच्या नियमावलीचे पालन करणे यातच आपले व सर्वांचे हित आहे. कारण हे विषाणूचे संकट मोठे बिकट आहे. जोपर्यंत ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत सावधानी राखणे हे प्रत्येकाच्या हाती आहे. ‘बाहेर कोरोना घरात करमेना’ असे म्हणून फुकाफुकी जीव त्रासात घालू नये. आपल्या देशातही कोरोनाचा आलेख वाढतो आहे, याची जाण ठेवावी. हेही दिवस जातील व आशेचे किरण दिसतील असा सकारात्मक दृष्टीकोन बाळगून एकमेकांना साह्य करू, कोरोनाला आळा घालू!
संचारबंदीत सामाजिक अंतर ठेवणे हे फार महत्त्वाचे. या अदृश्य कोरोनापुढे सगळे व्यवहार ठप्प होत आहेत. आर्थिक व्यवस्था कोलमडून जात आहे हे विदारक दृश्य डोळ्यांसमोर दिसत आहे. देवळं, शाळा, महाविद्यालये बंद आहेत व दवाखाने वाढलेले आहेत, वाढत आहेत. या कोरोनासुराचा निःपात होण्यासाठी आपण सर्व सज्ज राहू. देवाचे आशीर्वाद हे आपल्या पाठीशी सदैव आहेतच. कदाचित देव आपली कसोटी तर पाहात नसेल ना!
एकीकडे सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले असतानाच देशभरात कोरोना व्हायरसने उसळी घेतल्याचे दिसते आहे. कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढते आहे. यानंतर लॉकडाऊन उठवले तर याहीपेक्षा विशेष काळजी घेणे अनिवार्य आहे.
निसर्गाच्या विरुद्ध जीवनशैली, वजन जास्त, दम्याचा त्रास, मधुमेह, उच्च रक्तदाब, मधुमेहासारखे आजार, ज्येष्ठ नागरिकांना धोका जास्त आहे, असे डॉक्टरी मत आहे. यावर काही आरोग्यविषयक टीप्स सांगितल्या आहेत.
– सकाळी दिवसाला एक तास सूर्यप्रकाश घ्या. गरम पाणी प्या. घसा ओला ठेवा. घरात धूप जाळा. लवंग, मिरी, दालचिनी, हळद घालून काढा प्या. या व इतर उपायांमुळे कोरोनापासून दूर राहू शकतो.

तसं पाहता खरी परीक्षा लॉकडाऊन संपल्यावरच! कोविड-१९ हा विषाणू अद्भुत अदृश्य शत्रू आहे. तो कधी कुणाला विळखा घालेल याचा मागमूसही लागणार नाही. शिवाजी राजांच्या वेळी युद्धात गनिमी कावा खेळला जायचा. त्याप्रमाणे हा विषाणू दबा धरून अचानक संधी मिळताच कुणाला यमसदनाला पाठवील सांगता सोय नाही. त्यामुळे या विषाणूचे सावट पुसट झाल्यासारखे वाटले तरी तो आभासच आहे. मांजरे उंदराला खेळवते आणि मग… तशातला प्रकार. म्हणून खरी परीक्षा ही लॉकडाऊन संपल्यानंतरच सुरू होते. कोरोनाबाधित व्यक्तीपासून मित्र, नातेवाईक दूर राहतात, यापेक्षा दुःखदायक ते काय? म्हणूनच हा विषाणू आपल्यापासून चार हात दूर राहील याची दक्षता घ्यावीच लागते.. आज आणि लॉकडाऊन संपल्यावरही!
सध्या लॉकडाऊन वाढवलेला आहे. लवकरच लॉकडाऊन संपेल आणि हळुहळू सगळे व्यवहार सुरळीत सुरू होतील. हे नाट्य तो विषाणू आसुरी आनंदाने बघत बसेल आणि आपण ग्रीन झोनमध्ये आहो, असं म्हणून मान वर करून निःशंकपणे वागू. पण लक्षात घ्या.. ग्रीन झोन म्हणजे जणू कलिंगडाचा प्रकार. बाहेरून ग्रीन झोन, आतून रेड झोन. तेव्हा आत्ताच ठरवून टाकायचं की कोणकोणती काळजी घ्यायची आणि कसं कसं बदलायचंय
या धोकादायक काळात बाहेर निघावंच लागलं तर तोंडावर मास्क बांधणे आवश्यक आहे. शेकहँडला रामराम ठोका व आपल्या भारतीय संस्कृतीनुसार नमस्कार करण्याची सवय अंगी बाणवणे हिताचे. बाहेरचं खाणं टाळणं, घरात पाऊल ठेवण्यापूर्वी हातपाय धुणे या सवयी लावून घेणे म्हणजेच करोनाला आपल्यापासून चार हात दूर ठेवणे. वारंवार हात निर्जंतुक साबणाने स्वच्छ धुवावे. घरच्या सकस आहारामुळे तब्येतही उत्तम राहील व प्रतिकारशक्ती वाढेल. योग्य व्यायाम, आहार यावर लक्ष देऊन पालन करण्याने कोरोनाला आपण हुसकावून लावण्यात नक्कीच यशस्वी होऊ.

इतक्या दिवसांपासून आपण जसं जगत होतो तो एक पाश्‍चात्त्य शिष्टाचार होता. ते खरं स्वातंत्र्य नव्हतं मुळी. ते केवळ अंधानुकरण होतं. ते प्रायश्‍चित्त आज आमच्या नशिबी आलं आहे. याला जबाबदार आपणच व आपली उसनी संस्कृती!
आता जर आपण बदललो तर नक्कीच लॉकडाऊननंतरच्या काळात सहीसलामत उत्तीर्ण होऊ व कोरोना विषाणूपासून भयमुक्त होऊ. भयमुक्त वातावरणात तणावरहित आयुष्याचा आनंद उपभोगू. हे एक आव्हान आहे असं समजून आपण ते स्वेच्छेने पेलण्याचा निर्धार करू. आपल्या सुरक्षिततेसाठी सारे हे प्रयत्न आहेत हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे.

परवाच एका काव्यसत्रात ऐकलं – अर्थात ऑनलाईन…
इतना तो कर ही सकते हैं ना
देश के नाते घर में रह सकते है ना
हार जाएगा कोरोना
सरकार जो कहती हैं वह करो ना.