कामगार कायद्यांमध्ये दुरुस्ती करणे धोकादायक : राहूल

0
155

देशातील कोरोना महामारीनिमित संकटाचे कारण पुढे करून कामगारांची पिळवणूक करून, त्यांचा आवाज दडपण्यासाठी त्यांचे मानवी हक्क तुडवले जाताकामा नयेत अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाविरोधी लढ्याचे निमित्त करून अनेक राज्यांनी कामगार कायद्यांमध्ये दुरुस्ती केल्याच्या अनुषंगाने त्यांनी आपले मतप्रदर्शन केले आहे.

काम करण्यासाठी असुरक्षित ठिकाणांना मान्यता देऊन कामगारविषयक मूलभूत तत्वांचे उल्लंघन केले जाऊ नये. आम्हीही कोरोनाविरोधी लढ्यात सहभागी आहोत. मात्र कामगारांबाबतच्या मूलभूत तत्वांचे उल्लंघन झालेले आम्हाला मान्य नाही असे गांधी म्हणाले.

ही अर्थव्यवस्थेवरील ढोंगी
उपाययोजना : जयराम रमेश
कॉंग्रेसचे अन्य एक ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी गांधी यांच्या मताशी सहमती व्यक्त केली. ते म्हणाले की अर्थ व्यवस्थेच्या पुनरुज्जिवनाच्या नावाखाली कामगार, जमीन व पर्यावरणविषयक कायद्यांत अयोग्य दुरुस्ती करणे घातक ठरू शकते. केंद्रातील मोदी सरकारची तशीच योजना असल्याचा आरोप त्यांनी केला. रमेश म्हणाले, ‘या अनुषंगाने पहिले पाऊल उचलले गेले आहे. नोटाबंदीप्रमाणे ही अर्थ व्यवस्थेवरील एक बनावट व ढोंगी उपाययोजना आहे’ असे. ट्विट त्यांनी केले आहे.