कर्तारपूर कॉरिडॉर आणि पाकचे षड्‌यंत्र

0
243
  • शैलेंद्र देवळणकर

गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेले करतारपूर कॉरीडॉरचे हे ३१ ऑक्टोबर रोजी पूर्ण झाले. भारत आणि पाकिस्तानातील संबंध कितीही तणावपूर्ण बनलेले असले तरी आणि कलम ३७० आणि ३५ अ काढून टाकल्यानंतर पाकिस्तानने भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी करण्याचा प्रयत्न चालवला असला तरी आणि शस्रसंधी कराराच्या उल्लंघनानंतर भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले असले तरी करतारपूर कॉरीडॉर हे एक असे माध्यम असू शकते की ज्यानिमित्ताने दोन्ही देशांच्या संबंध सुधारणांची एक संधी उपलब्ध आहे. पण खरोखरीच ही संधी आहे का? की पाकिस्तानचा याहीमध्ये काही डाव आहे? हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे. कारण अटलबिहारी वाजपेयींच्या काळापासून करतारपूर कॉरीडॉर पाकिस्तानने पुढाकार घेऊन पूर्ण करावा अशी मागणी भारत करत आला आहे. पण पाकिस्तान त्याकडे लक्ष देत नव्हता. आता अचानक गेल्या वर्षी इम्रान खानने त्याकडे लक्ष वळवले आणि त्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी एक वर्षांत याचे बांधकाम पूर्ण करण्याचे ठरले होते. त्यानुसार हे बांधकाम पूर्ण झाले आहे आणि ८ नोव्हेंबर रोजी याचे उद्घाटन होत आहे. त्यासाठी पाकिस्तानने साडे चार किलोमीटरचा एक कॉरीडॉर तयार केला आहे. या माध्यमातून शीख धर्मिय तेथे जाऊ शकतात आणि दर्शन घेऊ शकतात. यासंदर्भात भारत-पाकिस्तानमध्ये चर्चेच्या अनेक फेर्‍याही झाल्या आहेत. तथापि सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे या उद्घाटन सोहळ्याला पाकिस्तानने खलिस्तानी चळवळीतील हिट लिस्टवरील नेत्यांना आमंत्रित केले आहे. इतकेच नव्हे तर त्यांचे जाहिरातींचे फलकही लावण्यात आले आहेत. गतवर्षी पायाभरणीच्या कार्यक्रमाच्या वेळीही पाकिस्तानने अशाच पद्धतीने खलिस्तानी चळवळीच्या नेत्यांना बोलावले होते. त्यामुळेच त्या कार्यक्रमाला भारताने सरकारमधील कोणताही अधिकृत व्यक्ती या कार्यक्रमाला पाठवलेला नव्हता. या कॉरीडॉरच्या माध्यमातून पाकिस्तान खलिस्तानी चळवळींना प्रोत्साहन देण्याचे आपले जुने षड्‌यंत्र पुढे नेत नाहीये ना, याकडे भारताला अत्यंत बारकाईने नजर ठेवून राहणे गरजेचे आहे. तसेच यानिमित्ताने करतारपूर कॉरीडॉर नेमका काय आहे आणि पाकिस्तान नेमक्या कशा प्रकारे याआडून षडय्‌ंत्र रचत आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे.

काय आहे करतारपूर कॉरीडॉर?
काम भारत आणि पाकिस्तानात असणारे दोन पवित्र गुरुद्वारा जोडण्याचे काम सध्या पाकिस्तानकडून पूर्ण करण्यात आले आहे. पाकिस्तानातील गुरूद्वारा दरबार साहेब करतारपुर आणि आपल्याकडील गुरूदासपूर जिल्ह्यातील डेराबाबा नानक साहेब ही दोन्ही शीखधर्मीयांची पवित्र स्थळे आहेत. गुरूनानक देव यांचे वास्तव्य असणार्‍या करतारपुर येथील गुरूद्वारा दरबार साहेब या गुरूद्वाराची रावी नदीच्या किनार्‍यावर स्थापना केली गेली. तिथे १८ वर्ष त्यांचे वास्तव्य होते. त्याचप्रमाणे शीख धर्मियांचे दुसरे गुरु भाई लेहना (गुरु अंगद )हे मुळचे करतारपूरचे .त्यामुळे शीखधर्मीयांसाठी अत्यंत पवित्र असे ते स्थळ आहे. वर्षातून चार वेळा हजारोंच्या संख्येने शीख बांधव तिथे भेट देत असतात. परंतु ही भेट देताना व्हिसाचा प्रश्न निर्माण व्हायचा आणि या भेटीत अडथळे निर्माण व्हायचे. त्यामुळे व्हिसामुक्त असा एक कॉरिडॉर तयार करण्यात यावा अशी सर्वच शीख धर्मीयांची मागणी होती. जेणेकरुन पारपत्राशिवाय दरबार साहेब गुरुद्वाराला भेट देता येईल. याबाबतची मागणी गेल्या ३० वर्षांपासून सुरू होती पण पाकिस्तानने त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले होते. आता या कॉरिडॉरचे बांधकाम पूर्ण झाले आहे .

गेल्या काही वर्षांत दरबार साहेब गुरूद्वाराची अवस्थाही दयनीय झालेली होती. अटलबिहारी वाजपेयी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या पुढाकारामुळे या गुरुद्वाराची डागाडुजी पकिस्तानकडून सुरु झाली. तसेच हा कॉरिडोर निर्माण करण्याचा पहिला प्रस्तावही अटलबिहारी वाजपेयी यांनीच मांडला होता. वाजपई यांच्या पुढाकारामुळेच पाकिस्तानने सन २००० पासून भारतीय शिख धर्मियाना हा गुरुद्वारा भेटीसाठी खुला केला .

पूर्व आणि पश्चिम जर्मनी यांच्यामध्ये बर्लिनची भिंत होती तशी भिंत म्हणून या कॉरीडॉरकडे पाहिले जात होते. जर्मनीला विभागणारी भिंत पाडल्यानंतर तो देश एकत्र आले तशाच प्रकारे कर्तारपूर कॉरीडॉर निर्माण झाला तर कदाचित दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण होईल असा यामागचा दृष्टीकोन होता. मात्र अटलबिहारींच्या या मागणीकडे पाकिस्तानने दुर्लक्ष केले होते. त्यानंतर वाजपेयी यांनी दिल्ली- लाहोर बससेवा सुरू केली. ते स्वतः त्यातून लाहोरला गेले होते. पण त्याकडेही पाकिस्तानने दुर्लक्ष केले होते.

आता इम्रान खान पंतप्रधान झाल्यानंतर पाकिस्तानने अचानकपणे ह्या कॉरीडॉरचे काम हाती घेतले आहे. ३० वर्षांपासून भारताच्या या मागणीवर पाकिस्तानला अचानक झालेली उपरती ही प्रश्नांकित आणि शंकास्पद आहे. किंबहुना, ह्या सर्वांमागे पाकिस्तानचा एक डाव आहे. तो समजून घ्यावा लागेलच पण भारताने अत्यंत उत्तमरित्या हे प्रकरण हाताळले हेदेखील याठिकाणी लक्षात घ्यावे लागेल. मागच्या वर्षी या कॉरीडॉरच्या पायाभरणी समारंभाला पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपती, परराष्ट्र मंत्री यांना आमंत्रण दिले होते. परंतु भारताने उत्तम राजनयाचा नमुना दाखवला आणि यापैकी कोणीही उपस्थित राहिले नाही. या कार्यक्रमासाठी हरसिंम्रन कौर बादल आणि हरदीप सिंग पुरी असे दोन शीख धर्मीय शासकीय प्रतिनिधीच पाठवण्यात आले होते. थोडक्यात, हा शीख धर्मीयांचा धार्मिक सोहळा असल्याच्या दृष्टिकोनातून भारताने याकडे पाहिले.

कर्तारपूरचा मुद्दा पुढे करण्यामागे पाकिस्तानकडे एक षडयंत्र आहे. गेल्या काही वर्षांपासून खलिस्तानवादी चळवळीला समर्थन देऊन भारताविरोधात कारस्थान करण्याचा प्रयत्न पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय सातत्याने करत आहे. कर्तारपूरच्या भूमिपूजनावेळी तिथे मोठ मोठे पोस्टर लावले गेले आणि त्यावर खलिस्तानवादी नेत्यांचे फोटो लावले गेले. यामध्ये पाकिस्तानात आश्रयाला असणार्‌या खलिस्तानवाद्यांचा सर्वात मोठा नेता असलेल्या गोपाल चावलाचा फोटो होता. या उद्घाटन समारंभाला हा चावला पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांच्या बाजूला बसला होता. त्यांच्याबरोबर हस्तांदोलन करत होता. या गोपाल चावलाचे हाफिज सईद बरोबर अत्यंत घनिष्ट संबंध आहे;. आयएसआय, पाकिस्तानी लष्कर आणि खलिस्तानवादी यांच्यामध्ये भारतविरोधी कारस्थानांना सुरुवात झाली आहे. यावर्षी म्हणजे २०१९ मध्ये गुरू नानकांची ५५० वी जयंती आहे. यानिमित्ताने पाकिस्तानात मोठे शीख संमेलन भरवण्यात येणार आहे. हे संमेलन खलिस्तानवादी भरवत आहेत. याचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणावर शीख बांधवांनी यावे यासाठी या कॉरिडोरचे काम हाती घेतले आहे. यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात आता शीख लोक पाकिस्तानात जातील. तेथे त्यांना खलिस्तानवादी चळवळीकडे कसे आकर्षित करायचे, त्यांचे समर्थन कसे मिळवायचे यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न सुरु आहेत. खलिस्तानवाद्यांनी जस्टीस फॉर शीख नावाची एक नवी चळवळ सुरू केली आहे. त्यांना यासाठी भारतातील शीख समुदायाचे समर्थन मिळवायचे आहे. त्यामुळे हे पाकिस्तानचे कूटकारस्थान आहे हे निर्विवाद आहे. गेल्या काही वर्षांपासून पंजाबमधील खलिस्तानवादी चळवळीचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून होतो आहे. दोन वर्षांपूर्वी थायलंडमध्ये जगतारसिंग तारा हा शीख दहशतवाद्याला पकडण्यात आले होते. गुप्तहेर संघटनांकडून झालेल्या चौकशीमध्ये त्याने दिलेल्या माहितीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या असून त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जगतारसिंगने दिलेल्या माहितीनुसार, थायलंडमध्ये एक लष्करी प्रशिक्षण केंद्र चालवले जात असून ते प्रामुख्याने शीख दहशतवाद्यांसाठी चालवले जात आहे. विशेष म्हणजे हे प्रशिक्षण केंद्र आयएसआयकडून संचलित केले जात आहे. या केंद्रामध्ये अत्याधुनिक शस्त्रास्रांचे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षण शिबिरामध्ये भारतामधून युरोपमध्ये गेलेल्या शीख तरुण सहभागी होत आहेत. २०१६ मध्ये पाच ब्रिटिश शीख नागरीक अचानक बेपत्ता झाले होते. ते पाचही नागरिक अशा प्रकारचे दहशतवादी प्रशिक्षण घेण्यासाठी थायलंडला गेल्याचे उघड झाले होते.

तसेच ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘बब्बर खालसा’, ‘खलिस्तान झिंदाबाद फोर्स’, ‘खलिस्तान कमांडो फोर्स’, ‘दल खालसा’ या सर्व दहशतवादी संघटनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न ‘आयएसआय’कडून केला जात आहे आणि ही अतिशय घातक गोष्ट आहे. जगतार सिंग याने चौकशीदरम्यान लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या असतुल्ला याच्याशी लाहोरमध्ये भेट झाल्याचे सांगितले होतेे. इतकेच नाही तर या दोघांनी मिळून जम्मू- काश्मीरच्या माध्यमातून पंजाबमध्ये शस्त्रास्त्र आणण्याची योजना बनविल्याचे उघड झाले होते. त्यामुळे भारतविरोधी कारवाया करणार्‌या जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी संघटना आणि खलिस्तानी दहशतवादी संघटनांना एकत्र आणून भारतात अतिरेकी कारवाया करण्याचा प्रयत्न आयएसआयकडून सुरू असल्याचे उघड झाले होते.
२००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्‌यानंतर आपल्याकडून २० मोस्ट वॉंटेड दहशतवाद्यांची यादी पाकिस्तानला दिली होती. या यादीमध्ये पाच शीख दहशतवाद्यांचा समावेश आहे. असे म्हटले जाते की, जवळपास १७० शीख दहशतवादी सध्या पाकिस्तानमध्ये वास्तव्यास आहेत आणि त्यांना आयएसआयकडून प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये ‘बब्बर खालसा’ या दहशतवादी संघटनेच्या अनेक दहशतवाद्यांचा समावेश असून ते पाकिस्तानच्या आश्रयाला आहेत. भारताने पाच शीख दहशतवाद्यांना हस्तांतरणाची मागणीही पाकिस्तानकडे केलेली आहे; परंतु पाकिस्तानने याबाबत कोणतीही पावले उचललेली नाहीत.

१३ ऑगस्ट २०१३ रोजी भारताचे तत्कालीन गृहराज्यमंत्री आर. पी. एन. सिंग यांनी राज्यसभेमध्ये बोलताना यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली होती. त्यानुसार, काही खलिस्तानवादी दहशतवादी पाकिस्तानमध्ये असून ‘आयएसआय’कडून या खलिस्तानवादी चळवळीचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या अब्दुल करीम टुंडा याला नेपाळच्या सीमेवर पकडण्यात आल्यानंतर त्यानेही आयएसआयच्या या खलिस्तानवादी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याच्या षड्यंत्राला दुजोरा दिला होता. तसे पाहता आयएसआयचा हा प्रयत्न नवा नाही. १९८०च्या दशकात जनरल झिया उल हक् हे पाकिस्तानचे लष्करी हुकुमशहा होते तेव्हापासूनच पाकिस्तानकडून खलिस्तानी चळवळीला प्रोत्साहन देण्यास सुरूवात झाली होती.