उरल्या सगळ्या त्या आठवणी…

0
247
  • अनुराधा गानू
    (आल्त-सांताक्रूझ, बांबोळी)

या लिखाणाची सुरुवात एकेकाळी झालीय दगडी पाटी आणि लेखण यांनी झालीय. त्यानंतर दौत म्हणजे शाई भरलेली एका विशिष्ट आकाराची बाटली आणि त्यात टाक बुडवून लिहायचं. मग थोडीफार शाई हाताला आणि कपड्यांना लागायची. मग आईचं रागावणं. पण ती दगडी पाटी, पेन्सिल, दौत, टाक, आईचं रागावणं सगळंच आता उरलंय आठवणींच्या रूपात.

टीव्हीवर क्रिकेटची मॅच चालू होती. ती बघता बघता मी म्हटलं, ‘‘अरे, आमच्या लहानपणी ना एक बाबू टांगेवाला होता. तो क्रिकेटचा फार शौकीन होता. पुण्यात किंवा जवळपास कुठेही क्रिकेटची मॅच असली की हा बाबू आपला टांग्याचा धंदा बंद ठेवून मॅच बघायला हटकून जाणार. आणि मॅच जिंकली की कॅप्टनच्या गळ्यात पडणारी पहिली माळही बाबू टांगेवाल्याचीच असणार, हे ठरलेलंच असायचं. मैदानात जायला त्याला कोणी अडवू शकत नव्हतं’’, असं मी सांगत होते तर नातू म्हणाला, ‘‘अगं, टांगा म्हणजे काय.. ते तर सांग आधी.’’

खरंच, आजच्या लहान मुलांच्या पिढीला टांगा हा शब्दच नवीन तर टांगेवाला काय माहीत असणार? हे टांगा आणि टांगेवाला दोन्ही विस्मृतीतच गेलेले शब्द. टांग्यासारखीच बैलगाडीसुद्धा विस्मृतीतच गेलीय. बैल सगळीकडे दिसतात पण बैलगाडी नाही. मला आठवतंय… लहानपणी कोकणात जाताना बसस्टँडवर आम्हाला न्यायला रामा गडी बैलगाडी घेऊन यायचा. गाडी चालू झाली की बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांचा आवाज मोठा मंजुळ यायचा. आजोबा ओसरीवर वाट बघत बसायचे. ओसरी या शब्दातच अशी जादू आहे की तिथे बसावं ते हातपाय पसरून, आरामात. थकवा गेलाच म्हणून समजा. ओसरी म्हणजे घराच्या फाटकातून आत आलं की मुख्य घरात जाण्याअगोदर बरीच बंदिस्त जागा असते ती ओसरी आणि तशीच बंदिस्त जागा घराच्या मागच्या दारातून आत येताना असते, ती पडवी. पण शहरी फ्लॅटमध्ये हे दोन्ही शब्द आणि या दोन्ही जागा आठवणीतून गेल्या. तसंच गिरण्या आल्या आणि कांडण करणारे उखळ- मुसळ विस्मृतीत गेले. तसंच जातंही आपल्या आठवणीतून हद्दपार झालं. मिक्सर आले आणि पाटा-वरवंटा गेला. पण सांगू! पाट्यावर वाटलेल्या चटणीला जी खमंग चव असते, तशी चव मिक्सरमध्ये वाटलेल्या चटणीला येत नाही. पण काळ बदलला. नवीन साधनं सोयीची झाली. त्यांचं महत्त्व मान्य तर करावंच लागेल. त्यामुळे बारीक-सारीक विचार नाही करत बसायचं!
तसाच ताकमेढी हा शब्द. ताकमेढी म्हणजे पूर्वीच्या काळी ताक करण्यासाठी मातीचा किंवा चिनीमातीचा डेरा असतो. डेरा म्हणजे ताक करायचं मातीचं किंवा चिनी मातीचं भांडं. त्या भांड्याचं तोंड पसरट असे. कोपर्‍यातल्या एका लाकडी खांबाला तो डेरा चिकटवून ठेवायचा. तो खांब ताक घुसळण्याच्या रवीला दोरीनं बांधायचा. ती रवी डेर्‍यात घालून दोरी ओढून ताक घुसळायचं. सध्या चालू असलेली कृष्णा ही मालिका बघत असाल तर यशोदामैय्याच्या घरी तुम्हाला ती ताकमेढी, ती रवी, तो डेरा, लोण्यानं भरलेलं मडकं ठेवलेले शिंकाळे सगळं काही दिसेल. कारण शिंकाळे तरी आपल्याला कुठे माहीत आहेत? तर ताकमेढी म्हणजे तो खांब. त्या ताकमेढीचं आणखी एक महत्त्व होतं. घरातल्या लहान मुलाला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्या ताकमेढीवर हळूहळू चढवायचं. त्यामागची भावना अशी की त्या मुलाचं कर्तृत्व असंच उंच उंच वाढत जावो. पण आता ताकमेढी या शब्दासारखीच वाढदिवस साजरा करण्याची पूर्वीची पद्धतही विस्मृतीतच गेल्यात जमा आहे. तसाच फिरकीचा तांब्या. पूर्वी प्रवासाला जाताना पाण्यासाठी बरोबर एक पितळी तांब्या असायचा. त्याचं झाकण फिरकीचं आणि त्याला वर हँडल (कडी) तो तांब्या धरण्यासाठी.

परवाचीच गोष्ट. मी आणि नातू गॅलरीत उभे होतो. समोरच्या तारेवर लहान लहान पक्षी बसलेले दिसले. मी म्हटलं, ‘‘चिमण्या आहेत का रे त्या?’’
तर नातू म्हणाला, ‘‘आजी, चिमणी म्हणजे कुठला पक्षी असतो गं?’’ खरंच, आज चिमण्या कुठे दिसतच नाहीत फारश्या. आता अंगण आणि त्यासोबत चिमण्याही गेल्या आपल्या सगळ्यांच्या आठवणीतून! अर्थात एक होती चिमणी (चिऊताई) आणि एक होता कावळा ही साधीच गोष्ट अगदी हावभाव करून रंगवून रंगवून सांगणारे आजी-आजोबाही नाहीत आणि त्या साध्याश्या गोष्टीत रममाण होऊन आनंदित होणारी नातवंडंही फारशी कुठे दिसत नाहीत. हा कसला परिणाम, कोण जाणे? हे सगळं फक्त आठवतंच बसायचं आता!
आत्ताच्या काळात डॉक्टर म्हटलं की एकदम स्पेशालिस्टच! पण पूर्वी फॅमिली डॉक्टर्सअसायचे. आजोबांपासून नातवंडापर्यंत संपूर्ण कुटुंबाचा एकच डॉक्टर. घरात कुणालाही काही झालं तरी प्रथम जायचं ते फॅमिली डॉक्टरकडेच. अगदीच काही कमी-जास्त असेल तर तेच पाठवायचे एखाद्या स्पेशालिस्टकडे! नाहीतर इतर सामान्य आजारांसाठी तेच औषधं देणार. एखाद्या छोट्या काचेच्या बाटलीवर डोस खुणा केलेली पांढर्‍या कागदाची पट्टी आणि आत तांबडं औषध ठरलेलं. औषधाचं मिश्रण म्हणजे प्रमाण वेगवेगळं असेल, ते आम्हाला कळत नव्हतं. पण त्याचा लाल रंग मात्र ठरलेला. आता फॅमिली डॉक्टरही नाही आणि ते लाल औषधही नाही.

तशीच आणखी एक विस्मृतीत गेलेली व्यक्ती म्हणजे पहाटे पहाटे गोड गळ्यानं अभंग म्हणत येणारा वासुदेव. अभंग म्हणत म्हणत एक पाय पुढे- मागे करत नाचणारा. डोक्यावरच्या निमुळत्या टोपीत मोरपीस खोवलेला आणि गळ्यात कवड्यांची माळ. आता कवड्याही विस्मृतीत गेल्या.

पहाटे पहाटे म्हणजे सूर्य उगवण्याच्या पूर्वी आकाशात तांबड फुटतं. म्हणजे आकाशात सुंदर लाल रंगाची उधळण होते. नेहमीच होते. सूर्यदेव येत आहे होऽ याची ती आधी दिलेली वर्दीच जणु. त्याही वेळेच्या आधी झुंजू-मुंजू होतं. म्हणजे रात्र संपता संपता पहाट होते. नेमकी तीच वेळ. पण आता हे शब्द कोणाला कळणार. ते गेले आठवणींच्या कुप्पीत. अशा बर्‍याच खेळांच्यासुद्धा आज आठवणीच उरल्यायत- जसे लंगडी, ठिकरी, काचापाणी, ऐसपैस हे सामान्य खेळ तर गेलेच पण खो खो, आट्यापाट्या हे आंतरशालेय स्तरावर खेळले जाणारे खेळही विस्मृतीत गेले.

असे कितीतरी खेळ, कितीतरी शब्द, कितीतरी वस्तू, घटना, चांगले-वाईट क्षण हे विस्मृतीत जातात. कितीतरी आपली माणसं विस्मृतीत जातात. इतकंच नव्हे तर आत्ता हा लेख मी लिहितेय तो बॉलपेननं. पण या लिखाणाची सुरुवात एकेकाळी झालीय दगडी पाटी आणि लेखण यांनी झालीय. त्यानंतर दौत म्हणजे शाई भरलेली एका विशिष्ट आकाराची बाटली आणि त्यात टाक बुडवून लिहायचं. मग थोडीफार शाई हाताला आणि कपड्यांना लागायची. मग आईचं रागावणं. पण ती दगडी पाटी, पेन्सिल, दौत, टाक, आईचं रागावणं सगळंच आता उरलंय आठवणींच्या रूपात. आईचीच आज केवळ आठवण उरलीय तर तिचं रागावणं तरी कसं उरेल?