आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कपात

0
93

>> कर्जदारांना मासिक हप्त्यांबाबत दिलासा शक्य

रिझर्व्ह बँकेने काल एका निर्णयाद्वारे रेपो रेटमध्ये पाव टक्क्याची कपात केली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय समितीने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार रेपो रेट ६.२५ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आला आहे. यामुळे गृह कर्ज किंवा अन्य कर्ज घेणार्‍यांना दिलास मिळणार आहे. कारण बँकांकडून व्याज दरात कपात केली जाण्याची शक्यता आहे.
रेपो रेटबरोबरच रिव्हर्स रेपो रेटमध्येही सव्वा टक्क्याने कपात करण्यात आली आहे. गेल्या सहा वर्षांमधील हा निचांक असून याचा थेट परिणाम कर्जदारांच्या मासिक हप्त्यांवर (ईएमआय) होण्याची शक्यता आहे. कारण ईएमआय कमी होण्याची शक्यता आहे. तथापि त्याबाबत निर्णय बँकांवर अवलंबून असेल.
रेपो रेटमध्ये कपात केल्याने बँकांना रिझर्व्ह बँकेकडून घेतलेल्या कर्जावर कमी व्याज द्यावे लागणार आहे. परिणामी बँकांकडे अतिरिक्त रक्कम शिल्लक लागेल. त्याचा वापर बँकांना कर्ज देण्यासाठी करता येईल. बँकांना व्याज दरात घट केल्यास त्याचा मोठा लाभ ग्राहक व कर्जदारांना होणार आहे.
बँकांना दैनंदिन व्यवहारासाठी पैशांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. या पैशांच्या उभारणीसाठी बँका रिझर्व्ह बँकेची मदत घेतात. रिझर्व्ह बँकेकडून देशभरातील बँकांना कर्ज पुरवठा केला जातो. या कर्जावर रिझर्व्ह बँकेकडून व्याज आकारले जाते. रिझर्व्ह बँकेकडून आकारल्या जाणार्‍या व्याजाच्या प्रमाणाला रेपो रेट संबोधले जाते. आता या व्याज दरात कपात करून ते ६ टक्क्यांवर आणले आहे. त्यामुळे बँकांना कमी प्रमाणात व्याज द्यावे लागेल. त्याचा लाभ बँकांना होईल.