आमोण्यातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर

0
184
  •  विठ्ठल पु. भगत
    (बोर्डे- डिचोली)

    बुधवार दि. १ जुलै रोजी आषाढी एकादशी उत्सव साजरा होणार आहे. गावकरी, भक्तजण व भाविक यांनी येऊन श्रीविठुमाऊलीचे दर्शन घ्यावे. या दिवशी इथे येणे शक्य नसल्यास पुढे कधीतरी माऊली तीर्थक्षेत्र- आमोणे येथे येऊन श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे दर्शन घ्यावे.

डिचोली तालुक्यातील आमोणे या गावी अनेक मंदिरे आहेत. पण श्रीविठु- माऊलीचे मंदिर नव्हते. विठुमाऊलीचे दर्शन घ्यायचे असल्यास साखळी किंवा माशेल गावी जावे लागे. आषाढी एकादशीचा भव्य सोहळा पंढरपूर या नगरी होतो. ज्यांना शक्य आहे ते भक्त पंढरपूर नगरी जातात. पंढरी नगरीतील भव्य दिव्य सोहळा पाहून परत आपापल्या गावी येतात. आठ-दहा वर्षांपासून माशेल, सांगे, मुळगाव व गोव्यातील अनेक गावातील वारकरी पंढरपूरला जातात. आमोणे गावातील वारकरी मुळगावच्या वारकरी मंडळात सामील होऊन पंढरपूरला जात असत. प्रवासात अल्पोपाहार, जेवणा-खाण्याची सोय तसेच झोपण्याची सोय मठ, मंदिर सभागृहात केली जाते. गोव्यातून साडेतिनशे किलोमीटरचे अंतर चालून पंढरपूरला पोहोचायला १२ दिवस लागतात.

विठु माऊली हे श्रीविष्णूचे रूप आहे. आषाढी एकादशीचा श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेचा चातुर्मासारंभ सोहळा होय. विठुमाऊलीच्या भेटीसाठी लाखो वारकरी तहानभूक विसरून पायी पंढरपुरी जातात. तर बरेचशे भक्तगण व भाविक चार चाकी वाहने, बसेस, टेंपो व रेल्वेने पंढरपुरला जातात.
वारीत चालताना वारकरी मुखाने सतत विठ्ठलाचे नामस्मरण करतात व सामूदायिक रुपाने ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’ असा जयघोष करतात. तसेच…

‘टाळी वाजवावी, गुढी उभारावी | वाट ती चालावी, पंढरीची ॥
‘निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम|’…

असा गजर करतात. यामुळे वातावरण भक्तिमय होऊन जाते. आषाढी एकादशीला ज्ञानेश्‍वर, तुकाराम, निवृत्तीनाथ, सोपानदेव, पैठणहून एकनाथ तर दहिठाण्याहून दहिठणकरांची व पंजाबहून कबिरांची पालखी… अशा सात पालख्या पंढरपुर नगरी येतात. या सर्वांमध्ये संत ज्ञानेश्‍वरांची पालखी फारच पुरातन समजली जाते. विठुमाऊली हेच संत आणि भक्तगणांचे मायबाप अशी दृढ श्रद्धा आहे. माहेरी गेल्यानंतर लेकी-मुलींना जसे समाधान वाटते तसेच वारकरी व भक्तांना पंढरपुरला गेल्यावर वाटते. भक्तिमार्ग हा निवृत्तीचा की प्रवृत्तीचा असा प्रश्‍न पडतो. प्रापंचिक जीवनात निवृत्ती घडली तर परमार्थ हा प्रवृत्तीचाही ठरतो. भक्तिमार्ग हा दुबळ्यांचा नव्हे तर शूरांचा आहे. भक्तीने देव प्रसन्न होतो, वृथा अभिमानाने नव्हे! समाधान मिळवण्यासाठी कष्ट, प्रयत्न करावे लागतात हे आपणास ‘संत’ शिकवतात. संतांमुळेच आपल्याला देव कळतो. केवळ भक्तीचा हा विषय नसून श्रद्धेचा, भावनेचा व अनुभवाचा विषय आहे.
गोकुळ, तिरुपती, तिरुवल्लर, बद्रीनाथ, सिंहाचलम्, हरिहर, ऋषीकेश ही महत्त्वाची वैषाख क्षेत्रे म्हणून ओळखली जातात. वैष्णव संप्रदाय हा हिंदूंच्या सांस्कृतिक जीवनातील प्रमुख अंग आहे. आठ वर्षांपूर्वी आमोणे गावात ‘वासुदेव’ आला होता. अनेक घरे फिरून तो प्रेमानंद नाईक (घाडीवाडा) यांच्या घरी आला. वासुदेवाने प्रेमानंदचा परिचय करून घेतला. प्रेमानंद हा पक्का विठ्ठलभक्त असल्याचे त्याने जाणले. ‘‘या देवभूमीत आमोणे गावात तुझ्या हातून विठ्ठलाचे मंदिर उभे राहणार’’ असल्याचे वासुदेव यांनी प्रेमानंदला सांगितले. तसेच ‘‘विठुमाऊलीच्या मंदिराचा विचार तू तुझ्या मित्रमंडळींना सांगून टाक. तू एकट्याने मंदिराचे काम करू नकोस. अनेकांच्या संमतीने व त्यांच्या अर्थसाहाय्याने मंदिराचे काम कर. असे झाल्यास संपूर्ण विठ्ठल भक्तांचे हे मंदिर होईल’’, असे सांगून वासुदेव निघून गेला.

प्रेमानंदने अनेकांना हा विषय सांगितला. हळूहळू नागरिकांना हा विषय पटत गेला. निधी गोळा होऊ लागला. प्रेमानंदने आपली १०० मी. जागा मंदिरासाठी दिली. सौ. माधुरी मनोज मोरजकर (कळंगुट-बागा), दयानंद गोका तारी, सौ. वेदांगी दामोदर मोरजकर, खेमलो स. सावंत, श्री निळकंठ परब यांनी गर्भागृहाचा दरवाजा दिला. सेझा वेदांता कंपनीने मंदिरास लागणारे लोखंडी खांब दिले. वेदांता कंपनीचे कॉंट्रॅक्टर श्री. जोशी यांनी मंडपास लागणारे पत्रे दिले. प्रेमानंद नाईक व त्यांच्या सहकार्‍यांनी बाळगलेले स्वप्न साकार झाले. प्रेमानंद नाईक आणि त्यांच्या सहकार्‍यांचे नाव इतिहासात चिरंतन राहील. या मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा व मूर्तिप्रतिष्ठापना सोहळा मंगळवार दि. २५ फेब्रुवारी २०२० ते बुधवार दि. २६ फेब्रु. २०२० म्हणजे फाल्गुन शु. तृतीया या दिवशी झाला.
हे मंदिर साखळीपासून ८ कि.मी.व माशेलहून फक्त दीड किमी.अंतरावर आहे. माशेलहून साखळीस जाताना आमोणे पुलाच्या पुढील डाव्या बाजूकडील रस्त्यावरून विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात फक्त दहा मिनिटात जाता येते.

कोरोना नावाचा महामारी रोग पसरल्याने यंदा वारकरी मेळावे रद्द करण्यात आले आहेत. मोजकेच वारकरी पालख्या घेऊन पंढरपुरात जाणार आहेत. त्यामुळे डोळ्यांचे पारणे फेडणारे मेळावे दूरदर्शनवर दिसणार नाहीत. बुधवार दि. १ जुलै रोजी आषाढी एकादशी उत्सव साजरा होणार आहे. गावकरी, भक्तजण व भाविक यांनी येऊन श्रीविठुमाऊलीचे दर्शन घ्यावे. या दिवशी इथे येणे शक्य नसल्यास पुढे कधीतरी माऊली तीर्थक्षेत्र- आमोणे येथे येऊन श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे दर्शन घ्यावे व मंदिराच्या पुढील कामास मदत करावी, अशी विनंती आहे.